Subscribe Us

header ads

Jamsetji Nusserwanji Tata: Indian pioneer industrialist, founded Tata Group

Jamsetji Nusserwanji Tata: Indian pioneer industrialist, founded Tata Group

जमशेदजी टाटा : टाटा उद्योग समूहाचे संस्थापक


आज एक लाख कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल करणाऱ्या टाटा उद्योगसमूहाचे संस्थापक होते. जमशेदजी नौशेरवानजी टाटा. त्यांचा जन्म 1839 आणि मृत्यू 1904 मध्ये झाला. म्हणजे चांगले पासष्ट वर्षांचे आयुर्मान त्यांना लाभलेले. 3 मार्च 1839 या दिवशी त्यांचा जन्म झाला. त्यांचे घराणे मूळचे नवसारी (गुजरात) या गावचे, तिथे त्यांचे पूर्वज पारशी धर्मगुरू म्हणून कार्यरत होते.

X X

जमशेदजी टाटा यांचे वडील त्याकाळी छोटा-मोठा व्यापार धंदा, हंगामानुसार खरेदी-विक्रीचा व्यवसाय करीत असत. जमशेदजी यांचे शिक्षण मुंबईच्या एलफिन्स्टन कॉलेजात झाले. मुंबई विद्यापीठाची स्थापना इ. स. 1857 मध्ये झाली. त्यानंतर शिकणाऱ्या आरंभीच्या उच्चशिक्षितांमध्ये एक होते. जमशेदजी टाटा! या उच्च शिक्षणामुळे आणि प्रामुख्याने इंग्रजी भाषेच्या अभ्यासामुळे तत्कालीन उच्चशिक्षित तरुण पिढीस आधुनिक जगाचा अधिक चांगला परिचय झाला. युरोपातील औद्योगिक क्रांती, नवनव्या ऊर्जासाधनांचा शोध, यंत्रतंत्रांचा वापर, यामुळे तिकडील जीवन कसे वेगवान होत चालले आहे, बदलत चालले आहे, हे त्या पिढीतील लोकांना उमजले. ज्ञानामुळे जागरूकता आली. आपला देश अजून अनेक संदर्भात विशेषतः आर्थिक-औद्योगिक संदर्भात खूप मागे आहे. हेही या पिढीस उमजले. एकेकाळी सोन्याचा धूर जिथून निघत असे त्या भारतवर्षाची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे. हे या शिक्षित पिढीस अधिक चांगले उमजले. मागासलेपणाची अनेक कारणे असली तरी त्याचे मुख्य कारण इंग्रजी सत्तेद्वारे होणारे आपल्या देशाचे शोषण आहे. हेही स्पष्टपणे त्यांना उमगले होते. म्हणून इंग्रजी सत्ता झुगारून देण्याचे स्वातंत्र्यसैनिकांचे प्रयत्न देशभर चालू होतेच. सर्वांनाच आपल्या सर्वस्वाचा त्याग करून स्वातंत्र्यलढ्यात भाग घेणे शक्य नव्हते; परंतु स्वातंत्र्यलढ्यात थेट सहभागी न होताही आपण आपल्या देशाची सेवा करू शकतो. त्यासाठी देशाला आर्थिक-औद्योगिक संदर्भात सुदृढ करण्यासाठी कार्य करणे हीदेखील एक प्रकारची देशसेवाच आहे, असे जमशेदजी टाटा व अन्य अनेक देशभक्त उद्योजक, व्यापारी, भांडवलदार यांचे मत होते. इंग्रजांना घालवल्यामुळे राजकीयदृष्ट्या आपण स्वतंत्र होऊ; पण देशाची आणि लोकांची स्थिती पारतंत्र्यातील स्थितीपेक्षा अधिक चांगली करण्यासाठी, त्यांचा आर्थिक स्तर उंचावला जाणे गरजेचे आहे. त्यासाठी व्यापार, कारखानदारी, उद्योग यांद्वारे देशात संपत्ती निर्माणाचे कार्य करणाऱ्या उद्योजकांचीही तेवढीच गरज आहे, हेही जमशेदजी टाटा यांना उमजले होते.

X X

जमशेदजींची गुणवैशिष्ट्ये :

जमशेदजींना उपजतच एक दूरदृष्टी लाभलेली होती. धारदार कल्पनाशक्ती होती. शिक्षण, भ्रमण, विविध विषयांचे तज्ज्ञ, अभ्यासक यांचा सहवास यातून सभोवतालच्या जगाची त्यांची जाण उच्चकोटीची बनली होती. आपण देशाचा औद्योगिक पाया घालण्याच्या कामी लक्ष द्यावे हे त्यांनी मनाशी पक्के केले आणि शांतपणे; पण एका सुनिश्चित दिशेने त्यांची वाटचाल सुरू झाली.

