एक श्रेष्ठ राजा व सेनापती धर्मसहिष्णू सम्राट कनिष्काचा साम्राज्यविस्तार
राज्यारोहणानंतर त्याने प्रथम काश्मीरवर लक्ष केंद्रित केले. काश्मीर जिंकल्यानंतर त्याची आठवण म्हणून त्याने काश्मीरमध्ये 'कनिष्कपूर' नावाचे एक शहर वसवले. ते शहर आज 'कानसपूर' या नावाने ओळखले जाते.
काश्मीरचा इतिहास लिहिणारा कल्हण याने 'राजतरंगिणी' या ग्रंथात कनिष्कच्या काश्मीर विजयाचा वृत्तांत दिला आहे.
मगध साम्राज्यावर पाटलीपुत्र शहरापर्यंत कनिष्काने आक्रमणे केली. मगधवर त्याने जे आक्रमण केले त्याबाबत इतिहासकारांत मतभेद आहेत. 'बुद्धचरित' लिहिणारा अश्वघोष हा बौद्ध परंपरेनुसार पाटलीपुत्राचा रहिवासी होता.
कनिष्काने या आक्रमणाच्या वेळी त्याला आपल्याबरोबर नेले. पुढे हा अश्वघोष कनिष्काच्याच दरबारी होता. कनिष्काची नाणी वं शिक्के या परिसरात सापडले असल्याने पाटलीपुत्र शहर व त्यांचा परिसर त्याच्या ताब्यात असावा असा निष्कर्ष निघतो.
काशगर, यारकंद, खेतान, काबूल व बॅक्ट्रिया हे मध्य व पश्चिम आशियातील प्रदेश त्याने जिंकून घेतले होते. या सर्व प्रदेशांत त्याची नाणी सापडली आहेत.
माळवा, सौराष्ट्र, राजपुताना हा प्रदेशही कनिष्काने जिंकला होता.
वायव्य सरहद्द प्रांत, सिंध, पंजाब, उत्तर प्रदेश हे प्रदेश कनिष्काच्या ताब्यात होते. तेथे त्याची नाणी सापडली आहेत.
X X
कनिष्क - चीन संबंध
चीनने कनिष्काविरुद्ध 'पॅन चाऊ' या सेनापतीच्या नेतृत्वाखाली एक आघाडी उघडली. सम्राट कनिष्काने ही आघाडी रद्द करावी अशी सूचना आपल्या दूतामार्फत केली; पण चीनने त्याच्या दूतालाच अटक केली तेव्हा स्वतः सम्राट कनिष्काने 'पॅन-चाऊ'च्याविरुद्ध मोहीम उघडली. दोघात युद्ध होऊन त्यात कनिष्क पराभूत झाला. कनिष्काला खंडणी द्यावी लागली. पण पुढे 'पॅन-चाऊ' चा मृत्यू झाला. त्याच्या जागी त्याचा पुत्र 'पॅन याँग' हा सेनापती झाला. त्यावर कनिष्काने हल्ला करून त्याला पराभूत केले व चीनला देण्यात येत असलेली खंडणी कायमची बंद केली. एवढेच नव्हे तर पॅन याँगकडून दुप्पट खंडणी वसूल केली. एकंदरीत कनिष्काला या मोहिमेत मोठा लाभ झाला.
कनिष्क हा भारत व भारताबाहेरील प्रदेशांत साम्राज्यविस्तार करण्यात गुंतला आहे हे पाहून प्रथमतः पर्शियनांनी व नंतर शकांनी त्याच्या राज्यावर हल्ले केले. कनिष्काने त्यांचा पराभव करून जिंकून घेतलेला प्रदेश यशस्वीपणे आपल्या ताब्यात ठेवला.
पुरुषपूर (पेशावर) हे कनिष्काच्या राजधानीचे स्थळ होते. कनिष्काचे जे एकूण साम्राज्य होते त्याच्या मध्यवर्ती ठिकाणी हे स्थळ होते. कनिष्काने प्रचंड भूप्रदेश जिंकले होते. त्याचे साम्राज्य पूर्वेकडे बिहार, पश्चिमेकडे खोरासन, बॅक्ट्रिया, अफगाणिस्तान, उत्तरेकडे खेतान, दक्षिणेकडे कोकणपर्यंत होते. जवळपास संपूर्ण उत्तर भारत, मध्य भारत व पश्चिम आशियातील मोठा भूप्रदेश त्याच्या ताब्यात होता.
