नेताजी सुभाषचंद्र बोस: भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक अग्रेसर नेते
23 जानेवारी : जयंती
18 ऑगस्ट: स्मृतीदिन
सुभाषचंद्र बोस हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक अग्रेसर नेते होते. त्यांना नेताजी सुद्धा म्हटले जाते.
दुसरे महायुद्ध सुरू असताना इंग्रजांशी लढण्यासाठी त्यांनी जपानच्या मदतीने "आझाद हिंद फौज" स्थापन केली होती. त्यांनी दिलेला "तुम मुझे खून दो मैं तुम्हे आझादी दुंगा" चा नारा हा आज भारताचा राष्ट्रीय नारा बनला आहे.
बालपण, शिक्षण व विद्यार्थी जीवन :
सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी ओडिशा मधील कटक शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ कटक शहरातील नामवंत वकील होते आणि आईचे नाव प्रभावती होते.
जानकीनाथ कटक महापालिकेत काही काळ काम करत होते. तसेच बंगालचे विधानसभेचे सदस्य ही होते.
इंग्रज सरकारने त्यांना "रायबहादूर" हा किताब दिला होता. प्रभावती व जानकीनाथ बोस ह्यांना एकूण 14 मुले होती. त्यात 6 मुली व 8 मुलगे होते.
सुभाषचंद्र त्यांचे सहावे अपत्य व पाचवे पुत्र होते.आपल्या सर्व भावांपैकी सुभाषला शरदचंद्र बंधू अधिक प्रिय होते.
सुभाषबाबू कटक मध्ये रॅवेन्शॉ कॉलिजिएट हायस्कूल शाळेत शिकत होते. ह्या शाळेत त्यांच्या एका शिक्षकाचे नाव वेणीमाधव दास होते. ते आपल्या विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीचे स्फुल्लिंग जागवत. त्यांनी सुभाषमधली सुप्त देशभक्ती जागृत केली.
वयाच्या 15 व्या वर्षी, सुभाष गुरूच्या शोधात हिमालयात गेले हाते. गुरूचा हा शोध असफल राहिला. त्यानंतर स्वामी विवेकानंदांचे साहित्य वाचून, सुभाष त्यांचे शिष्य बनले.
कोलकात्त्यातील प्रेसिडेंसी महाविद्यालयात इंग्रज प्राध्यापक ओटेन हे भारतीय विद्यार्थ्यांशी उर्मटपणे वागत असत. म्हणून सुभाषने संप पुकारला होता.
1921 साली इंग्लंडला जाऊन, सुभाष भारतीय नागरी सेवेच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. परंतु इंग्रज सरकारची चाकरी करण्यास नकार देऊन त्यांनी राजीनामा दिला व ते मायदेशी परतले.
X X
स्वातंत्र्यलढ्यात प्रवेश व कार्य:
कोलकात्त्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, देशबंधू चित्तरंजन दास ह्यांच्या कार्याने प्रभावित झालेल्या सुभाषबाबूची, दासबाबूंबरोबर काम करण्याची इच्छा होती. इंग्लंडहून त्यांनी दासबाबूंना पत्र लिहून, त्यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती.
रविंद्रनाथ ठाकूर ह्यांच्या सल्ल्यानुसार भारतात परतल्यानंतर ते सर्वप्रथम मुंबईला जाऊन महात्मा गांधींना भेटले.
मुंबईत गांधींजी मणिभवन वास्तु मध्ये वास्तव्य करत. तेथे 20 जुलै 1921 रोजी महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस सर्वप्रथम एकमेकांना भेटले.
गांधींजीनी देखिल कोलकत्याला जाऊन दासबाबूंबरोबर काम करण्याचा सल्ला दिला. मग सुभाषबाबू कोलकात्त्याला आले व दासबाबूंना भेटले.
दासबाबूंना त्यांना पाहून फार आनंद झाला. त्याकाळी गांधींजीनी इंग्रज सरकारच्या विरोधात असहकार आंदोलन चालवले होते. दासबाबू बंगालमध्ये ह्या आंदोलनाचे नेतृत्व करत होते. त्यांच्याबरोबर सुभाषबाबू ह्या आंदोलनात सहभागी झाले.
