Shivaji Sawant: Marathi Novelist
शिवाजी सावंत: मृत्युंजयकार साहित्यिक,ख्यातनाम मराठी कादंबरीकार
31 ऑगस्ट : जन्मदीन
18 सप्टेंबर: स्मृतीदिन
जीवन व शिक्षण
ख्यातनाम मराठी कादंबरीकार,मृत्युंजयकार साहित्यिक शिवाजी गोविंदराव सावंत यांचा जन्म 31 ऑगस्ट 1940 रोजी सामान्य शेतकरी कुटुंबात, कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा गावात झाला.
प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण आजऱ्यात झाल्यावर त्यांनी कोल्हापुरात बी.ए.चे प्रथम वर्ष पूर्ण केले आणि मग वाणिज्य शाखेतील पदविका (GCD) घेतली.
ते उत्कृष्ट कबड्डीपटू होते. टायपिंग, शॉर्टहँडचा कोर्स करून त्यांनी कोर्टात कारकुनाची नोकरी केली.
x x
शिवाजी सावंत: साहित्य निर्मिती
शिवाजी सावंत 1962 ते 1974 या काळात कोल्हापुरातील राजाराम प्रशालेत शिक्षक होते.
‘राजाराम प्रशाले’त अध्यापन करीत असतानाच त्यांनी मृत्युंजय (1967) ही आपली पहिली कादंबरी लिहिली.
हिंदीतील केदारनाथ मिश्र ह्यांचे कर्ण आणि रामधारी सिंह ‘दिनकर’ ह्यांचे रश्मिरथी ह्या दोन खंडकाव्यांचा त्यांनी मृत्युंजयच्या प्रस्तावनेत कृतज्ञतापूर्वक उल्लेख केलेला आहे.
ह्या कादंबरीत कर्णाच्या अंतरंगात शिरून त्याच्या मनोविश्वाचा शोध घेण्याचा प्रगल्भ प्रयत्न त्यांनी केला आहे.
महाभारताच्या विराट विश्वातून कर्णाला त्याच्या दुःखी, यातनामय आयुष्याला त्याच्या अनेक संदर्भांसह वेगळे करून त्यांनी त्याची प्रतिमा साकारली आहे.
कर्णामध्ये त्याच्या जन्माच्या आणि त्यानंतरच्या आयुष्यातील अपमानास्पद घटनांच्या प्रभावातून काही दोष निर्माण झालेले असले, तरी तो एक सत्प्रवृत्त, समर्पणशील पण स्वाभिमानी पुरुष आहे.
ज्या कुटुंबात तो आला, त्या कुटुंबातली सर्व नाती तो अत्यंत प्रेमाने आणि जबाबदारीने सांभाळतो.
X X
गुरुजनांबद्दल त्याच्या मनात कृतज्ञता आहे. मैत्रीसाठी तो आपले सर्वस्व अर्पण करतो. त्याच्या व्यक्तिमत्त्वाची ही प्रकाशमय बाजू त्यांनी समर्थपणे मांडली. ह्या कादंबरीला वाचकांचा फार मोठा प्रतिसाद मिळाला.
त्यांच्या ह्या पहिल्याच कादंबरीने प्रभावी कादंबरीकार म्हणून त्यांची प्रतिमा प्रस्थापित झाली.
बहुतेक भारतीय भाषांतून ती अनुवादिली गेली. तिचा इंग्रजी अनुवादही झाला आणि मृत्युंजयकार ही उपाधीही त्यांना लाभली.
1974 मध्ये ते पुण्यास स्थायिक झाले. तेथे महाराष्ट्र शासनाच्या शिक्षणखात्याच्या लोकशिक्षण ह्या मासिकाचे संपादक म्हणून त्यांची नियुक्ती झाली.
1983 मध्ये या मासिकाच्या संपादक त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली.
X X
छावा (1979) आणि युगंधर (2000) ह्या त्यांच्या त्यानंतरच्या कादंबऱ्या. छावा ही संभाजी महाराजांच्या जीवनावरची, तर युगंधर ही भगवान श्रीकृष्णाच्या जीवनावरची कादंबरी आहे.
भव्योदात्त जीवनांबद्दल त्यांना वाटणारा आदर मृत्युंजय ते युगंधर पर्यंतच्या त्यांच्या तीनही कादंबऱ्यांमधून उत्कटपणे प्रकट होतो.