कनिष्काची प्रशासन व्यवस्था
कनिष्काच्या प्रशासन व्यवस्थेची सविस्तर माहिती मिळत नाही. त्याने आपल्या साम्राज्याचे अनेक विभागांत प्रांतांत विभाजन केले. प्रत्येक प्रांतावर क्षत्रप व महाक्षत्रप असे अधिकारी नियुक्त केले होते. त्याशिवाय दंडनायक व महादंडनायक असे दोन अधिकारीही होते. त्याच्या शासन व्यवस्थेवर ग्रीक व शकांच्या शासन व्यवस्थेचा प्रभाव होता.
क्षत्रप व महाक्षत्रप या अधिकाऱ्यांचे अधिकार व कार्यक्षेत्र याबद्दल सविस्तर माहिती उपलब्ध नाही; परंतु प्रत्येक प्रांतासाठी क्षत्रप व क्षत्रपावर देखरेख ठेवण्यासाठी महाक्षत्रप असावेत. सारनाथ येथील शिलालेखावरून त्याच्या शासन व्यवस्थेची थोडीशी माहिती मिळते.
कनिष्काच्या साम्राज्याच्या वायव्य भागात क्षेत्रप वेश्यपी व लियाक हे दोघे क्षत्रप म्हणून राज्य करत होते. गुजरात, माळवा व काठेवाड येथील शहरात वंशीय शक, क्षत्रप, भूमक याची नियुक्ती कनिष्कानेच केली होती. महत्त्वाच्या प्रशासकीय जबाबदाऱ्या कुशाण लोकांवरच टाकल्या जात; पण स्थानिक प्रशासन मात्र स्थानिक लोकांच्या हाती होते.
X X
कनिष्काचे धार्मिक धोरण - धर्मसहिष्णू सम्राट
कनिष्काचा प्रारंभीच्या काळातील धर्म कोणता हे निश्चित सांगता येत नाही. त्याच्या नाण्यांवर ग्रीक, इराणी, हिंदू व बौद्ध देवदेवतांच्या प्रतिमा आहेत.
कनिष्काच्या साम्राज्यात भिन्न भिन्न धर्माचे प्रदेश समाविष्ट असल्याने त्याने त्या त्या प्रदेशातील देवतांच्या प्रतिमा नाण्यांवर कोरल्या असाव्यात. परंतु त्यावरून त्याचा धर्मसहिष्णुपणा सिद्ध होतो हे निश्चितच.
सम्राट कनिष्काने बौद्ध धर्म कोणाच्या प्रभावामुळे व कोणत्या वर्षी स्वीकारला हे मात्र निश्चित सांगता येत नाही.
अश्वघोष हा त्याच्या दरबारी होता. त्यामुळे अश्वघोषाच्या प्रभावामुळे त्याने बौद्ध धर्म स्वीकारला असावा. कनिष्काने आयुष्याच्या उत्तरार्धात बौद्ध धर्म स्वीकारला असला तरी त्याने इतर धर्मीयांचाही आदर केला. म्हणून तो धर्मसहिष्णू सम्राट म्हणूनच ओळखला जातो.
सम्राट कनिष्काने बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी खालील पावले उचलली.
१) बौद्ध विहारांची डागडुजी केली.
२) गौतम बुद्धाच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या ठिकाणी बौद्ध चैत्य व विहार नव्याने बांधले.
३) पेशावर येथील जगप्रसिद्ध विहार त्याने बांधला. हा विहार ४०० फूट उंचीचा, १३ मजली व लाकडी होता. पुढे हा विहार अनेक शतके अस्तित्वात होता. हर्षवर्धनच्या काळात ह्यू-एन-त्संग या चिनी प्रवाशाने या विहाराचे वर्णन केले आहे. नवव्या शतकातील एका शिलालेखातही त्याचा उल्लेख आहे..