1922 साली दासबाबूंनी काँग्रेस अंतर्गत "स्वराज पक्षाची" स्थापना केली.
विधानसभेच्या आतून इंग्रज सरकारला विरोध करण्यासाठी कोलकाता महापालिकेची निवडणूकजिंकून दासबाबू कोलकात्त्याचे महापौर झाले.
त्यांनी सुभाषबाबूंना महापालिकेचे प्रमुख कार्यकारी अधिकारी बनवले. सुभाषबाबूंनी आपल्या कार्यकाळात महापालिकेची काम करण्याची पद्धतच बदलून टाकली.
कोलकात्त्यातील रस्त्यांची इंग्रज नावे बदलून त्यांना भारतीय नावे दिली गेली. स्वातंत्र्यलढ्यात प्राणार्पण केलेल्या क्रांतिकारकांच्या कुटुंबीयांना महापालिकेत नोकरी मिळू लागली.
सुभाषबाबू देशातील एक अग्रेसर युवा नेता म्हणून ओळखले जाऊ लागले.
पंडित जवाहरलाल नेहरूंसह, सुभाषबाबूंनी काँग्रेस अंतर्गत "इंडिपेंडन्स लिगची" स्थापना केली.
1928 साली जेव्हा " सायमन कमिशन" भारतात आले तेव्हा काँग्रेसने त्याला काळे झेंडे दाखवले होते.
कोलकात्त्यात सुभाषबाबूंनी ह्या आंदोलनाचे नेतृत्व केले. सायमन कमिशनला उत्तर देण्यासाठी काँग्रेसने भारताच्या भावी घटनेचा आराखडा तयार करण्यासाठी आठ सदस्यांची समितीत पंडित मोतीलाल नेहरू अध्यक्ष होते तर सुभाषबाबू सदस्य. ह्या समितीने नेहरू रिपोर्ट सादर केला.
1928 साली काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन पंडित मोतीलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली कोलकात्त्यात झाले. ह्या अधिवेशनात त्यांनी इंग्रज सरकारकडून वसाहतीचे स्वराज्य मागण्यासाठी ठराव मांडला होता. मात्र सुभाषबाबू व पंडित जवाहरलाल नेहरू ह्यांना पूर्ण स्वराजच्या भूमिकेशी तडजोड मान्य नव्हती.
अखेर वसाहतीचे स्वराज्याची मागणी मान्य करण्यासाठी इंग्रज सरकारला एक वर्षाची मुदत देण्याचे ठरले. जर एका वर्षात इंग्रज सरकारने ही मागणी मान्य केली नाही तर काँग्रेस पूर्ण स्वराजची मागणी करेल असे ठरले. इंग्रज सरकारने ही मागणी मान्य केली नाही.
1930 साली काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन पंडित जवाहरलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली लाहोरला झाले. तेव्हा असे ठरवले गेले की 26 जानेवारी हा दिवस स्वातंत्र्यदिन म्हणून पाळला जाईल.
26 जानेवारी 1931 च्या दिवशी कोलकात्त्यात सुभाषबाबू तिरंगी ध्वज फडकावत एका विराट मोर्चाचे नेतृत्व करत होते.
तेव्हा पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यात ते जखमी झाले. सुभाषबाबू तुरूंगात असताना गांधींजीनी इंग्रज सरकारबरोबर तह केला व सर्व कैद्यांची सुटका करण्यात आली.
22 जुलै 1940 रोजी मुंबई येथे सुभाषचंद्र बोसांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेशी भेट झाली होती. दोघांमध्ये देशाचे स्वातंत्र्य आणि देशातील जातीयता व अस्पृश्यता यावर चर्चा झाली.
X X
सुभाषबाबूना कारावास:
आपल्या सार्वजनिक जीवनात सुभाषबाबूंना एकूण अकरा वेळा कारावास भोगावा लागला.