छावामध्ये जनमानसात संभाजी महाराजांबद्दल निर्माण झालेली नकारात्मक स्वरूपाची प्रतिमा पुसून त्या जागी औरंगजेबाने दिलेल्या क्रूर मृत्युदंडाच्या शिक्षेला धीरोदात्तपणे सामोरे जाणारे, आपले राजेपद जबाबदारीने आणि विवेकाने सांभाळणारे संभाजी महाराज ते उभे करतात.
त्यासाठी संभाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि त्यांच्या भोवतालच्या परिस्थितीचा ते मानसशास्त्रीय अंगाने विचार करतात. भारतीय ज्ञानपीठाने ह्या कादंबरीचे हिंदी भाषांतर प्रसिद्घ केले आहे.
x x
श्रीकृष्णाच्या जीवनातले जे चमत्कार सांगितले जातात, ते वगळून श्रीकृष्ण दाखविणे हा युगंधर लिहिण्यामागचा त्यांचा हेतू होता.
श्रीकृष्णासारखा एक माणूस भगवानपदापर्यंत पोहोचतो त्याचप्रमाणे श्रीकृष्णासारखे आचरण आपण करू शकू असा विश्वास सर्वसामान्य माणसातही निर्माण होण्याची शक्यता आहे हे लक्षात घेऊन तो विश्वास जागृत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण केला आहे, असे त्यांचे प्रतिपादन होते.
जीवनमूल्य नष्ट होत असताना आणि त्यामुळे सामाजिक विघटनाचा अनुभव येत असताना भारतीय मिथकांचा आणि इतिहासाचा आधार घेऊन मानवी जीवनातील आत्मिक शक्तींचा त्यांनी आपल्या कादंबऱ्यांतून पुरस्कार केला.
ह्या व्यतिरिक्त सावंत यांनी जे लेखन केले, त्यांत लढत (दोन भाग–1986) आणि संघर्ष (1995) ह्या दोन जीवनकहाण्यांचा अंतर्भाव होतो.
लढत ही सहकारमहर्षी विठ्ठलराव विखे-पाटील ह्यांची, तर संघर्ष ही प्रसिद्घ कामगारनेते मनोहर कोतवाल ह्यांची जीवनकहाणी.
आपल्या जीवनात हाती घेतलेल्या कामासाठी ध्यास घेऊन काम करणारी ही माणसे त्यांना चरित्रकथनासाठी योग्य वाटली. ह्यात त्यांची उदात्ततेकडे पूर्णपणे झुकलेली मानसिकता पुन्हा एकदा प्रत्ययास येते.
x x
अशी मने असे नमुने (1975) आणि मोरावळा (1998) मध्ये त्यांनी वेगवेगळ्या माणसांची व्यक्तिचित्रे रेखाटली आहेत.
अशी मने असे नमुने मध्ये त्यांच्या जीवनाशी एकरूप झालेली, त्यांच्यावर प्रेम करणारी, निर्मळ मनाची माणसे त्यांनी रंगविलेली आहेत,
मोरावळामध्ये त्यांना भेटलेली शिक्षण, समाजकारण, राजकारण, प्रकाशन, साहित्य अशा क्षेत्रांतील कर्तृत्ववान माणसे त्यांनी शब्दचित्रित केली आहेत.
प्रकाशक अनंतराव कुलकर्णी, साहित्यिक ग. दि. माडगूळकर, ना. सं. इनामदार, शिक्षणाच्या क्षेत्रातील अशोक गगराणी, राजकीय नेते यशवंतराव चव्हाण ही मोरावळामधील काही व्यक्तिचित्रे होत.
सावंत यांनी ही दोन पुस्तके लिहून मराठीतील व्यक्तिचित्रणात्मक साहित्य अधिक संपन्न केले.
शेलका साज (1994) मध्ये त्यांचे ललित लेख अंतर्भूत आहेत.
