Subscribe Us

header ads

Dhondo Keshav Karve: Educator,Social Reformer

Dhondo Keshav Karve: Maharshi Karve, social reformer in India in the field of women's welfare. 

महर्षी धोंडो केशव कर्वे: समाजसुधारक, स्त्री शिक्षणाचे शिल्पकार

18 एप्रिल  : जयंती 

स्मृतिदिन: 9 नोव्हेंबर



बालपण आणि शिक्षण :

समाजसुधारक, स्त्री शिक्षणाचे शिल्पकार महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यात मुरूड या छोट्या गावात 18 एप्रिल 1858 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव केशव बापूराव कर्वे व आईचे नाव लक्ष्मीबाई केशव कर्वे होते. विशेष म्हणजे 1834 मध्ये त्यांच्या गावी हायस्कूल स्थापन झाले होते. या गावातील विश्वनाथ नारायण मंडलिक यांचा आदर्श धोंडो केशव कर्वे यांनी आपल्यापुढे ठेवला होता. नि:स्वार्थीपणा, प्रामाणिकपणा, लोकसेवा करण्याची प्रेरणा त्यांना प्राथमिक शिक्षक सोमण गुरुजी यांच्यापासून मिळाली. त्यांचे प्राथमिक शिक्षण मुरूड येथील शाळेत झाले. 1876 मध्ये ते मराठी 6 वी परीक्षा उत्तीर्ण झाले होते. 1881 मध्ये मॅट्रिक होऊन शिक्षकाचे ट्रेनिंग घेऊन शिक्षक व्हावयाचे एवढीच त्यांची शाळेत असताना महत्त्वाकांक्षा होती. शाळेत असतानाच स्वाभिमान व स्वावलंबनाचा संस्कार त्यांच्यावर झाला होता. मुरूड येथे असताना ते स्वतः हाताने स्वयंपाक करीत. ते शाळेत  असतानाच वडिलांचे तापाने निधन झाले. स्कॉलरशिप, शिकवण्या व लोकसंख्या शिरगणतीचे काम आदी विविध मार्गांनी आर्थिक सहकार्य मिळवून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले.

महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी मुंबईचे विल्सन कॉलेज निवडले. तेथून ते बी. ए. पदवीसाठी गणित हा विषय घेऊन ते 1884 मध्ये पदवीधर झाले. मुंबईत असतानाही खासगी शिकवण्या घेत घेत ते आपला खर्च भागवत. महाविद्यालयात असताना स्पेन्सरच्या ग्रंथाविषयी त्यांना आवड होती. आगरकरांचे 'केसरी' व 'सुधारक च्या पत्रांतील लेख ते वाचत असत. शाळेत व महाविद्यालयात असताना त्यांना ख्रिश्चन धर्माचे बायबल, ख्रिस्ती धर्मातील आचार-विचार यांचे वाचन केले पण ख्रिश्चन धर्माचे आकर्षण त्यांना मुळीच वाटत नव्हते. मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजातही त्यांनी प्राध्यापक म्हणून नोकरी मिळवळी.  

X X

फर्ग्युसन कॉलेजात गणिताचे प्रोफेसर :

धोंडो केशव कर्वे यांची 1891 मध्ये पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणिताचे प्राध्यापक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात ना. गोखले यांचा महत्त्वाचा वाटा होता. आपला विषय घरी तयार करावयाचा व कॉलेजमध्ये जाऊन तो उत्तम शिकवायचा हाच त्यांचा क्रम होता. एक उत्तम प्राध्यापक असा लौकिक त्यांनी मिळवला. फर्ग्युसन महाविद्यालय जी संस्था डेक्कन एज्युकेशन सोसायटी चालवत होती त्या संस्थेचे लाईफमेंबरही त्यांना करून घेतले गेले. संस्थेचे लाईफ मेंबर या नात्याने त्यांनी महाविद्यालयात "Student Fund" ही योजना राबविली. एवढेच नव्हे तर त्यांना मिळणाऱ्या 75 रु. पगारातून दरमहा 10 रु. फंडात जमा करून तो पैसा त्यांनी संस्थेला देणगी म्हणून दिला. 