सर्वप्रथम 1921 साली त्यांना सहा महिन्यांचा कारावास भोगावा लागला.
1925 साली गोपीनाथ साहा एक क्रांतिकारी कोलकात्त्याचे पोलिस अधीक्षक चार्लस टेगार्ट ह्यांना मारण्याच्या प्रयत्नांत होता. पण त्याने चुकून अर्नेस्ट डे नामक एका व्यापारी इसमाला मारले.
ह्यासाठी त्याला फाशीची शिक्षा सुनावली गेली. त्यांनी गोपीनाथचा पार्थिव देह मागून घेऊन त्याच्यावर अंत्यसंस्कार केले.
यावरून इंग्रज सरकारने अर्थ लावला की सुभाषबाबू क्रांतिकारकांचे स्फूर्तिस्थान आहेत. ह्या कारणास्तव इंग्रज सरकारने सुभाषबाबूंना अटक केली व कोणताही खटला न चालवता त्यांना अनिश्चित कालखंडासाठी म्यानमारच्या मंडाले कारागृहात बंदिस्त करून टाकले.
5 नोव्हेंबर 1925 च्या दिवशी, देशबंधू चित्तरंजन दासांचे कोलकाता येथे देहावसान झाले.
सुभाषबाबूंनी त्यांच्या मृत्यूची बातमी मंडालेच्या कारागृहात रेडियोवर ऐकली.
मंडाले कारागृहातील वास्तव्यात सुभाषबाबूंची तब्येत बिघडली. त्यांना क्षयरोगाने ग्रासले.
परंतु इंग्रज सरकारने तरीही त्यांची सुटका करण्यास नकार दिला. सरकारने त्यांची सुटका करण्यासाठी अट घातली की त्यांनी औषधोपारासाठी युरोपला जावे.
अखेर परिस्थिती इतकी कठीण झाली की कदाचित तुरूंगातच सुभाषबाबूंचा मृत्यू ओढवेल असे वाटू लागले. त्यामुळे सरकारने अखेर त्यांची सुटका केली.
मग सुभाषबाबू औषधोपारासाठी डलहौसी येथे जाऊन राहिले.
1930 साली सुभाषबाबू कारावासात असताना त्यांची कोलकात्त्याच्या महापौरपदी निवड झाली. त्यामुळे सरकारला त्यांची सुटका करणे भाग पडले.
1932 साली सुभाषबाबू पुन्हा कारावासात होते. ह्या वेळेस त्यांना "अलमोडा" येथील तुरुंगात ठेवले होते.
अलमोडा तुरुंगात त्यांची तब्येत पुन्हा बिघडली. वैद्यकीय सल्ल्यानुसार सुभाषबाबू ह्यावेळी औषधोपारासाठी युरोपला जायला तयार झाले.
X X
सुभाषबाबूंचे युरोपातील वास्तव्य:
सुभाषबाबूंचे युरोप मध्ये वास्तव्य 1933 ते 1936 पर्यंत होते.
युरोप मधील वास्तव्यात सुभाषबाबूंनी आपल्या तब्येतीची काळजी घेत कार्यही सुरूच ठेवले.
त्यांनी इटलीचे नेते मुसोलिनी ह्यांची अनेकदा भेट घेतली. मुसोलिनीने त्यांना, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सर्वतोपरी सहकार्य करण्याचे वचन दिले.
आयर्लंडचे नेते डी व्हॅलेरा सुभाषबाबूंचे चांगले मित्र बनले.
पुढे सुभाषबाबू युरोप मध्ये विठ्ठलभाई पटेल ह्यांना भेटले. सुभाषबाबूंनी पटेल-बोस जाहीरनामा प्रसिद्ध केला. ज्यामध्ये त्या दोघांनी गांधीजींच्या नेतृत्वावर कडाडून टीका केली.
सुभाषबाबूंना त्यांचे वडील मृत्युशय्येवर 1934 साली असल्याची बातमी मिळाली. त्यामुळे ते विमानाने कराची मार्गे कोलकात्त्याला परतले.
