Subscribe Us

header ads

Maruti B. Chitampalli : Naturalist,Wildlife Conservationist and Writer

Maruti B. Chitampalli : Naturalist,Wildlife Conservationist and Writer

मारुती भुजंगराव चितमपल्ली : निसर्ग निरीक्षक,पक्षिशास्त्रज्ञ, लेखक

जन्मदिन - 5 नोव्हेंबर 

स्मृतिदिन- 19 जून


बालपण आणि शिक्षण:

निसर्ग लेखक,निसर्ग निरीक्षक, मराठी साहित्यातील वनमित्र चितमपल्ली मारुती भुजंगराव यांचा जन्म सोलापूर येथे एका गिरणी कामगाराच्या कुटुंबात 5 नोव्हेंबर 1932 रोजी झाला. चितमपल्ली यांच्या वडिलांना वाचनाचा छंद होता. त्यांना शिक्षणाचे महत्त्व होते. 

आपल्या मुलांनी विणकामाचे साचे चालवू नयेत, त्यांनी शिकावे ही त्यांची इच्छा होती. चितमपल्ली यांची आई सुगंधाबाई ऊर्फ अम्मा ही स्वभावाने शांत आणि सोज्वळ होती.

त्यांचे शालेय शिक्षण सोलापुरातील टी. एम. पोरे स्कूल व नॉर्थकोट टेक्निकल हायस्कूलमधून शालेय शिक्षण झाले.

 महाविद्यालयीन उच्च माध्यमिक पर्यंतचे शिक्षण सोलापूरच्या दयानंद महाविद्यालयामधून पूर्ण करून ते पुढील व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी त्यांनी कोइमतूरच्या स्टेट फॉरेस्ट कॉलेज, बंगलोर, दिल्ली, कान्हा राष्ट्रीय उद्यान (मध्य प्रदेश), डेहराडून इत्यादी ठिकाणच्या वने आणि वन्यजीवविषयक संस्थांमतून घेतले. वनाधिकारी म्हणून काम करताना त्यांना या शिक्षणाची आवश्यकता होती.

यासोबत त्यांनी नांदेड येथील यज्ञेश्वरशास्त्री कस्तुरे यांच्या संस्कृत पाठशाळेत, पुण्यातील देवळेशास्त्री, पनवेल येथील पंडित गजाननशास्त्री जोशी, परशुरामशास्त्री भातखंडे, वैद्य, वि. पु. धामणकरशास्त्री यांच्याकडे परंपरागत पद्धतीने त्यांनी संस्कृत साहित्याचे अध्ययन केले होते. पुढे ते त्यांना त्यांच्या पक्षीविषयक लेखनासाठी विशेष मदत झाली.

X X

आनंददायी 'वनवास':

चितमपल्लींनी महाराष्ट्र सरकारच्या वनविभागात अनेक महत्त्वाच्या पदांवर कार्य केले. 1990 साली ते निवृत्त झाले. 

कर्नाळा पक्षी अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नागझिरा अभयारण्य, आणि मेळघाट व्याघ्रप्रकल्प यांच्या विकासात त्यांनी भरीव योगदान केले.

यासाठी चितमपल्लींच्या बहुभाषिकत्वाचा त्यांना फार उपयोग झाला. मराठी, संस्कृत यांबरोबरच त्यांनी जर्मन, रशियन या भाषांचे अध्ययन केले आणि माहितीचा खजिना निर्माण केला. 

वननिरीक्षण, वनभ्रमण यांतून पक्षितज्ज्ञ म्हणून ख्याती प्राप्त केली. वन्यजीव व्यवस्थापन, वने, वन्यप्राणी आणि पक्षीजगत यांविषयी उल्लेखनीय संशोधन केले. आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग घेतला आणि निबंधवाचन केले.

वनविभागातली नोकरी ही संधी मानून ते निसर्गजीवनाशी समरस झाले. त्यांचे लौकिक व्यक्तित्व आणि वाङ्मयीन व्यक्तिमत्त्व अशा दोन पैलूंतून दर्शन घडते. ते पैलू परस्परांशी संलग्न, विरोधी अथवा तटस्थही असू शकतात. 

चितमपल्लींच्या लौकिक व्यक्तित्वासोबत त्यांचे वाङ्मयीन व्यक्तिमत्त्व समरस झाले आहे, याचा प्रत्यय त्यांच्या ललित लेखनातून येतो.