X X

कौटुंबिक जीवन व व्यक्तिवैशिष्ट्ये : विधवेशी पुनर्विवाह

कर्वे हे वयाच्या 15 व्या वर्षीच राधाबाईशी विवाहबद्ध झाले तेव्हा त्यांच्या पत्नीचे वय 9 वर्षे होते. 20 व्या वर्षी वैवाहिक जीवनास खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. 24 व्या वर्षी त्यांना रघुनाथ हा मुलगा झाला. कर्वे यांना चार मुले होती. त्यापैकी पहिल्या बायकोचा रघुनाथ (र. धों. कर्वे) हा मुलगा होता. तो गणित विषयात प्रोफेसर होता. 'समाजस्वास्थ्य' या मासिकाचा तो संपादक होता. त्याची बायको मालती ही शिक्षिका होती. कर्वे यांची पहिली पत्नी राधा ही मृत्यू पावली. त्या नंतर पंडिता रमाबाईंच्या मुंबई येथील शारदाश्रमात 4 वर्षे वास्तव्यास असलेली वय वर्ष 28 असलेली गोदुताई हिच्याबरोबर पुनर्विवाह केला. पुढे हिचे नाव आनंदीबाई असे ठेवले. गोदुताई ही कर्वे यांचे मित्र नरहरपंत जोशी यांची विधवा बहीण होती. हा विधवा विवाह म्हणजे पुण्यात जाहीरपणे आगरकरांच्या उपस्थितीत झालेला पहिलाच पुनर्विवाह होय. कर्वे यांची दुसरी पत्नी आनंदीबाई हिला 3 पुत्र झाले. शंकर हा दुसरा मुलगा एम.बी.बी.एस. होता. दिनकर हा तिसरा मुलगा बी.एस्सी. होता व बंगलोर तेथील रिसर्च इन्स्ट्यूिटमध्ये नोकरीस होता. भास्कर हा चौथा मुलगा बी.एस्सी. बी. टी. शिक्षक होता. त्यांची चारही मुले ज्ञानवंत, कीर्तिवंत होती. कर्वे यांचा स्वभाव अत्यंत भिडस्त, तुटक, हिशोबी, सडेतोड होता. दुसऱ्याला खुश करणे त्यांना जमत नसे. पैशाची हाव त्यांना कधीच नव्हती. परमेश्वराची पूजाअर्चा, प्रार्थना, भजन, जपजाप्य वगैरे गोष्टींमध्ये त्यांचे मन कधीच रमले नाही. त्यांच्या पत्नी आनंदीबाई कर्वे (बाया कर्वे) या 1950 साली मृत्यू पावल्या. त्यांनी कधी पूजा-अर्चा केली नाही. त्या कधीही मंदिरात गेल्या नाहीत. देवावर त्यांचा विश्वास नव्हता. 57 वर्षांचे वैवाहिक आयुष्य त्या जगल्या.

X X

'विधवा विवाहोत्तेजक मंडळी'  संस्थेची स्थापना:

 विधवेशी पुनर्विवाहाच्या निमित्ताने कर्वे यांना 1894 मध्ये जे अनुभव आले त्यातून पुनर्विवाहाच्या संदर्भात लोकमत तयार करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. कॉलेजची ड्युटी संपली की विधवा विवाहासंबंधी लोकमत अनुकूल करण्यासाठी ते दौरे काढत असत, व्याख्याने देत असत. विधवा विवाहाचे कार्य जेवढे लोकमताला न दुखावता करणे शक्य असेल तेवढे करावे असे त्यांचे मत होते. विधवा विवाहाचे कार्य करावे यासाठी 'विधवा विवाहोत्तेजक मंडळी' या नावाची संस्था स्थापन केली. पुढे याच संस्थेचे नाव 'विधवा विवाह प्रतिबंध निवारक मंडळी' असे बदलण्यात आले. या संस्थेच्या चिटणीसपदी 1899 पर्यंत होते. या संस्थेसाठी फंड जमा करण्यात त्यांना खटपट करावी लागली. ज्यांना पुनर्विवाह करण्याची इच्छा असेल त्यांना ही संस्था मदत करी. विधवेशी पुनर्विवाह केलेल्या मंडळीची या संस्थेच्या वतीने दरवर्षी कर्वे वार्षिक संमेलने भरवत असत.

