Jehangir Ratanji Dadabhoy Tata JRD: Indian aviator, industrialist, entrepreneur and chairman of Tata Group.
जे आर डी टाटा (जहांगिर रतनजी दादाभाई टाटा) : टाटा उद्योगसमूहाचे अध्यक्ष
(इ. स. 1904 ते 1993)
पन्नासहून अधिक वर्षे ज्यांनी टाटा उद्योगसमूहाची धुरा अध्यक्ष या नात्याने सांभाळली ते जेआरडी टाटा (जहांगिर रतनजी दादाभाई टाटा) ऊर्फ 'जेह' हे गेल्या शतकातील आपल्या देशातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व होय. भारत सरकारने त्यांना 1992 मध्ये 'भारतरत्न' या बहुमानाने सन्मानित केले. भारतीय नागरी जीवनातील हा सर्वोत्तम सन्मान समजला जातो. तो मिळविणारे जेआरडी टाटा हे एकमेव उद्योगपती आहेत. यावरून त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि योगदान किती मोठे, भरीव आणि महत्त्वाचे आहे याची कल्पना येते. त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांना अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मानसन्मान मिळाले.
X X
अध्यक्ष म्हणून कामगिरी :
टाटा उद्योगसमूहाच्या अध्यक्षपदी ते त्यांच्या वयाच्या 34 व्या वर्षी म्हणजे इ. स. 1938 मध्ये आले, तेव्हा समूहात जवळपास तेरा कंपन्या होत्या. त्यांनी टाटा उद्योगसमूहाचे अध्यक्षपद सोडले तेव्हा कंपन्यांची संख्या ऐंशीच्या घरात गेली होती. पोलाद, वस्त्रोद्योग, धातू उद्योग याने सुरुवात झालेल्या टाटा उद्योगसमूहाच्या व्यवसायात त्यांनी वीजनिर्मिती, अभियांत्रिकी उद्योग, हॉटेल उद्योग, हवाई वाहतूक उद्योग, माहिती तंत्रज्ञान उद्योग, सल्लागार सेवा, कला व संस्कृतीशी निगडित उपक्रम, ग्राहकोपयोगी उत्पादने, औद्योगिक उत्पादने असे अक्षरशः प्रत्येक उद्योगक्षेत्राला जोडले. मिठापासून विमानापर्यंत 'टाटा' हे नाव उद्योगधंद्याच्या प्रत्येक क्षेत्रात गाजते. औद्योगिक विश्वाचा हा असा चहुमुखी विकास-विस्तार करीत असतानाच कुटुंबकल्याण, साक्षरता अभियान, महिला सबलीकरण, आरोग्यसेवा असा प्रत्येक सामाजिक संदर्भातील कार्यातही त्यांनी 'टाटां'चा सहभाग नोंदविलाच; पण त्यासंदर्भातील पायाभूत कामगिरी बजावली. त्यांच्या वार्षिक सभेतील भाषणांचा संग्रह 'कि- नोट ॲड्रेस' या नावाने इंग्रजीतून प्रसिद्ध झालेला आहे. ही भाषणे जेआरडींचे द्रष्टेपण, मोठेपण, चौफेरदृष्टी, अभिव्यक्त करतात.
X X
जे.आर.डी. टाटा: औद्योगिक साम्राज्य :
इथे त्यांचे काही प्रमुख उपक्रमांचे उल्लेख तेवढे केलेले आहेत. तसेच त्यांना मिळालेल्या काही महत्त्वाच्या पुरस्कार-बहुमानांचेही केवळ उल्लेख दिलेले आहेत. जगाच्या औद्योगिक इतिहासात एखादे प्रचंड औद्योगिक साम्राज्य उभे करण्याचे, त्याचा अध्यक्ष म्हणून अर्धशतकापेक्षा अधिक काळ कार्य करण्याचे, सामाजिक क्षेत्रातही अभूतपूर्व कामगिरी करण्याचे जेआरडी टाटा यांच्यासारखे दुसरे उदाहरण नसावे. सूत्ररूपाने त्यांच्या कार्याच्या ठळक घटना, घडामोडी, मानसन्मान यांची नोंद पुढीलप्रमाणे घेता येईल.