देशात कापड उद्योगाची मुहूर्तमेढ जमशेदजी टाटा यांनी रोवली आहे. या देशाच्या विदर्भ, मराठवाडा, खान्देश, गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश अशा फार मोठ्या भूभागांची जमीन, हवामान परिस्थिती कपाशी पिकास सुयोग्य आहे. लक्षावधी हेक्टर्स जमीन, कापूस या एकाच पिकाखाली असते. दरवर्षी कोट्यवधी टनांची कपाशी या देशात तयार होते; परंतु या कपाशीवर प्रक्रिया करण्याच्या पुरेशा सोयी देशात उभारलेल्या नव्हत्या. त्यामुळे 'जिनिंग' म्हणजे कपाशीतून सरकी बीज वेगळे करणे आणि रुईचे गड्ढे तयार करणे. 'प्रेसिंग' या दोन प्रक्रियांनंतरच्या कापडनिर्मितीच्या सर्व प्रक्रिया परदेशांत होत असत. जहाजे भरभरून मातीमोल दामाने रुईच्या गासड्या विलायतेत मॅन्चेस्टर व अन्य ठिकाणी जात आणि तिथून त्याचे कापड बनून, ते कापड चढ्याभावाने भारतीय जनतेला विकत घ्यावे लागत असे. या व्यवहारात भारतीयांचे दुहेरी शोषण होत असे, हे जमशेदजी टाटा यांना दिसत होते. म्हणून रुईपासून सूत तयार करणे, त्याचे कापड विणणे, त्यावर प्रक्रिया करणे, रंग देणे इत्यादी सर्व काही सुविधा असणारी देशातील पहिली कापड गिरणी त्यांनी भारतात सुरू करून कापड उद्योगाचा श्रीगणेशा केला.

X X

भारताच्या वस्रोद्योगाचा पाया रचला :

पुढे त्यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनातून अनेक कापड गिरण्या देशभर ठिकठिकाणी; प्रामुख्याने मुंबई-अहमदाबाद येथे सुरू झाल्या. देशात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, लाखो मीटर्स कापड तयार होऊ लागले. कापड उद्योगाला पूरक असे असंख्य छोटे-मोठे उद्योजक त्यातून उभे राहिले. देशवासीयांना उत्तम दर्जाचा कपडा योग्य त्या किमतीत मिळू लागला. लाखो लोकांना-ज्यात कुशल- अर्धकुशल लोक, अभियंते, तंत्रज्ञ यांना थेट रोजगार मिळाला. लाखो लोकांना मालवाहतूक, साठवणूक, पूरक धंदे, प्रक्रिया धंदे, पॅकेजिंग इत्यादींतून अप्रत्यक्ष रोजगार मिळाला. देशाचे अर्थचक्र गतिमान झाले. गेल्या शतकात मुंबई बेटाचा विकास होण्यास तिथे सुरू झालेल्या कापड गिरण्यांचा फार मोठा वाटा आहे. आज मुंबई महानगरी एक कोटीहून अधिक लोकसंख्येचे शहर झालेले आहे. देशाची ती आर्थिक राजधानी बनलेली आहे. त्याचे फार मोठे श्रेय दीडशे वर्षांपूर्वी तिथे सुरू झालेल्या वस्त्रोद्योगास द्यावे लागते. या वस्त्रोद्योगाचा पाया दूरदृष्ट्या जमशेदजी टाटा यांनी घातलेला आहे.

X X

स्टील इंडस्ट्रीचा पाया घातला :

'स्टील इंडस्ट्री'चा पायाही जमशेदजी टाटा यांनीच घातलेला आहे. पोलाद उद्योगासाठी लागणारे खनिज भारतीय भूगर्भात विपुल प्रमाणात आहे. दगडी कोळसाही विपुल प्रमाणात आहे. पाणी, मजूर हेही उपलब्ध आहे. तेव्हा नुसते खनिज जहाजे भरून परदेशी पाठविण्याऐवजी त्या खनिजापासून पोलाद तयार करण्याचा कारखाना त्यांनी भारतात सुरू केला. तोच जमशेदपूरचा कारखाना. हे ठिकाण त्याकाळी बिहार राज्यात मोडत असे. (आज ते झारखंडमध्ये आहे.) तिथे त्यांनी पोलाद कारखान्याची फार मोठी वसाहत उभी केली. वसाहतीस आवश्यक त्या पायाभूत सेवासुविधा दिल्या. हा उपक्रमही लाखो लोकांना रोजगार देणारा ठरलाच, शिवाय देशाच्या इतर अनेक उद्योगांना आवश्यक ते पोलाद- चांगल्या दर्जाचे आणि परवडणाऱ्या किमतीत मिळण्याची सोयही त्यामुळे झाली. टाटा आयर्न अॅण्ड स्टील कंपनी- 'टिस्को'विषयी नंतरही सविस्तर माहिती दिलेली आहेच.