४) कनिष्ठाने बौद्ध संघांना मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केली.
५) अशोकाप्रमाणेच त्याने देशोदेशी बौद्ध धर्मप्रचारक पाठवले. म्हणूनच कनिष्ठाय काव्यात जपान, चीन, तिबेट व मध्य आशियातील अनेक देशांत बौद्ध धर्मा विशेष प्रभाव जाणवत होता.
६) सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या असंख्य मूर्ती कनिष्काच्या काळात बनवल्या गेल्या महायान पंथाच्या वाढीबरोबरच बुद्ध व बोधिसत्त्व यांच्या मूर्तीना बहर आला कुशाण काळाच्या प्रारंभी ज्या बुद्धमूर्ती बनल्या त्यांच्यावर गांधार कलाशैलीच प्रभाव होता.
७) सम्राट कनिष्काने प्रसिद्ध बौद्ध भिक्षु अश्वघोष, नागार्जुन, वसुमित्र व पार्श्वनाथ यांना आश्रय दिला होता.
८) चौथी बौद्ध धर्म परिषद सम्राट कनिष्काने बौद्ध धर्मातील पंचभेद मिटवण्यासाठी व बौद्ध धर्मतत्त्वांविषयी चर्चा करण्यासाठी चौथी बौद्ध धर्म परिषद बोलावली. ही परिषद कोठे भरली त्याबाबत एकमत नाही. काश्मीरमध्ये श्रीनगरजवळ कुंदनवन येथे ही परिषद भरली असे एक मत आहे तर पंजाबमध्ये जालंधर येथे हो परिषद भरली असे दुसरे मत आहे. या बौद्ध धर्मपरिषदेसाठी ५०० प्रतिनिधी हजर होते. परिषदेचे अध्यक्षपद वसुमित्र बाच्याकडे होते तर उपाध्यक्ष अश्वघोष हा होता. या परिषदेत बौद्ध धर्माविषयी पुन्हा एकदा विस्ताराने चर्चा झाली. बौद्ध ग्रंथांपैकी 'सूत्तपिटक' या ग्रंथावर भाष्य देणारे वृत्तांत लिहिले गेले. 'महाविभाष' हा बौद्ध धर्मतत्त्वज्ञानाचे विवेचन करणारा सर्वात महत्त्वाचा ग्रंथ लिहिला गेला. हा ग्रंथ म्हणजे बौद्ध धर्मतत्त्वज्ञानाचा ज्ञानकोशच होय. या धर्मपरिषदेत जी चर्चा झाली किंवा जे निर्णय झाले ते सर्व ताम्रपटावर लिहून तो ताम्रपटरूपी ग्रंथ जमिनीत गाडून ठेवला अशी आख्यायिका आहे. हा ताम्रपटरूपी ग्रंथ जर भविष्यकाळात उत्खननात सापडला तर या परिषदेच्या कामकाजावर अधिक प्रकाश पडेल यात शंकाच नाही.
चौथ्या धर्मपरिषदेस फक्त कनिष्काच्याच नव्हे तर बौद्ध धर्माच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. कारण या परिषदेत महायान पंथाचा उदय झाला. बौद्ध धर्माने मूर्तिपूजेचा स्वीकार केला व धर्मप्रसाराचे माध्यम म्हणून संस्कृत भाषेचा स्वीकार केला, गौतम बुद्धाने सांगितलेल्या मूळ तत्वज्ञानात व अष्टांगमार्ग आचरणाबाबत सांगितलेल्या मूळ नियमात काही परिवर्तन झाले. बुद्ध मूर्तीची पूजा सुरू झाली. अष्टांगमार्गाचे आचरण करण्याऐवजी बुद्धावरची श्रद्धा, भक्ती यांना महत्त्व प्राप्त झाले 'प्रज्ञापरमिता' या ग्रंथामध्ये महायान पंथाची तत्त्वे स्पष्टपणे मांडली आहेत. या ग्रंथाची मूळ प्रत उपलब्ध नसली तरी इ.स. १४८ सालातले लोकरक्षा या चिनी बौद्ध भिक्खूने केलेले भाषांतर सापडले आहे. महायान पंथाने सर्व मानव समाजाच्या निर्वाणाचा विचार प्रचलित केला. सामूहिक उपासनेचा मार्ग त्यातूनच पुढे प्रभावी झाला. 'प्रज्ञापरमिता' या ग्रंथातून निर्वाणप्राप्तीसाठी प्रार्थना, मंत्र याचा उपयोग होऊ शकतो हा विचार मांडला. नागार्जुन, असंग, अश्वघोष यांनी ग्रंथनिर्मिती करून महायात पंथाचा विचार समाजात अधिक प्रबळ केला.