चितमपल्लींच्या लेखनात त्यामुळे अनुभवाचा अस्सलपणा आहे. संशोधनाच्या निमित्ताने जवळपास तीन तपांहूनही अधिक काळ त्यांनी 'वनवास' भोगला आहे. त्या जीवनाचा आणि वनाचा आनंदानुभव घेतला आहे. या ललित लेखकाचे संपूर्ण भावविश्व जंगलप्रेमाने भरून गेले आहे. 

अरण्यानुभवांचे घबाड त्यांना लाभले आहे. त्यांचे सर्व लेखन अशा अनुभवसंपृक्ततेतून निर्माण झाले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या वनविभागात ढेबेवाडी ते मेळघाट अशी तीस वर्षे त्यांनी सेवा केली. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या उपसंचालक पदावर कार्यरत असताना 1990 साली ते सेवानिवृत्त झाले. 

कर्नाळा पक्षी अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नागझिरा अभयारण्य आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या विकासात त्यांचे विशेष योगदान आहे.

X X

लेखनातील विविध पैलू आणि ललित लेखन:

चितमपल्लींच्या लेखनामागचे चार टप्पे किंवा पैलू सांगता येतील. एक म्हणजे माहिती, दुसरा म्हणजे संशोधन आणि तिसरा म्हणजे अनुवाद ! प्राचीन ग्रंथांचा व भाषांचा अभ्यास आणि चौथा म्हणजे ललित गद्य लेखन होय! शास्त्रीय लेखनाने आपल्या लेखनाची सुरुवात करून तत्संबंधित अनुवादवाटेने त्यांनी आपले अरण्यप्रेम बहुदेशी केले. संस्कृत, मराठी, तेलगू (आईकडून आलेली), इंग्रजी, रशियन, जर्मन, बंगाली, जपानी भाषांशी स्नेह जोडला आणि ललित गद्य लेखनाची वाट चोखाळली. त्यांची अभ्यासूवृत्ती कामातील चिकाटी आणि आत्मीयता यांमुळे त्यांचे लेखन सातत्याने होत गेले. 

X X

रानवाटांची 'माहेरओढ':

चितमपल्लींच्या ललित गद्य लेखनाचा एक गुण असा की, अरण्यविद्येतून मिळालेली शास्त्रीय माहिती अतिशय लालित्यपूर्ण आणि रुचिर शैलीत त्यांनी मांडली. तिला अलंकृत भाषेची, भावपरतेची जोड दिली. 

 जी. ए. कुलकर्णी या कथालेखकाने व्यक्त केलेला अभिप्राय ते म्हणतात, 

 "तुमच्या लेखातील ताजेपणा व निरीक्षणातील नेमकेपणा मला फार आकर्षक वाटला. साधारणपणे अशा प्रसंगी लॅटिन क्लासिफिकेशन सांगून शास्त्रीय नेमकेपणा देत वाङ्मयीन गुणांकडे दुर्लक्ष करण्याची वृत्ती दिसते. (तशी तुमची नाही.) शिवाय मराठीत केवढी शब्दसंपत्ती आहे, याचेही दर्शन तुमच्या लेखातून घडते. निरनिराळी झाडे, पाखरे, वेगवेगळे प्राणी यांची इतकी नवी, जिवंतपणे रुजलेली नावे तुमच्या लेखनात दिसतात की आपणाला मराठी येते का? याबद्दलच मला साशंकता वाटू लागते. याचे कारण म्हणजे केवळ व्यवसाय अथवा शास्त्रीय संकलन यापलीकडे जाणारी आतड्याची एक ओढ तुमच्यात आहे. तुमच्या पावलांना रानवाटांची एक माहेर ओढ आहे." 

गंगाधर गाडगीळ यांनीही असाच उल्लेख केला आहे. ते म्हणतात, 

"मारुती चितमपल्ली हे माझे आवडते लेखक आहेत. त्यांच्या विषयाचे ज्ञान तर त्यांना आहेच, पण त्याबरोबर विषय रोचक व रसपूर्ण पद्धतीने मांडण्याची हातोटीही त्यांच्याजवळ आहे.' "

X X

ग्रंथ संपदा/निर्मिती:

मारुती चितमपल्लीं यांची सुमारे अठरा- वीस पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. त्यात साहित्य प्रसार केंद्र, नागपूर यांचा सहभाग महत्त्वाचा आहे.