X X
उद्योगक्षेत्रातील कामगिरी :
जेआरडी टाटांना दोन महायुद्धे, स्वातंत्र्यसंग्राम, स्वातंत्र्योत्तर भारतीय उपखंडाची झालेली फाळणी, पंडित नेहरूंची पंतप्रधानकीची आरंभीची वर्षे, स्वातंत्र्योत्तर भारतीय लोकशाहीची वाटचाल असा फार मोठा कालखंड पाहायला मिळाला होता. दीर्घकाळ देशातील क्रमांक एकचा उद्योगसमूह म्हणून 'टाटा' हे नाव विख्यात आहेच. केंद्र सरकारच्या मर्जीतील हा उद्योगसमूह होता. त्याचप्रमाणे केंद्र सरकारची नाराजीही या उद्योगसमूहाने ओढवून घेतली. या राजकीय परिस्थितीचा उद्योगसमूहाला फायदा झाला. तसाच तोटाही झाला. अर्थात, तरीही राजकीय संदर्भात त्यांनी फारसे स्वारस्य दाखविले नाही. त्यांनी आपले लक्ष आपल्या कामकाजावर, उद्योगधंदे व अन्य उपक्रमांवरच केंद्रित ठेवले.
1. 1932 मध्ये भारतीय उपखंडात हवाई वाहतूक सुरू करण्याचे श्रेय जेआरडी टाटांना जाते. तेव्हाच्या भारतीय उपखंडात पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका हे सगळेच मोडत होते. ही हवाई वाहतूक कंपनीच नंतर 'एअर इंडिया' नावाने विख्यात झाली. या कंपनीचे बोधचिन्ह म्हणून तेव्हा वापरले जाणारे 'महाराजा'चे डिझाईन त्या काळी जगभर महशूर होते. जेआरडी स्वतः उत्तम वैमानिक होते. विविध प्रकारची विमाने उडविण्याचा त्यांना दांडगा अनुभव होता. विमानोड्डाण हा त्यांचा आवडीचा छंदही होता. त्यामुळे या विषयाचा त्यांनी भरपूर अभ्यासही केला होता.
2. देशातील खाजगी क्षेत्रांतील पहिला वीजनिर्मिती प्रकल्प सुरू करण्याचे श्रेयही टाटा उद्योगसमूहास जाते. हे जेआरडींच्याच कारकिर्दीत झाले.
3. विमा व्यवसाय भारतात आणणे, तो रुजविणे, फैलावणे याचेही श्रेय टाटा उद्योगसमूहास आहे. त्याचप्रमाणे सेवाक्षेत्रात उत्कृष्ट दर्जाची पंचतारांकित हॉटेल शृंखला सुरू करण्याचेही श्रेय टाटा उद्योगसमूहास आहे. 'ताज ग्रुप' हा हॉटेल शृंखला समूह आहे. त्याच्या विस्तारीकरणात त्या विभागाचे प्रमुख असणारे श्री. अजित केरकर यांचा महत्त्वाचा वाटा आहे, हे खरे; पण त्यांना प्रेरणा आणि पाठिंबा ग्रुपचे अध्यक्ष जेआरडी टाटांचा असे.
X X
4. ट्रक्स, मालवाहतुकीच्या मोटारी तयार करण्याचे श्रेय टाटाला आहे. आज देशभर लक्षावधी टाटा ट्रक्स, मिनीट्रक्स व मालवाहतुकीची वाणिज्य वाहने धावत असतात. त्यातून करोडो लोकांसाठी रोजगार निर्माण झाला आहे. असे म्हणतात की, जेव्हा एक ट्रक रस्त्यावर येते, तेव्हा ती सुमारे शंभर जणांसाठी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण करते. तांत्रिक कुशल मजूर, ढाबेवाले, पंक्चरवाले, दुरुस्तीवाले, मालाची चढउतार करणारे हमाल आदींना त्यामुळे काम मिळते. 'टाटा'चे लाखो ट्रक देशात आहेत. त्यामुळे किती रोजगार निर्माण झाला असेल याची कल्पनाच केलेली बरी. 'टेल्को' या पुण्यातील कंपनीत हे ट्रक तयार होतात.
5. त्याचप्रमाणे टाटा 'सुमो' या जीप्सदेखील लाखोंच्या संख्येत आहेत. टाटा 'इंडिका' आणि टाटा 'इंडिगो' या कारही बाजारात आहेत. थोडक्यात मालवाहतूक, प्रवासी वाहतूक या क्षेत्रातील टेल्को आणि टाटाचे योगदान हादेखील एका स्वतंत्र ग्रंथाचाच विषय आहे. या गाड्या नसत्या तर... ही कल्पनाच आपण करू शकणार नाही.
6. देशात 'क्वॉर्टझ' तंत्रज्ञानाची उत्तम दर्जाची घड्याळे तयार करण्याचे श्रेय टाटांना आहे. 'टायटन' हा तो ब्रॅण्ड. आज जगातील पाच आघाडीच्या क्वॉर्टझ तंत्रज्ञान घड्याळ कंपन्यांपैकी 'टायटन' ही एक महत्त्वाची कंपनी ठरली.
