Dhirajlal Hirachand Ambani: Indian businessman who founded Reliance Industries
धीरूभाई अंबानी: भारतीय उद्योगपती
धीरूभाईंचे साम्राज्य:
अवघे दहावीपर्यंत शिक्षण घेतलेले आणि आपल्या आयुष्याची सुरुवात पेट्रोल पंपवरील एक सहायक म्हणून करणारे धीरूभाई अंबानी पुढच्या आयुष्यात एक अतिशयसंपन्न असे उद्योगपती बनले. अवघ्या पन्नास हजार रुपयांच्या भांडवली गुंतवणुकीच्या आधारे आपल्या स्वतंत्र व्यवसायाला सुरुवात करणाऱ्या धीरूभाईंनी आपल्या कारकीर्दीत अब्जावधी रुपयांची संपत्ती मिळवून एक औद्योगिक साम्राज्य उभे केले. हे सर्व धीरूभाईंनी शून्यातून उभे केले असल्यामुळे त्याचे मोल खूप अधिक आहे. कुटुंबातील आर्थिक अडचणींमुळे आपले शिक्षणदेखील पूर्ण न करू शकणाऱ्या मुलाने आपल्या कर्तृत्वाच्या बळावर घडविलेला हा चमत्कार आहे.
X X
खाली दिलेली आकडेवारी त्यांनी उभारलेल्या साम्राज्याची कल्पना येण्यासाठी पुरेशी आहे.
आर्थिक आकडेवारी:
(धीरूभाईंच्या निधनापूर्वी चार महिन्यांच्या अगोदर)
एकूण वार्षिक उलाढाल : 60,000 कोटी रुपये.
निव्वळ नफा : 4650 कोटी रुपये.
एकूण संपत्ती : 55,500 कोटी रुपये.
X X
धीरूभाईंची उद्योग वैशिष्ट्ये :
1.4 टन वार्षिक क्षमता असलेला जगातील सर्वांत मोठा पॅराजएलिन प्लांट.एक दशलक्ष टन वार्षिक क्षमतेचा जगातील चौथ्या क्रमांकाचा प्युरिफाइड टेरिफ्थॉलिक ॲसिड मेकर प्लांट. एक दशलक्ष टन वार्षिक क्षमतेचा जगातील सहाव्या क्रमांकाचा पॉलिप्रपेलिन उत्पादन प्लांट.
X X
रिलायन्स ग्रुपचा विस्तार:
रिलायन्स ग्रुपच्या वतीने अनेक योजना साकारण्याचा धीरूभाईंचा मानस होता. आपल्या कारकीर्दीत त्यांनी केलेला विस्तार
1. पेट्रोकेमिक्लस
2. फायबर इंटरमिडियट
3. तेल आणि वायू
4. रिफाईनिंग आणि मार्केटिंग
5. विमा व्यवसाय
6. इन्फोकॉम
7. सिन्थेटिक फायबर्स
8. टेक्सटाइल्स
9. आर्थिक सेवासमूह
10. विद्युतनिर्मिती क्षेत्र
11. टेलिकॉम
X X
धीरूभाईंनंतरची रिलायन्स:
धीरूभाईंच्या निधनानंतर मुकेश आणि अनिल या दोन मुलांनी रिलायन्स कंपनी व्यवस्थित सांभाळली. धीरूभाई गेल्याचा काहीही परिणाम न जाणवू देता दोघांनीही आपल्या कंपनीच्या विस्ताराचा वेग कायम ठेवला. अनेक नवनवीन क्षेत्रे पादांक्रात करण्याचा सपाटा लावला. थोरला मुलगा मुकेश यांनी रिलायन्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून सूत्रे स्वीकारली, तर अनिल यांच्याकडे कंपनीचे उपाध्यक्षपद आणि व्यवस्थापकीय संचालकपद आले. धीरूभाईंच्या निधनानंतर अवघ्या एका महिन्यातच संचालक मंडळाच्या संमतीने ही नवी व्यवस्था करण्यात आली. धीरूभाई हयात असताना जे पद त्यांच्याकडे होते ते आता मुकेश यांच्याकडे आले, तर धीरूभाईंच्या काळात मुकेशकडे असलेले पद आता अनिलकडे आले. कंपनीच्या अध्यक्षपदासाठी अनिल यांनी मुकेश यांचे नाव सुचविले, तर कंपनीच्या उपाध्यक्षपदासाठी मुकेश यांनी अनिल यांचे नाव सुचविले.