X X
शिवाजी सावंत : प्रकाशित साहित्य
1. अशी मने असे नमुने (व्यक्तिचित्रे -1975)
2. कवडसे (ललित निबंध)
3. कांचनकण (ललित निबंध)
4. छावा (छत्रपती संभाजीच्या जीवनावरील कादंबरी -1979)
5. छावा (नाट्यरूपांतर)
6. पुरुषोत्तमनामा
7. मृत्युंजय (महारथी कर्णाच्या जीवनावरील कादंबरी -1967)
8. मृत्युंजय (नाट्यरूपांतर)
9. मोरावळा (व्यक्तिचित्रे -1998)
10. युगंधर (भगवान श्रीकृष्णाच्या जीवनावरील कादंबरी -2000
11. युगंधर श्रीकृष्ण : एक चिंतन
12. लढत (सहकारमहर्षी विठ्ठलराव विखे पाटील यांचे चरित्र, दोन भागांत -1986)
13. शेलका साज (ललित निबंध-1994)
14. संघर्ष (कामगार नेते मनोहर कोतवाल यांचे चरित्र -1995)
x x
शिवाजी सावंत : सन्मान/पुरस्कार
1.'मृत्युंजय’साठी पुरस्कार
'मृत्यूंजय’ ही कादंबरी इंग्रजी, कन्नड, गुजराती, मल्याळी इ. भाषांमध्ये प्रसिद्ध झाली. या कादंबरीला महाराष्ट्र, गुजरात व पश्चिम बंगाल या राज्यशासनांचे पुरस्कार
1. महाराष्ट्र राज्य पुरस्कार (1967)
2. न. चिं. केळकर पुरस्कार (1972)
3. ललित मासिकाचा पुरस्कार (1973)
4. भारतीय ज्ञानपीठाचा ‘मूर्तिदेवी पुरस्कार’ (1994)
5. फाय फाउंडेशन पुरस्कार (1996)
6. आचार्य अत्रे विनोद विद्यापीठ पुरस्कार (1998)
7. पूनमचंद भुतोडिया बंगाली पुरस्कार (ताम्रपटासह, कलकत्ता -1986)
8. 'मृत्युंजय’च्या प्रतिमा दवे यांनी केलेल्या गुजराती भाषांतराला, गुजरात सरकारचा साहित्य अकादमी पुरस्कार (1990)
X X
9. गुजराती भाषांतराला केंद्रीय साहित्य अकादमी पुरस्कार (1993)
2. "छावा"साठी पुरस्कार: महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार (1980)
3. बडोदे मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद (1983)
4. पुणे महापालिकेतर्फे सन्मानपत्र (1997)
5. कोल्हापूर येथे 1998 मध्ये भरलेल्या सातव्या कामगार साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद
6. पुणे विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार (10 फेब्रुवारी 2000)
7. ‘कोल्हापूरभूषण’ पुरस्कार (2 मार्च 2000)
8. महाराष्ट्र सरकारचा जीवनगौरव हा साहित्यिक सन्मान (मे 2000)
9. भारत सरकारच्या मानव संसाधन व सांस्कृतिक कार्यालयाकडून त्यांना ज्येष्ठ साहित्यिक शिष्यवृत्ती देण्यात आली होती.
10. नवी दिल्ली येथील भारतीय ज्ञानपीठाचा 'मूर्तिदेवी पुरस्कार' दि. 6 फेब्रुवारी 1996 रोजी उपराष्ट्रपती डॉ. के. आर. नारायणन यांच्या हस्ते दिल्लीत समारोहपूर्वक प्रदान.
X X
निधन
कऱ्हाड येथे भरणाऱ्या 76व्या 'अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना'च्या अध्यक्षपदाचे ते उमेदवार होते.
आपल्या उमेदवारीच्या प्रचारासाठी गोव्यात गेले असताना मडगाव येथे, शिवाजी सावंत यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने 18 सप्टेंबर 2002 रोजी निधन झाले.
x x
शिवाजी सावंत स्मरणार्थ पुरस्कार
1. शिवाजी सावंत याच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुणे येथे मृत्युंजय प्रतिष्ठान स्थापन करण्यात आले आहे. या प्रतिष्ठानातर्फे दर वर्षी 'मृत्युंजकार शिवाजीराव सावंत स्मृति साहित्य आणि स्मृति समाजकार्य’या नावाचे दोन पुरस्कार देण्यात येतात.
2. शिवाजी सावंत याच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या जन्मगावी श्रीमंत गंगामाई वाचन मंदिराच्या वतीने प्रतिवर्षी ‘मृत्युंजयकार शिवाजी सावंत कादंबरी पुरस्कार’ दिला जातो.
(संदर्भ : वाघ, शांताराम, मृत्युंजयकार शिवाजी : व्यक्ती आणि साहित्य, पुणे, 2001.)
X X
View, comments and Share
4 Comments
Nice
ReplyDeleteVery nice information
ReplyDeleteNice information
ReplyDelete👍👍
ReplyDelete