X X

शिक्षण संस्थांची सुरुवात :

देशात पायाभूत अवजड उद्योग उभे करणे जसे महत्त्वाचे आहे, तसेच सोनेरी भविष्यासाठी देशात उत्तम शिक्षण देणाऱ्या संस्थाही खूप आवश्यक आहेत. शिक्षणाचे महत्त्व जमशेदजींना पुरेपूर उमगले होते. शिक्षण माणसाला अज्ञानाच्या अंधकारातून, गुलामगिरीतून, लाचारीतून, मानसिक दुबळेपणातून मुक्त करते हे त्यांना माहिती होते. म्हणूनच त्यांनी पोलाद, वस्त्रोद्योग, वीजनिर्मिती या पायाभूत अवजड उद्योगांच्या उभारणीसोबतच देशात शिक्षण आणि संशोधनासाठी उत्तमोत्तम शिक्षण संस्था उभ्या करण्याकडेही मनापासून लक्ष दिले. 'द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळूर' या संस्थेचा यासंदर्भात आवर्जून उल्लेख केला पाहिजे. टाटा उद्योगसमूहाच्या पुढाकारातून, भरीव अर्थसहाय्यातून देशात नंतर उभ्या राहिलेल्या अनेक संस्थांची माहिती अन्य प्रकरणांमधून आहेच. शिक्षणातून नुसते पदवीधर तयार करायचे नसतात, तर विकासाची वैज्ञानिकदृष्टी असणारी, नवनिर्माण करू इच्छिणारी मोठी पिढी तयारी करायची असते, असा दूरगामी विचार जमशेदजी टाटा यांचा होता. ही पिढीच उद्याचा स्वतंत्र, समर्थ भारत उभा करणार आहे, हे त्यांना माहिती होते. भारतीय गुणवान मुलांनी परदेशी जाऊन तत्त्वज्ञान आत्मसात केले पाहिजे. यासाठी गुणवंतांना वित्तसहाय्य देणाऱ्या योजना टाटांनी सुरू केल्या. त्यासाठी 'जे. एन. टाटा एन्डोव्हमेंट फॉर हायर एज्युकेशन अब्रॉड' ही संस्था सुरू केली. 

X X

उद्योगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन :

संपत्ती हे साधन आहे, साध्य नव्हे या भूमिकेतून त्यांनी सतत कार्य केले. कारखानदारी, व्यापारधंदा यांमध्ये नैतिकता पाळली जाणे, व्यवहारात पारदर्शकता आणि सचोटी पाळली जाणे अत्यंत जरुरीचे आहे यावर त्यांचा कटाक्ष असे. गुंतवणूकदारांना त्यांच्या पैशाचे मोल चुकविणे हे प्रत्येक उद्योगधंद्याचे कर्तव्य आहे हे विसरता कामा नये. यावर त्यांचा कटाक्ष असे. कामगार कल्याणाच्या संदर्भातील जमशेदजी टाटा यांची नीती आणि कार्य तर खरोखरच अजोड आहे याबाबतीत ते त्यांच्या काळाच्या कितीतरी पुढे होते, असे म्हटले पाहिजे. आरोग्य सेवा, विविध कल्याणकारी उपक्रम, निवासाची सोय व अन्य असंख्य प्रकारच्या योजना यांद्वारे त्यांनी आपले कर्मचारी व कामगार यांच्या हिताचे नेहमीच रक्षण केले. टाटा उद्योगसमूहाचेच नौशेरवानजी, जमशेदजी टाटा हे केवळ पाया रचणारे नव्हते तर एकूणच भारतीय उद्योगसृष्टीचे भीष्मपितामह म्हणून त्यांचे नाव इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदविले गेले आहे. इ. स. 2004 हे साल त्यांच्या निर्वाणाचे शताब्दी वर्ष होते. त्यावेळी त्यांच्याविषयी भरपूर साहित्य-माहिती- उपक्रम राबविले गेले. भारत सरकारने त्यांच्यावर टपाल तिकीटही जारी केलेले आहे. आधुनिक भारताच्या उभारणीत आणि जडणघडणीत जमशेदजी टाटा यांचे योगदान सर्वांत मोठे आहे यात वाद नाही.








X X

View, comments and share....

Post a Comment

0 Comments