7. देशातील एकात्मिक चहा कंपनी म्हणूनही आपल्याला 'टाटा'कडेच पाहावे लागते. त्यांचा 'वाह ताज!' हा दर्जेदार चहाचा बॅण्ड आणि त्याच्या तबला उस्ताद जाकीर हुसैन करीत असलेल्या जाहिराती महशूर आहेतच. जागतिक स्तरावरची 'टेटली' ही चहा कंपनीही नुकतीच टाटाने विकत घेतलीय. त्याबद्दल स्वतंत्र माहिती याच पुस्तकात दिलेली आहे.
8. मीठ, सोडाॲशपासून ते यंत्रसामुग्री, फोर्कलिफ्ट ट्रक्स, अवजड मशिनरी, अवजारे, अशी अक्षरशः म्हणाल ती प्रत्येक वस्तू 'टाटां'शी निगडित आहे, असे आढळते.
9. शिक्षण आणि समाज विज्ञानाच्या संदर्भातही 'टाटा'ने अजोड कामगिरी विविध संस्था उभारून केलेली आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (टिस), टाटा मॅनेजमेंट ट्रेनिंग सेंटर- पुणे, टाटा एनर्जी रिसर्च इन्स्टिट्यूट, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, भामा अणुशक्ती केंद्र, टाटा कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट, टाटा हॉस्पिटल अशी ही यादी खूप मोठी आहे. या सर्वांच्या पाठीमागे जेआरडींचे पाठबळ, प्रेरणा, दूरदृष्टी आणि परिश्रम आहेत.
10. 1968 मध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) सुरू झाली. व्यवस्थापनशास्त्र, माहिती तंत्रज्ञान याबाबत सेवा-सल्ला देणारी ही आज जगातील एक सुविख्यात सल्लागार संस्था झालेली आहे. केवळ वित्तविषयक संशोधन आणि सल्ला देणारी टाटा इकॉनॉमिक कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ही संस्था कार्यरत आहे. याखेरीज टाटा फायनान्शियल सर्व्हिसेस, टाटा क्वॉलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस याही संस्था कार्यरत आहेत.
X X
11. परदेशांतही 'टाटा'ची कार्यालये, शाखा कार्यालये आहेत. आज 'टाटा' हा ट्रेडमार्क वापरायचा असेल, तर त्यासाठी 'टाटा सन्स लि.,' या कंपनीकडे त्याचे सर्वाधिकार आहेत. त्यांच्या परवानगीनेच टाटा ट्रेडमार्क वापरता येतो. या टाटा सन्स लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळात टाटा उद्योगसमूहातील प्रमुख कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) असतात आणि त्यांतून अध्यक्षाची निवड होत असते. टाटा सन्स लिमिटेड कंपनीच्या जो अध्यक्षपदी येतो, तोच टाटा उद्योगसमूहाचा अध्यक्ष म्हणून ओळखला जातो. टाटा सन्स कंपनीचा पत्ता आहे, बॉम्बे हाऊस, 24 होमी मोदी स्ट्रीट, फोर्ट मुंबई-1.
सध्या रतन टाटा हे 'टाटा सन्स' लिमिटेडचे आणि म्हणून टाटा उद्योगसमूहाचे अध्यक्ष आहेत.
12. जर्मन सरकारने जेआरडींना 'नाईट कमांडर क्रॉस' हा बहुमान दिला, तर लंडनच्या धातुशास्त्र संस्थेने 'बेसेमर मेडल' नामक एक मोलाचा बहुमान दिला. युनायटेड नेशन्सने त्यांना 'पॉप्युलेशन ॲवॉर्ड' दिलेला आहे. अन्यही अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार जेआरडींना त्यांच्या हयातीत मिळाले. सुमारे नव्वद वर्षांचे आयुष्य लाभलेले जेआरडी ऊर्फ 'जेह' टाटा हे या युगातील एक महत्त्वाचे द्रष्टे पुरुष आहेत, यात वाद नाही. त्यांच्या आई फ्रेंच होत्या. त्यांचे शिक्षण रूढार्थाने आजच्या बारावी परीक्षेइतकेच झालेले होते. महायुद्धे व अन्य कारणांमुळे भारताखेरीज त्यांना अन्य देशांतही राहावे लागले होते. मात्र दुर्दैवाने ते निपुत्रिक होते.
XX
https://gyaaniinfo.blogspot.com/2023/10/bharat-ratna-indias-highest-honor-award.html
👆
Bharat Ratna: India's highest honor award
भारतरत्न : भारतातील सर्वोच्च सन्मान पुरस्कार
View, Comments and share
X X
View, comments and share.....
0 Comments