कनिष्क विद्या व विद्वानांचा भोक्ता
स्वतः कनिष्क संस्कृतचा गाढा अभ्यासक होता. कनिष्काच्या काळात संस्कृत वाङ्मयात खूप भर पडली. तत्त्वज्ञ, कवी, नाटककार अश्वघोष हा कनिष्काच्या दरबारात होता.
अश्वघोषाने 'बुद्धचरित' आणि ‘सूत्रालंकार' हे ग्रंथ त्या काळात रचले. कनिष्काच्या दरबारातील दुसरी एक प्रसिद्ध व्यक्ती म्हणजे नागार्जुन होय. तो तत्त्वज्ञ व वैज्ञानिक होता. वसुमित्र हा एक साहित्यिक होता. त्याने 'महाविभाषशास्त्र' हा ग्रंथ लिहिला. आयुर्वेदशास्त्राचा मेरूमणी चरक हाही त्याच्या दरबारी होता. माथुर नावाचा एक प्रसिद्ध राजनीतिज्ञ त्याच्या दरवारी होता. ग्रीक इंजिनिअर अगलिससला त्याने आपल्या दरबारी ठेवले होते.
कनिष्काचे आर्थिक क्षेत्रातील योगदान
कनिष्काचा काळात भारताचे रोम, मध्य आशिया, चीन वगैरे देशांशी व्यापारी संबंध होते. भारतीय संस्कृतीचा, धर्माचा प्रभाव इतर देशांवर पडून त्यांना भारताबाबत आकर्षण वाटू लागले. "विलासाची साधने भारतातून आयात करण्यातच रोमचा पैसा खर्च होत असे" असे रोमन लेखक प्लिनी याने लिहून ठेवले आहे.
विशेषतः हस्तिदंत, मोती, गहू, तांदूळ, तूप, तिळाचे तेल, सुती व रेशीम कापड इ. ची भारतातून निर्यात होई तर तांबे, दारू इ. ची आयात होई. भारतातील चैनीच्या वस्तूंनी रोमची बाजारपेठ काबीज केली होती. त्यामुळे भारताकडे विदेशी संपत्तीचा ओघ सुरू झाला. आंतरराष्ट्रीय व्यापार हा आर्थिक सुबत्तेचा कणा आहे हे सर्वप्रथम कुशाणांनी ओळखले होते यातच त्यांचे श्रेष्ठत्व सामावलेले आहे.
सम्राट कनिष्काला दुसरा अशोक संबोधतात योग्य/अयोग्य
सम्राट कनिष्काची तुलना अशोकाशी केली जाते व त्याला 'दुसरा अशोक' असे म्हटले जाते. कनिष्क व अशोक यांच्यात खालील बाबतीत साम्य होते.
१) कनिष्क व अशोक हे दोघे प्रारंभीच्या काळात बौद्ध धर्माचे अनुयायी नव्हते. अशोक हिंदू धर्माचा अनुयायी तर कनिष्क विविध देशी-विदेशी धर्मावर श्रद्धा असणारा होता.
२) दोघांनीही बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यानंतर शासन यंत्रणा बौद्ध धर्मप्रसारासाठी वापरली.
३) दोघेही उत्तम प्रशासक होते. लोककल्याणकारी राज्यव्यवस्थेचे पुरस्कर्ते होते.
४) दोघांनीही परदेशांत धर्मप्रसारक पाठवले होते.
५) बौद्ध धर्मप्रसारासाठी दोघांनीही कला, स्थापत्याचा उपयोग करून घेतला.