कराचीला पोचल्यावरच त्यांना कळले की त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. कोलकात्त्याला पोचताच इंग्रज सरकारने त्यांना अटक केली व काही दिवस तुरूंगात ठेवून पुन्हा युरोपला पाठविले.
X X
हरीपुरा राष्ट्रिय काँग्रेसचे अध्यक्षपद :
काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन 1938 साली हरिपुरा येथे झाले. ह्या अधिवेशनासाठी गांधीजींनी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून सुभाषबाबूंची निवड केली. हे काँग्रेसचे 51वे अधिवेशन होते.
त्यामुळे काँग्रेस अध्यक्ष असलेल्या सुभाषबाबूंचे स्वागत 51 बैलांनी खेचलेल्या रथातून केले गेले.
ह्या अधिवेशनात सुभाषबाबूंचे अध्यक्षीय भाषण फारच प्रभावी झाले. कोणत्याही भारतीय राजकीय व्यक्तीने क्वचितच इतके प्रभावी भाषण कधी केले असेल.
आपल्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत सुभाषबाबूंनी योजना आयोग स्थापना केला. पंडित जवाहरलाल नेहरू त्याचे अध्यक्ष होते.
सुभाषबाबूंनी बेंगलोर येथे प्रसिद्ध वैज्ञानिक सर विश्वेश्वरैय्या ह्यांच्या अध्यक्षतेखाली एक विज्ञान परिषदही भरवली.
राष्ट्रिय काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा:
गांधीजींनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी सुभाषबाबूंची 1938 साली निवड केली असली तरी गांधीजींना सुभाषबाबूंची कार्यपद्धती पसंत नव्हती.
ह्याच सुमारास युरोपात द्वितीय महायुद्धाची छाया पसरली होती. सुभाषबाबूंची इच्छा होती की इंग्लंडच्या कठीण परिस्थितीचा लाभ उठवून भारताचा स्वातंत्र्यलढा अधिक तीव्र केला जावा.
त्यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत ह्या दिशेने पावले टाकण्यास सुरूवातही केली होती. गांधीजी ह्या विचारसरणीशी सहमत नव्हते.
वार्षिक काँग्रेस अधिवेशन 1939 सालचे त्रिपुरी येथे झाले. ह्या अधिवेशनाच्या वेळी सुभाषबाबू तापाने इतके आजारी होते की त्यांना स्ट्रेचरवर पडून अधिवेशनाला उपस्थित रहावे लागले.
गांधीजी ह्या अधिवेशनाला उपस्थित राहिले नाहीत. गांधीजींच्या साथीदारांनी सुभाषबाबूंशी बिलकुल सहकार्य केले नाही.
अधिवेशनानंतरही सुभाषबाबूंनी तडजोडीसाठी खूप प्रयत्न केले. पण गांधीजी व त्यांच्या साथीदारांनी त्यांचे काही चालू दिले नाही.
शेवटी परिस्थिती अशी बनली की सुभाषबाबू काही कामच करू शकत नव्हते.
अखेर, 29 एप्रिल 1939 रोजी सुभाषबाबूंनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
X X
फॉरवर्ड ब्लॉक पक्षाची स्थापना:
सुभाषबाबूंनी काँग्रेस अंतर्गत "फॉरवर्ड ब्लॉक" आपल्या पक्षाची स्थापना 3 मे 1939 ला केली.
काही दिवसांनंतर, सुभाषबाबूंना काँग्रेस मधून काढून टाकण्यात आले.
पुढे "फॉरवर्ड ब्लॉक" हा एक स्वतंत्र पक्ष बनला.
दुसरे महायुद्ध सुरू होण्यापूर्वीच फॉरवर्ड ब्लॉकने भारताचा स्वातंत्र्यलढा अधिक तीव्र करण्यासाठी, जनजागृती सुरू केली.
त्यामुळे इंग्रज सरकारने सुभाषबाबू सहित फॉरवर्ड ब्लॉकच्या सर्व मुख्य नेत्यांना कैद केले.