1. 'पक्षी जाय दिगंतरा' (1983)
2. 'जंगलचं देणं' (1985)
3. 'रानवाटा' (1991)
4. 'शब्दांचं धन' (1993)
5. 'रातवा' (1993) 
6. 'मृगपक्षिशास्त्र' (1993 अनुवादित)
7. 'घरट्यापलीकडे' (1995) 
8. 'पाखरमाया' (2000)
9. 'निसर्गवाचन' (2000)
10. 'सुवर्णगरुड' (2000)
11. 'आपल्या भारतातील साप' (2000-इंग्रजी, मराठी अनुवादित)
12. 'आनंददायी बगळे' (संस्कृत साहित्यातील काही पक्षी (2000)
13. 'पक्षिकोश' (2000)-पक्षिकोशात 450 पक्ष्यांची माहिती दिली आहे.
14. 'निष्ठावंती' (2000)
15. 'चैत्रपालवी' (2000)
16. 'चकवा चांदणं एक वनोपनिषद' (आत्मकथन 2005) 
17. 'केशराचा पाऊस' (2005) 
18. 'नवेगावबांध' (2010)
19. 'श्यौनिकशास्त्र'
20. 'चित्रकंठ'

X X

साहित्यास मिळालेले पुरस्कार:

मारुती चितमपल्लींच्या साहित्यास अनेक पुरस्कार मिळाले.

1. 'जंगलचं देणं' (1989),'रानवाटा' (1991) व 'रातवा' या पुस्तकांना महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार मिळाले.
2. 'जंगलचं देणं' (1991) यास विदर्भ साहित्य संघ पुरस्कार 
3. 'रानवाटा' (1991) यास भैरूरतन दमाणी साहित्य पुरस्कार 
4. 'रानवाटा' (1991) यास मृण्मयी साहित्य पुरस्कार 
5. फाय फाउंडेशन इचलकरंजी या प्रतिष्ठानद्वारा 1991च्या राष्ट्रीय पुरस्काराने ते सन्मानित झाले. 
6. साहित्य सेवेच्या स्मरणार्थ 14 जानेवारी 1999 रोजी विदर्भ साहित्य संघ, नागपूर यांच्याकडून 'साहित्य-वाचस्पती' पुरस्कार प्रदान करण्यात आला.
7. 'पक्षिकोश' यास शिवगिरिजा प्रतिष्ठान पुरस्कार, कुर्डुवाडी
8. विदर्भ साहित्य संघाचा "जीवनव्रती पुरस्कार" प्रदान करण्यात आला.
9. महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड "सु.ल. गद्रे मातोश्री पुरस्कार" प्रदान करण्यात आला.
10. महाराष्ट्र फाउंडेशन गौरव पुरस्कार
11. पुणे मराठी ग्रंथालय सन्मान व साहित्य पुरस्कार
12. सारथी संस्था नागपूर, यांच्याकडून उत्कृष्ट निसर्ग साहित्याबद्दल "स्क्रोल ऑफ ऑनर"प्रदान करण्यात आला.
13. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील प्रतिष्ठान यांच्यातर्फे जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
14. 1996 मध्ये अखिल भारतीय मराठी विज्ञान परिषद आणि मराठी विज्ञान महासंघ यांच्याकडून "सन्मानपत्र" देऊन गौरव करण्यात आला.
15. वेणू मेमन लाइफटाइम अचीवमेंट अवॉर्ड (2007)
16. नागभूषण पुरस्कार (2008)
17. वसुंधरा सन्मान (2009)
18. भारती विद्यापीठ जीवनसाधना पुरस्कार (2013)

X X

मारुती चितमपल्ली यांना मिळालेले सन्मान:

1. सोलापूर येथे झालेल्या 79व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (2006), 
2. औंदुबर येथील 57व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (14 जानेवारी 2000), 
3. विदर्भ साहित्य संमेलन उमरखेड येथील 51 व्या अधिवेशनाचे अध्यक्ष (2000) 
4. विदर्भ साहित्य संघाचे सन्माननीय सदस्यपद दिले.
5. डॉ. सलीम अली वन्यप्राणी संस्थेचे संस्थापक सचिव
6. राज्य वन्य संरक्षण सल्लागार समिती, सदस्य
7. मराठी अभ्यासक्रम समिती (औरंगाबाद),सदस्य 
8. महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या संचालकपदी कार्य .

X X

मारुती चितमपल्लींचे निसर्ग जीवन दर्शन:

 मारुती चितमपल्ली यांनी पक्षी आणि निसर्ग ह्यांविषयी गेली 35 वर्षे सतत निरीक्षण करून त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. आणि मराठी साहित्य विश्वाला एक नवे परिमाण कारक संशोधनात्मक साहित्य प्राप्त करून दिल्याबद्दल अखिल भारतीय मराठी विज्ञान परिषद आणि मराठी विज्ञान महासंघ यांच्याकडून सन्मानपत्र (1996) देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.  