६) अशोकाच्या काळात तिसरी बौद्ध परिषद पाटलीपुत्र येथे भरली तर कनिष्काच्या काळात चौथी धर्म परिषद काश्मीरमध्ये कुंदनवन येथे भरली.कनिष्क व अशोक यांच्यात वरील साम्य असले तरी दोघांत वेगळेपणही होते. व अशोक हा कनिष्कापेक्षा निश्चितच श्रेष्ठ होता.
१) अशोक बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर आदर्श, ऋषितुल्य जीवन जगला तसे कनिष्क जगला नाही.
२) अशोकाने कलिंग युद्धानंतर शस्त्रे, युद्धाचा कायमचा त्याग केला. कनिष्काने तो केला नाही. साम्राज्यविस्ताराचे काम कनिष्क शेवटपर्यंत करत होता.
३) अशोक हीनयानपंथीय होता तर कनिष्क महायान पंथीय होता.
४) सत्य, अहिंसा, प्रज्ञा, करुणा, शांतता, धर्मविजयाचे धोरण इ. बाबतीत अशोकाची तुलना कनिष्काशी करता येत नाही. त्या गुणांचा कनिष्कात अभावच होता. म्हणून "Kanishka was not as great as Ashoka" असे म्हटले जाते.
कनिष्काची योग्यता
एक श्रेष्ठ राजा व सेनापती या नात्याने कनिष्काची योग्यता निश्चितच श्रेष्ठ होती. कनिष्काने स्वतःच्या पराक्रमाने संपूर्ण उत्तर भारत, पश्चिम व मध्य आशियातील देश स्वतःच्या वर्चस्वाखाली आणले. जरी दक्षिण भारत त्याच्या वर्चस्वाखाली नसला तरी त्याच्या एकूण साम्राज्याच्या सीमा/विस्तार पाहता कोणत्याही भारतीय राजापेक्षा त्याचे राज्य मोठे होते यात शंका नाही.
डॉ. रामशंकर त्रिपाठींच्या मते,
"सर्व कुशान सम्राटांमध्ये कनिष्क हा महान सम्राट होता. त्याच्या व्यक्तिमत्त्वात चंद्रगुप्त मौर्यासारखी पराक्रमी वृत्ती व अशोकासारखी धर्मप्रसाराची ईर्षा होती. तो एक श्रेष्ठ विजेता व बौद्ध धर्माचा आश्रयदाता होता."
उत्तम प्रशासक व परधर्मसंहिष्णू सम्राट म्हणून त्याची योग्यता श्रेष्ठच होती. प्रशासन व्यवस्थेची विस्तृत माहिती उपलब्ध नसली तरी तो लोककल्याणकारीच राजा होता. त्याने बौद्ध धर्माचा स्वीकार व प्रसार केला असला तरी इतर धर्मीयांचा छळ केला नाही.
सर्व धर्मीयांचा त्याने आदर केला व त्यांना सहिष्णुतेने वागवले. कनिष्काने कला, साहित्य, अर्थकारण इ. क्षेत्रांत महत्त्वाची कामगिरी बजावली.तो गांधार कलाशैलीचा निर्माता होता.
डॉ. मोरवंचीकर यांनी म्हटल्याप्रमाणे
"गुप्ताच्या काळातील भारतीय सुवर्णयुगाचा पायाच त्याने घातला. त्याच्या कारकीर्दीत कुशाण सत्तेने वैभवाचे शिखर गाठले."
कनिष्काची तुलना अशोकाशी होऊ शकत नाही. कारण दोघांत खूप वेगळेपणा आहे. कनिष्काला 'प्रतिअशोक' म्हणणे हे अशोकाला कमीपणा आणणारे आहे.
अशोक हा फक्त राजाच नव्हता तर तो ऋषी (भिक्षूराजा) होता. कनिष्काच्या नाण्यांवर कनिष्काचा उल्लेख देवपुत्र, शहानुशाही असा केला आहे. कनिष्कानेच राजपदाचे महत्त्व वाढवले. कनिष्कापासूनच राजांचे दगडी पुतळे उभे करण्याची प्रथा रूढ झाली व ती पुढे सातवाहन, गुप्तकाळात लोकप्रिय झाली. जुन्नरच्या लेण्यांत सातवाहन राजांची चित्रे आहेत.