दुसरे महायुद्ध सुरू असताना तुरूंगात निष्क्रिय राहणे सुभाषबाबूंना शक्य नव्हते.
सरकारला आपली सुटका करण्यास भाग पाडण्यासाठी, सुभाषबाबूंनी तुरूंगात आमरण उपोषण सुरू केले. तेव्हा सरकारने त्यांची सुटका केली. पण इंग्रज सरकार युद्धकाळात सुभाषबाबूंना मोकळे ठेवू इच्छीत नव्हते.
त्यामुळे सरकारने त्यांना त्यांच्याच घरात नजरकैदेत ठेवले.
X X
सुभाषबाबूंचे नजरकैदेतून पलायन :
नजरकैदेतून निसटण्यासाठी सुभाषबाबूंनी एक योजना बनवली.
16 जानेवारी 1941 रोजी पठाणी वेशभूषेत, महमद झियाउद्दीन असे नाव धारण करून ते पोलिसांची नजर चुकवून, घरातून निसटले.
कोलकात्त्याहून गोमोह येथे पोचवले व रेल्वे स्थानकावर फ्रंटियर मेल पकडून ते पेशावरला गेले.
सुभाषबाबू पेशावरहून अफगाणिस्तानची राजधानी काबूलच्या दिशेने निघाले. हा संपूर्ण प्रवास डोंगरातून पायी चालत पूर्ण केला.
त्यांनी जर्मन व इटालियन वकिलातीत प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न केला. इटालियन वकिलातीत त्यांच्या प्रयत्नांना यश आले.
जर्मन व इटालियन वकिलातींनी त्यांना मदत केली. अखेर ओरलँडो मझयुटा नामक इटालियन व्यक्ती बनून सुभाषबाबू काबूलहून रेल्वेने प्रवास करत रशियाची राजधानी मॉस्को मार्गे जर्मनीची राजधानी बर्लिन येथे पोचले.
X X
सुभाषबाबूचे जर्मनीतील वास्तव्य आणि हिटलरची भेट :
बर्लिन येथे सुभाषबाबू सर्वप्रथम रिबेनट्रोप आदि जर्मनीच्या अन्य नेत्यांना भेटले.
त्यांनी जर्मनीत "भारतीय स्वातंत्र्य संघटना" व "आझाद हिंद रेडियो" ह्या दोन्हींची स्थापना केली.
ह्याच दरम्यान सुभाषबाबू, नेताजी ह्या नावाने ओळखले जाऊ लागले.
जर्मन सरकारचे एक मंत्री ॲडम फॉन ट्रॉट सुभाषबाबूंचे फार चांगले मित्र बनले.
अखेर 29 मार्च 1942 रोजी सुभाषबाबू जर्मनीचे सर्वोच्च नेते ॲडॉल्फ हिटलर ह्यांना भेटले. पण अॅडॉल्फ हिटलर ह्यांना भारताच्या विषयात फारसा रस नव्हता. त्यांनी सुभाषबाबूंना सहकार्याचे कोणतेही स्पष्ट वचन दिले नाही.
अॅडॉल्फ हिटलर ने "माइन काम्फ " आपले आत्मचरित्र लिहीले होते. ह्या पुस्तकात त्यांनी भारत व भारतीयांविषयी अनुदार उद्गार काढले होते. ह्या विषयावर सुभाषबाबूंनी अॅडॉल्फ हिटलर ह्यांच्याकडे आपली नाराजी व्यक्त केली.
अॅडॉल्फ हिटलर ह्यांनी आपल्या कृत्याबद्दल माफी मागितली व आपल्या आत्मचरित्राच्या पुढील आवृत्तीतून ते सर्व परिच्छेद गाळण्याचे वचन दिले.
सुभाषबाबूंना समजले की अॅडॉल्फ हिटलर व जर्मनी ह्यांच्याकडून त्यांना फार काही मिळण्यासारखे नाही.