 मारुती चितमपल्लींचे लेखन कला-जाणिवेने समृद्ध आहे. 'केशराचा पाऊस'मधील (2005) दहा कथा, ललित गद्य कथा, आत्मकथन, व्यक्तिचित्रे, अनुवाद असे विविध प्रकारचे साहित्य त्यांनी निर्माण केले आहे. 

पक्षिशास्त्रज्ञ म्हणून जसे ते ओळखले जातात, तसे ते 'ग्रंथपुण्यसंपत्ती' जपणारा ग्रंथवेडा माणूस म्हणूनही सुपरिचित आहेत. 

आपल्या निसर्गानुभवाला अधिक समृद्ध करण्यासाठी देशोदेशीच्या लेखकांचे कसदार साहित्य त्यांनी मनस्वीपणे आस्वादले आहे. 

अन्य भाषांमधील, निसर्गानुभवावर आधारलेल्या अनुभवास मराठीत आणण्याची जबाबदारी घेतली. त्यासाठी अनुवाद प्रपंच केला. 

त्यात 'भारतातील साप', 'मृगपक्षिशावक' अशा महत्त्वपूर्ण ग्रंथांचा समावेश होतो.

आज मराठी साहित्यसृष्टीला निसर्ग साहित्याचे नवनवे धुमारे फुट आहेत. निसर्ग जीवनाचे सम्यक दर्शन त्यातून घडत आहे. 

मराठी साहित्याचे वनमित्र चितमपल्ली यांच्या ललित प्रतिभेचे हे देणे म्हणावे लागेल. 

निसर्गाची अनुपम देणगी असणारी वने, भोवतालच्या प्रदेशाला पाचूचे वैभव देणारे जलस्रोत, अमर्याद सागर, आकाशाची निळाई, सुजलसुफळ सस्यश्यामल धरणी तिच्या अंगाखांद्यावर वाढणारी अद्भुत जीवसृष्टी, विविध आकार आणि स्वभावाची वनचरे, नाना रंग व बोलींचे पक्षी, त्यांचे सहजीवन, ऋतुचक्रांची बदलत जाणारी वैशिष्ट्ये, सृष्टीचे मनोहर विभ्रम आणि जनन-मरण सोहळे या सर्वांशी अभिन्न असे नाते असलेला निसर्ग-निर्भर माणूस आणि त्याची वनविद्या असे अनोखे जग चितमपल्लींच्या साहित्यातून सजीवपणे प्रकटले आहे.

मारुती चितमपल्ली ज्या-ज्या प्रदेशातील अरण्यात ते राहिले, तिथले मूळ रहिवासी गोंड, आदिवासी, कोरकू, आदी जंगलवासींशी त्यांचे मैत्र झाले. 

त्यांची त्यांनी लोभस व्यक्तिचित्रे रेखाटली. लोकसाहित्याशी त्यांच्या लेखनाचा असलेला अतूट धागा हा त्यांच्या लेखनाचा एक आगळा आविष्कार आहे.

X X

मारुती चितमपल्ली :एक ललित लेखक

मराठी साहित्याला निसर्ग हा काही नवीन नव्हता. मानवी भावभावनांनी आरोपित असा निसर्ग, पार्श्वभूमी किंवा परिणामद्रव्य म्हणून येणारा निसर्ग, मराठी साहित्याला परिचित होता. 

आपल्या अनुभवदर्शनासाठी ललित लेखकांनी निसर्गाचा असा कलात्मक जाणिवेतून उपयोग करून घेतला होता.

एक ललित लेखक म्हणून निसर्गाकडे पाहण्याचा चितमपल्ली यांचा दृष्टिकोन याहून भिन्न आहे. निसर्ग चैतन्यमय आहे. 

आपल्या अंगभूत वैशिष्ट्यांनी तो समृद्ध आहे. त्याला स्वतंत्र असे व्यक्तिमत्त्व आहे. त्याचे रसवैभव नित्यनूतन आहे आणि हे चैतन्यमय निसर्गजीवन अखंड वाहते आहे. या जीवनाशी माणसाचा निकटचा संबंध आहे. नव्हे, तो या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. हे निसर्गभान आणि व्यापक असे जीवनभान त्यांच्या निसर्गानुभवामागे आहे. ते त्यांच्या साहित्यातही प्रतिबिंबित झाले आहे.

 चितमपल्ली हे निसर्ग आणि मानव यांचे नाते ओळखणारे वनमहर्षी आहेत. जंगलाविषयीच्या गाढ अनुभवातून हे जीवनसूत्र त्यांना गवसले आहे. त्यामुळे त्यांचे सर्व साहित्य निसर्ग आणि माणूस यांच्या अन्वय स्थळांचे उत्तम दर्शन घडवते. 