X X

अनाथ बालिकाश्रमाची स्थापना  :

कर्वे यांनी 14 जून 1896 रोजी "अनाथ बालिकाश्रमाची" स्थापना केली. स्वत: कर्वे या संस्थेचे चिटणीस तर डॉ. रा. गो. भांडारकर अध्यक्ष होते. या संस्थेस वर्गणी जमा करण्यासाठी त्यांनी दूरदूर पर्यन्त प्रवास केला.1898 पर्यंत 9871 रु. देणगी जमा झाली. ज्या विधवा मदतीसाठी अर्ज करतील त्यांची राहण्याची व शिक्षणाची सोय करण्याचे या संस्थेच्या वतीने ठरविण्यात आले होते. पुण्यात सदाशिव पेठेत पेरूगेटजवळ या संस्थेचे कार्यालय सुरू करण्यात आले होते. प्रारंभी संस्थेच्या वतीने 8 विद्यार्थिनी संस्थेच्या खर्चाने फिमेल हायस्कूल व फिमेल ट्रेनिंग कॉलेज या शाळांत शिकत होत्या व तेथील वसतिगृहातच राहत होत्या. 'अनाथ बालिकाश्रम' ही संस्था केवळ शिक्षणासाठी असावी व पुनर्विवाहाच्या प्रश्नासंबंधाने तिने तटस्थ वृत्ती स्वीकारावी अशी कर्वे यांची भूमिका होती. कर्वे यांच्या या आश्रमात विधवा फार कमी संख्येने आल्या. कारण विधवांची मने पुनर्विवाहासाठी वळवली जातील अशी भीती लोकांना वाटे. प्रारंभीच्या 5 वर्षांत कर्वे यांच्या संस्थेत ज्या मुली आल्या त्यांची संख्या टप्याटप्प्याने 4, 7, 11, 14, 21 अशी वाढत गेली. कर्वे यांच्या या आश्रमात 1914 सालापर्यंत ब्राह्मणांव्यतिरिक्त मराठा, वाणी, तेली, धनगर या जातींच्या स्त्रियाही आल्या होत्या असा उल्लेख कर्वे यांच्या आत्मचरित्रात सापडतो.

X X

धोंडो केशव कर्वे यांची हिंगणे कर्मभूमीच बनली :

धोंडो केशव कर्वे यांनी 1896 मध्ये पुण्याला "अनाथ बालिकाश्रम" नावाची संस्था स्थापन केली. पुढे 1899 मध्ये पुण्यात प्लेगची साथ आली तेव्हा कर्वे यांनी सध्या पुण्याचा भाग असलेले हिंगणे येथे एका झोपडीत "अनाथ बालिकाश्रम" नेण्याचे ठरविले. या संस्थेसाठी श्री. रावबहादुर गोखले नावाच्या एका व्यक्तीने अण्णांना हिंगणे येथे 6 एकर जमीनही देणगी म्हणून दिली व अण्णांनी त्या ठिकाणी चार खोल्यांची इमारत बांधून आश्रम पुन्हा सुरू केला. दिवसभर फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकवावयाचे, संध्याकाळी हिंगणे येथील आश्रमात पायी जायचे व सकाळी पुण्यात परत यायचे हा कर्वे यांचा जणू जीवनक्रमच बनला. 1920 मध्ये तेथे इमारत तयार झाल्यावर कर्वे आपल्या कुटुंबासह तेथे राहावयास गेले. हिंगणे हीच त्यांची कर्मभूमी बनली. 'माझ्या संस्था मला माझ्या आप्ताहून व प्राणाहूनही प्रिय वाटत' असे कर्वे म्हणत. 

1902 मध्ये आनंदीबाई कर्वे यांच्या भगिनी पार्वतीबाई आठवले या कर्वे यांच्या आश्रमात आल्या तेव्हा 25 वर्षांच्या होत्या. अशिक्षित होत्या. कर्वे यांच्या आश्रमात राहून शिकल्या व ट्रेनिंग कॉलेजचेही प्रमाणपत्र मिळवले. आश्रमाचेही काम पाहू लागल्या. आश्रमाच्या त्या आधारस्तंभच बनल्या होत्या. श्रीमती वेणुबाई नामजोशी व काशीबाई देवधर या 1904 मध्ये कर्वे यांच्या आश्रमात आल्या. कर्वे यांच्या आश्रमाला उन्नतावस्था आणण्यात त्या दोघींचाही वाटा आहे. काशीबाई देवधर यांनी आश्रमात लेडी सुपरिटेंडेंटचे काम केले. 1904 पर्यंत त्या तेथे होत्या. 1905 पासून कर्वे यांची ही संस्था नावारूपास आली व दूरदूरचे लोक संस्था पाहण्यासाठी येऊ लागले.