त्यामुळे 8 मार्च 1943 रोजी जर्मनीतील कील बंदरात ते अबीद हसन सफरानी नामक साथीदारासह एका जर्मन पाणबुडीत बसून पूर्व आशियाच्या दिशेने निघाले.
ह्या जर्मन पाणबुडीतून त्यांनी हिंदी महासागरातील मादागास्करचा किनारा गाठला.
X X
सुभाषबाबूचे पूर्व आशियातील वास्तव्य :
पूर्व आशियात पोचल्यावर वयोवृद्ध क्रांतिकारी रासबिहारी बोस ह्यांनी सिंगापूर येथील फेरर पार्कमध्ये भारतीय स्वातंत्र्य परिषदेचे नेतृत्व सुभाषबाबूंकडे सोपवले.
नेताजींच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित होऊन जपानचे पंतप्रधान जनरल हिदेकी तोजो ह्यांनी त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
काही दिवसांनंतर, नेताजींनी जपानची संसद डायट समोर भाषण केले.
21 ऑक्टोबर 1943 रोजी नेताजींनी सिंगापुरात "अर्जी-हुकुमत-ए-आझाद-हिंद"ची (स्वाधीन भारताचे अंतरिम सरकार) स्थापना केली.
ते स्वतः ह्या सरकारचे राष्ट्रपति, पंतप्रधान व युद्धमंत्री बनले.
ह्या सरकारला एकूण नऊ देशांनी मान्यता दिली.
नेताजी "आझाद हिंद फौजे"चे सरसेनापतीही बनले.
आझाद हिंद फौजेत जपानी लष्कराने इंग्रजांच्या फौजेतून पकडलेल्या भारतीय युद्धबंद्यांना भरती केले गेले.
आझाद हिंद फौजेत स्त्रियांसाठी "झाँसी की रानी" रेजिमेंटही बनवली गेली.
पूर्व आशियात नेताजींनी अनेक भाषणे करून तेथील स्थायिक भारतीय लोकांना आझाद हिंद फौजेत भरती होण्याचे तसेच त्यांना आर्थिक मदत करण्याची आवाहने केली.
ही आवाहने करताना त्यांनी "तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूँगा" असा नारा दिला.
द्वितीय महायुद्धाच्या काळात, "आझाद हिंद फौजे"ने जपानी लष्कराच्या साथीने भारतावर आक्रमण केले.
आपल्या फौजेला प्रेरणा देण्यासाठी नेताजींनी "चलो दिल्ली" अशी हाक दिली. दोन्ही फौजांनी इंग्रजांकडून अंदमान आणि निकोबार बेटे जिंकली.
ही बेटे अर्जी-हुकुमत-ए-आझाद-हिंदच्या अनुशासनाखाली राहिली.
नेताजींनी ह्या बेटांचे "शहीद" आणि "स्वराज" बेटे असे नामकरण केले.
दोन्ही फौजांनी मिळून इंफाळवर व कोहिमावर आक्रमण केले. पण नंतर इंग्रजांनी बाजी मारली व दोन्ही फौजांना माघार घ्यावी लागली.
आझाद हिंद फौज माघार घेत असताना जपानी लष्कराने नेताजींना पळून जाण्यासाठी व्यवस्था केली.
पण नेताजींनी "झाँसी की रानी" रेजिमेंटच्या मुलींच्या साथीने शेकडो मैल चालत जाणे पसंत केले.
अशा प्रकारे नेताजींनी नेतृत्वाचा एक आदर्शच समोर ठेवला.
6 जुलै 1944 रोजी "आझाद हिंद रेडियो" वरचे आपले भाषण नेताजींनी गांधीजींना उद्देशून केले.
आपल्या भाषणाच्या माध्यामातून नेताजींनी गांधीजींना जपानकडून मदत मागण्याचे आपले कारण व "अर्जी-हुकुमत-ए-आजाद-हिंद" तथा "आझाद हिंद फौज" ह्यांची स्थापना करण्यामागचे उद्दिष्ट स्पष्ट केले.
आपल्या भाषणात, नेताजींनी गांधीजींचा राष्ट्रपिता असा उल्लेख करत आपल्या युद्धासाठी त्यांचा आशीर्वाद मागितला.