चितमपल्लींचा हा दृष्टिकोन त्यांच्या साहित्याला वेगळेपण प्राप्त करून देतो.

त्यांची भाषाशैली निरलंकृत, सरळ व सुबोध आहे. त्यांच्या चिंतनशील वृत्तीचे प्रतिबिंब त्यांच्या या सुगम निवेदनात स्पष्टपणे पडते. त्यांच्या ललित लेखनाची भाषा काव्यात्म आहे. 

स्वभावतःच सुंदर, एका अर्थाने जंगलचे देणे आहे, ती निसर्गबोली आहे. निसर्गानुभवाच्या आश्रयाने ती व्यक्त होते. वन्यजीवनाशी संबंधित कितीतरी नवीन शब्द, नावे येतात. 

भाषेला अर्थवाही करण्यातही त्यांची ही शैली, त्यातले अर्थवाहकत्व मनाला भिडते. त्यामागल्या कथा निसर्गाचा वेगळा अन्वय लावून दाखवतात. 

पर्यावरण प्रबोधनाच्या जाणिवाही चितमपल्लींच्या लेखनातून कधी अगदी थेट तर कधी सूचकतेने व्यक्त झाल्या आहेत. 

X X

मारुती चितमपल्ली: "वनोपनिषद" आत्मकथन

आपल्या ललित लेखनातून अद्भुत, रंजक आणि ज्ञानवर्धक अशी निरीक्षणे ते नोंदवतांना दिसतात. त्याला संशोधनाचा, सूक्ष्म निरीक्षणाचा आधार असतो.

 'पक्षिकोश', 'आनंददायी बगळे', 'रातवा', 'पाखरमाया' यांमधील अनेक विलक्षण नोंदी याचा प्रत्यय देतात. 

'चकवा चांदणं: एक वनोपनिषद' हे त्यांचे आत्मकथन वेगळ्या वाटेवरचे आगळ्या पद्धतीचे आत्मकथन आहे.

डॉ. सुहास पुजारी म्हणतात, 

"चितमपल्लींचे लेखन हे एका अर्थाने 'निसर्गाचे लीलाचरित्र' होय."

मारुती चितमपल्ली म्हणतात,

 "वनविभागातली नोकरी काही मी ठरवून स्वीकारलेली नव्हती. चुकून आडवाटेच्या रानात आलो आणि चालत असताना मला आयुष्याची सुंदर वाट सापडली. "

 अशा वेगळ्या जीवन सौंदर्याचे दर्शन या आत्मचरित्रातून मांडले आहे.

चितमपल्ली यांनी मराठी साहित्यात आपल्या निसर्ग साहित्य लेखनाने अधिक समृद्ध बनवले. 

अनुभव आणि आविष्कार या दोन्ही पातळ्यांवर हे दिले. त्यात नावीन्य पूर्णता आहे, ताजेपण आहे, जीवनाकडे पाहण्याची निकोप दृष्टी या निसर्गदृश्यातून मिळते. 

चितमपल्ली यांच्या ह्या सर्व साहित्य लेखनामुळे मराठी साहित्यात निसर्ग-चित्रणाची 'हिरवी वाट' निर्माण झाली आहे असे अनेक साहित्यिकाला वाटते. त्यांच्या निसर्गपर लेखनाने मराठी साहित्यात निसर्गसाहित्याची ही पहाट झाली आहे.

 मराठी साहित्यात, विशेषतः कविता, कादंबरी, कथा या साहित्यप्रकारांत निसर्गचित्रे चित्रित झालेली आहेत. 

निसर्ग-लेखक चितमपल्ली यांनी अशा लेखनातून आपल्या नावाची मुद्रा मराठी साहित्यात निर्माण केलेली आहे.

अशा साहित्यकृतींतून अरण्यानुभवांचे व वनविद्येचे अचंबा वाटावे असे कलापूर्ण चित्रण आले आहे. त्यांच्या साहित्यसंपदेने मराठी साहित्यातील अनुभवाचे क्षितिज विस्तारले. या अनुभवसमृद्ध लेखनाने मराठी साहित्यसृष्टीला एक नवे साहित्य मिळाले.(संदर्भ :१. चितमपल्ली मारुती; 'चकवाचांदण एकवनोपनिषद; मौज प्रकाशन गृह, मुंबई.)



                   पक्षिशास्त्रज्ञ

X X




View, Comments and share......

Post a Comment

4 Comments