X X

महिला विद्यालयाची स्थापना :

अनाथ महिलाश्रमाच्या वृक्षावर रुजलेले झाड म्हणजे "महिला विद्यालया"ची स्थापना होय. हिंगणे येथे 1907 मध्ये महिला विद्यालयाच्या इमारतीचे काम सुरू झाले व 1912 मध्ये ते पूर्ण झाले. स्त्रिया शिकल्या तर त्या नवऱ्यास सोडून देतील, मुलीस शिकवले तर नवऱ्याचे आयुष्य कमी होते, त्या पुनर्विवाह करतात, कुमार्गास लागतात असे काही गैरसमज त्या काळात प्रचलित होते. या गैरसमजाच्या पार्श्वभूमीवर कर्वे यांचे कार्य हे अत्यंत कठीण होते. पण तरीही कर्वे यांच्या महिला विद्यालयाने यशस्वी वाटचाल केली. या विद्यालयात आता विधवांच्या बरोबर कुमारिकाही दाखल होऊ लागल्या. प्रारंभी हे विद्यालय 4 मार्च 1907 मध्ये पुण्यातील लाकडी पुलाजवळ एका प्रशस्त वाड्यात 6 मुलींनीशी सुरू झाले. पण पुढे 1911 मध्ये हिंगणे येथील अनाथाश्रमाच्या शेजारीच या विद्यालयाची इमारत झाली व तेथे निवासी महिला विद्यालय सुरू झाले. महिला विद्यालय हे बोर्डिंग स्कूल बनले. 

 कर्वे यांच्या संस्थेने अनेक महिलांना जीवनाचा प्रकाश दाखविला. श्रीमती सीताबाई आण्णिगिरी या कर्नाटकातील बालविधवेला हिंगणे येथील संस्थेत आणून मॅट्रिकपर्यंत शिक्षण दिले. पुढे त्या पदवीधर झाल्या. संस्थेच्या शाळेत त्या मुख्याध्यापिका झाल्या.

 X X

निष्काम कर्म मठाची स्थापना :

राष्ट्राच्या, समाजाच्या उद्धारासाठी नि:स्वार्थी स्त्री-पुरुषांचे संघ निर्माण झाले पाहिजेत असे कर्वे यांना सुरुवाती पासून वाटत होते. निष्काम कर्ममठाचा मुख्य हेतू स्त्रियांची सेवा करणे, उद्धार करणे शक्य झाल्यास स्वतःच्या हिमतीवर स्त्री समाजाच्या उपयोगी पडणाऱ्या संस्था चालविणे हा होता. 'मठ' या शब्दाचा अर्थ Mission (मिशन) या शब्दाशी मिळणारा आहे. 'कर्म' या शब्दाचा अर्थ मी, माझी बायको, माझी मुले या कल्पना ज्यात विरून जातील अशा प्रकारची परोपकाराची समाजोन्नती कर्मे असा होतो. निष्काम कर्म मठ या संस्थेच्या कल्पनेचे बरेच दिवस चिंतन झाल्यानंतर त्याला मूर्त स्वरूप देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. 6 डिसेंबर 1910 रोजी मठाच्या सेवक-सेविकांची सभा महिला विद्यालयात होऊन मठाचे नियम तयार केले गेले. मठाच्या सेवक-सेविकांना आपली राहणी साधी ठेवण्याचे, खासगी वर्तन शुद्ध ठेवण्याची, कोणाचाही द्वेष न करण्याची, संस्थेची, नियम पाळण्याची, संस्थेच्या कार्यासाठी खर्च करण्याची शपथ घ्यावी लागे. कार्यकर्त्याच्या अभावी 'निष्काम कर्ममठ' प्रभावी काम करू शकला नाही.

X X

भारतवर्षीय महिला विद्यापीठाची स्थापना :

(श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ) (SNDT)

1915 मध्ये 'जपान वुमेन्स युनिव्हर्सिटी' या नावाचे एक पुस्तक कर्वे यांच्या वाचनात आले. त्यात जपानमधील स्त्रियांच्या विद्यापीठाची माहिती होती. हे पुस्तक वाचून जपानप्रमाणेच आपल्या स्त्रियांमध्ये माध्यमिक व उच्च शिक्षणाचा प्रसार वेगाने करता येईल असे विचार त्यांच्या मनात घोळू लागले. जपानमध्ये महिलासाठी 1900 मध्ये 12 हायस्कूल्स होते तर 1912 मध्ये ती संख्या 182 झाली. भारतालाही स्त्री शिक्षणासाठी जपानच्या मार्गाने जाता येईल असे कर्वे यांना वाटत होते. अनाथ बालिकाश्रमाच्या व्यवस्थापक मंडळीपुढे महाराष्ट्रासाठी मराठी भाषेतून शिक्षण देणारे ज्यात इंग्रजीही आवश्यक विषय म्हणून शिकवला जाईल असे विद्यापीठ काढण्याचा प्रस्ताव मांडला व तो मंजूर करून घेतला. "भारतवर्षीय महिला विद्यापीठ" (Indian Women's University) हे नाव कर्वे यांनी निश्चित केले व प्रांतीय समिती स्थापन करण्यात आली. या विद्यापीठासाठी कर्वे यांनी मुंबई प्रांतात, चेन्नई तसेच बंगाल इलाख्यात फिरून प्रचार केला व वर्गणीही मिळवली.