कनिष्क हा शक या कालगणनेचा संस्थापक होता हे आता सिद्ध झाले आहे. कनिष्क हा इ.स. ७८ मध्ये सत्तेवर आला व आपल्या सत्ताग्रहणापासून त्याने शके हो कालगणना सुरू केली. त्यामुळे इसवीसनातून ७८ वजा केल्यास शंके ही कालगणना समजते. तसेच शकांनी आपल्या नाण्यांवर राज्यकारभाराची वर्षे दिली आहेत. त्यात ७८ मिळविल्यास तत्कालीन वर्ष समजण्यास आपणास मदत होते.
थोर इतिहासकार चट्टोपाध्याय यांच्या मते,
"The Kushana empire reached its Zenith during the reign of Kanishka, whose rule lasted for 23 years."
X X
कनिष्काचे वारसदार व कुशाण सत्तेचा अस्त
कनिष्काला किती पुत्र होते हे निश्चित माहीत नसले तरी त्याच्या मृत्यूनंतर वशिक हा त्याचा एक पुत्र इ.स. १०१ ते १०८ या काळात सत्तेवर होता. त्याच्यानंतर हुविष्क हा कनिष्काचा दुसरा पुत्र इ.स. १०८ ते १३८ या काळात सत्तेवर होता. त्याने कुशाण साम्राज्याचा विशाल प्रदेश आपल्या वर्चस्वाखाली कायम ठेवला.
मथुरा येथे बौद्ध भिक्षूसाठी त्याने विहार बांधला. हुविष्कची नाणी विपुल प्रमाणात सापडली आहेत. कनिष्काप्रमाणेच त्याच्या नाण्यावर ग्रीक, रोमन व भारतीय देवता कोरलेल्या आहेत. त्यावरून कनिष्काप्रमाणेच तोही धर्मसहिष्णू सम्राट असावा असे दिसते.
काश्मीरमध्ये त्याने 'हुविष्कपूर' नावाचे शहर वसविले. त्याच्या मृत्यूनंतर वासुदेव हा इ.स. १५२ ते १७६ या काळात कुशाणाचा राजा होता. त्याच्या काळात कुशाण सत्तेला ओहोटी लागली असावी व कुशाणांनी भारताबाहेरचे प्रदेश गमावले असावेत असे दिसते. कारण त्याच्या काळात कुशाणांची राजधानी मथुरा येथे स्थलांतरित झाली होती. त्याचे नाव वासुदेव हे पूर्णपणे भारतीय आहे. त्याच्या नाण्यांवर नंदीसह शिवमुद्रा आढळते. यावरून तो शैवपंथीय असला पाहिजे.
वसुदेवाच्या काळात कुशाणांचे परकीयपण संपले व ते पूणपणे भारतीय समाज व संस्कृतीत विलीन झाले असे दिसते.
कुशाण सत्तेच्या ऱ्हासाची कारणे
१) सम्राट कनिष्कानंतरचे वशिक, हुविष्क, वमुदेव हे दुबळे होते.
२) कनिष्काच्या मृत्यूनंतर त्यांचे प्रांताधिकारी स्वतंत्र झाले.
३) कुशाणाच्या उतरत्या काळात नाग, मल्लव, यौधेय व कुणींद या राजसत्ता अधिक प्रबळ बनल्या.
४) कुशाणांचे साम्राज्याचे दोन विभागांत विभाजन झाले होते. हुविष्क व कनिष्क दुसरा हे दोन राजे एकाच वेळी सत्तेवर होते.
५) शकांची आक्रमणे व सातवाहनांची प्रबळ सत्ता हीसुद्धा अप्रत्यक्षपणे कुशाणांच्या पाडावाला कारणीभूत झाली होती.
कुशाणांच्या अस्तानंतर पुन्हा उत्तर भारतात राजकीय गोंधळ, अस्थिरता व छोटयाछोट्या राज्यात राजकीय सत्तेचे विकेंद्रीकरण निर्माण झाले.
Comment and share....
2 Comments
Nice
ReplyDeleteVery nice information
ReplyDelete