अशा प्रकारे नेताजींनी गांधीजींना सर्वप्रथम राष्ट्रपिता असे संबोधले.
X X
बेपत्ता सुभाषबाबू व मृत्यूची बातमी :
दुसर्या जागतिक महायुद्धातील जपानच्या पराभवानंतर नेताजींना नवा रस्ता शोधणे जरूरी होते. त्यांनी रशियाकडून मदत मागायचे ठरवले होते.
18 ऑगस्ट 1945 रोजी नेताजी विमानातून मांचुरियाच्या दिशेने जात होते. ह्या प्रवासादरम्यान ते बेपत्ता झाले. ह्या दिवसानंतर ते कधी कुणाला दिसलेच नाहीत.
23 ऑगस्ट 1945 रोजी जपानच्या "दोमेई" वृत्त संस्थेने जगाला कळवले की, 18 ऑगस्ट रोजी नेताजींचे विमान तैवानच्या तैपेई भूमीवर अपघातग्रस्त झाले व त्या दुर्घटनेत भाजलेल्या नेताजींचे इस्पितळात निधन झाले.
नेताजींच्या अस्थी जपानची राजधानी टोकियो येथील " रेनकोजी" बौद्ध मंदिरात ठेवल्या गेल्या.
स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने ह्या घटनेची चौकशी करण्यासाठी 1956 आणि 1977 मध्ये दोन वेळा एकेका आयोगाची नियुक्ती केली. दोन्ही वेळा हाच निष्कर्ष निघाला.
1999 साली मनोज कुमार मुखर्जी ह्यांच्या नेतृत्वाखाली तिसरा आयोग नेमला गेला.
2005 साली तैवान सरकारने मुखर्जी आयोगाला असे कळवले की 1945 साली तैवानच्या भूमीवर कोणतेही विमान अपघातग्रस्त झालेच नव्हते.
2005 मध्ये मुखर्जी आयोगाने भारत सरकारला आपला अहवाल सादर केला. आयोगाने आपल्या अहवालात असे लिहिले की, नेताजींचा मृत्यू त्या विमान अपघातात घडल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. परंतु भारत सरकारने मुखर्जी आयोगाचा हा अहवाल नामंजूर केला.
18 ऑगस्ट 1945 च्या दिवशी नेताजी सुभाषचंद्र कसे व कुठे बेपत्ता झाले तसेच त्यांचे पुढे नक्की काय झाले हे भारताच्या इतिहासातील सर्वांत मोठे अनुत्तरित रहस्य बनले आहे.
X X
सुभाषबाबूंना भारतरत्न पुरस्कार:
1992 साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांना मरणोपरान्त "भारतरत्न" प्रदान करण्यात आले .
परंतु सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या एका जनहितयाचिकेचा आधार घेऊन नेताजींना दिलेला हा पुरस्कार परत काढून घेण्यात आला. त्या याचिकेत नेताजींच्या मृत्यूचा कुठलाही पुरावा उपलब्ध नसल्याने त्यांना मरणोपरान्त ‘भारतरत्न’ पुरस्कार देणे अवैध आहे असा युक्तिवाद करण्यात आलेला होता.
सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने नेताजींना देण्यात आलेला हा पुरस्कार परत घेण्यात आला.
दिलेला भारतरत्न पुरस्कार परत घेण्याची इतिहासातली ही एकमेव घटना आहे.
1944 मध्ये "अमेरिकन पत्रकार लुई फिशर" ह्यांच्याशी चर्चा करताना महात्मा गांधींनी नेताजींचा "देशभक्तांचा देशभक्त" असा उल्लेख केला होता.
10 Comments
Very nice information
ReplyDeleteNice
ReplyDeleteNice
ReplyDeleteNice information 👍
ReplyDeleteNice
ReplyDelete👍👍
ReplyDeleteNice 👍
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteVery good
ReplyDeleteनेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल तंतोतंत माहिती मिळाली आहे.
ReplyDelete