मुकेश आणि अनिल यांनी धीरूभाईंच्या निधनानंतर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा नव्याने पदभार स्वीकारल्यानंतर टेक्सटाईल्सशिवाय रिलायन्सच्या साम्राज्यात अनेक नव्या क्षेत्रांचा समावेश करण्यात आला. त्यामध्ये प्रामुख्याने तेल शुद्धीकरण, पॉलिस्टर उत्पादन, वीज निर्मिती आणि वितरण, टेलिकॉम, पेट्रोलियम आणि गॅस वितरण, अर्थपुरवठा, बायोटेक्नॉलॉजी, पेट्रोल वितरण आणि अगदी अलीकडच्या काळातील रिटेल ट्रेडिंग या क्षेत्रांचा समावेश आहे. याच्या बरोबरीने देशाला उच्च तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर नेणाऱ्या 140 एकरांवरील धीरूभाई अंबानी नॉलेज सिटी उभारण्याचाही समावेश आहे. अशा प्रकारे अनेक क्षेत्रांत प्रवेश करीत रिलायन्स समूह आजघडीला देशातील एक आघाडीचा उद्योगसमूह बनला आहे.
X X
कौटुंबिक वाद आणि रिलायन्सचे विभाजन:
धीरूभाई गेल्यानंतर पहिली दोन वर्षे मुकेश आणि अनिल यांनी एकत्रितरीत्या रिलायन्सचा कारभार अतिशय उत्तमरीतीने केला. दरम्यानच्या काळात अनेक छोट्या छोट्या मुद्यांवरून या दोघा भावांत वाद निर्माण व्हायला सुरुवात झाली. काही दिवस या दोघांतच हा वाद धुमसत राहिल्यानंतर तो उघड्यावर आला. 2004 साली या दोघा भावांत बेबनाव होत असल्याचे चित्र प्रसिद्धी माध्यमांसमोर आले. या वादाची अखेर रिलायन्स साम्राज्याच्या विभागणीत झाली.
X X
सन्मान आणि पुरस्कार:
1. 1993: 'बिझनेस इंडिया' मासिकाच्या वतीने 'बिझनेस मॅन ऑफ दि इअर 1993' म्हणून सन्मानित.
2. 1994: 'टेक्सटाइल्स इन्स्टिट्यूटची' सदस्यता देऊन सन्मानित.
3. 1998: 'बिझनेस वीक,' या अमेरिकन मासिकाच्या वतीने 'स्टार ऑफ एशिया' पुरस्कार.
4. 1998: पेन्सिल्व्हेनिया विद्यापीठाच्या वॉरटन बिझनेस स्कूलच्या वतीने 'डीन्स मेडल' प्रदान.
5. जुलै 1999: 'टाइम्स ऑफ इंडिया' च्या वतीने सर्वाधिक कौतुकास्पद 'भारतीय बिझनेस लीडर' म्हणून घोषित.
6. 1999: बिझनेस बेरेंजच्या 'प्रभावी 50' व्यक्तींच्या यादीत समावेश.
7. डिसेंबर 1999 : इंडियन मर्चेंटस् चेंबरद्वारा 'विसाव्या शतकातील स्वप्नदृष्टा' म्हणून निवड.
8. जानेवारी 2000 : इंडिया टुडेच्या वतीने 'आर्थिक समतेचे संस्थापक' म्हणून निवड.
9. 2000: 'एशिया वीक' मासिकाच्या वतीने 'प्रभावी 50' व्यक्तींच्या यादीत समावेश.
10. मार्च 2000 : 'फिक्की' च्या वतीने 'विसाव्या शतकातील भारतीय उद्योजक' म्हणून सन्मानित.
11. नोव्हेंबर 2000 : केमटक फाऊंडेशन आणि केमिकल इंजिनिअरिंग वर्ल्डच्या वतीने 'मॅन ऑफ दि सेंच्युरी ॲवॉर्ड' पुरस्कार प्रदान.
12. डिसेंबर 2000 : मुंबई महापालिकेच्या वतीने नागरी सत्कार आणि मानपत्र.
13. जून 1999, 2000, 2001 : भारतातील सर्वांत प्रभावी सीईओ पुरस्कार.
14. ऑगस्ट 2002 : एकॉनॉमिक्स टाइम्सच्या वतीने व्यावसायिक उत्तमतेचा जीवन गौरव पुरस्कार.
15. फेब्रुवारी 2002 : इंडिया एचआरडी काँग्रेसच्या वतीने 'जीवन गौरव' पुरस्कार.
XX
View, comments and share....
0 Comments