3 जून 1916 रोजी विद्यापीठ अधिकृतपणे स्थापन झाले. या विद्यापीठाच्या वतीने प्राथमिक शाळेतील अध्यापिका विद्यालय सुरू करून ते या विद्यापीठाला जोडले गेले. या विद्यापीठात महिलांसाठी खास अभ्यासक्रम तयार करण्यात आला होता. वनस्पतिशास्त्र, प्राणिशास्त्र, शरीररचनाशास्त्र, इंद्रियविज्ञानशास्त्र, मानसशास्त्र, समाजशास्त्र, गायनकला, वादनकला आदी विषय शिकवले जात. उच्च शिक्षण मातृभाषेतून दिले जाई गृहशास्त्र, आरोग्यशास्त्र हे या विद्यापीठाचे विशेष होय. मातृभाषेच्या अभ्यासाला पहिले स्थान तर इंग्रजी भाषेला दुय्यम स्थान दिले जाई. गणित या विषयासाठी अध्यापन केले जाई, पण तो विषय सक्तीचा नव्हता. सर रा. गो. भांडारकर हे या विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते.

1920 मध्ये सेठ विठ्ठलदास ठाकरसी यांनी आपल्या मातोश्री श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी यांच्या स्मरणार्थ 16 लाख रुपयांची देणगी महिला विद्यापीठाला दिली. त्यामुळे पुढे धोंडो केशव कर्वे यांनी या विद्यापीठाचे नाव श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ (SNDT) असे रूपांतरीत केले.

X X

एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठाचा विस्तार :

हिंगणे येथे महिला पाठशाळा महिलाश्रम व अध्यापक शाळा हा या विद्यापीठाचा प्रारंभी विस्तार झाला होता. सर विठ्ठलदास ठाकरसी यांनी आपल्या मातोश्री नाथीबाई दामोदर ठाकरसी यांच्या स्मरणार्थ 16 लाख रु. देणगी या विद्यापीठास दिली. याच स्त्रीच्या नावाने एस. एन. डी. टी. हे विद्यापीठ ओळखले जाऊ लागले. त्यानंतर विद्यापीठास देणग्या मिळतच गेल्या. विद्यार्थिनीच्या वसतिगृहासाठी मुंबईचे खटाव यांनी 35000 रु. देणगी दिली. पण प्रामुख्याने ठाकरसींच्या देणगीमुळे विद्यापीठास स्थैर्य प्राप्त झाले. तरीही भारतात फिरून विद्यापीठाचा प्रचार करण्याचे कार्य चालूच होते. आश्रमाने चालविलेले कॉलेज व चिपळूणकरांनी काढलेली पुण्यातील कन्याशाळा ही विद्यापीठाच्या स्वाधीन करण्यात आली. सातारा, सांगली व बेळगाव या ठिकाणी स्थानिक लोकांच्या सहकार्याने दोन वर्ग सुरू करून दरवर्षी एकेक वर्ग वाढवून पूर्ण हायस्कूल काढून ती विद्यापीठास जोडली. नगर, सिंध, हैदराबाद, नागपूरपर्यंत विद्यापीठांच्या कक्षा जाऊन पोहोचल्या. माध्यमिक शिक्षणाची सोय मराठी, गुजराती, तेलगू व सिंधी या 4 भाषांतून केली गेली तर उच्च शिक्षणाची सोय मराठी, गुजराती व सिंधी या भाषेतून केली गेली. मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंनी या विद्यापीठास कधीच मान्यता दिली नाही. कारण तेथे इंग्रजी माध्यम नव्हते. गांधीजींनी मात्र कर्वेंच्या या शैक्षणिक प्रकल्पाची प्रशंसा केली होती. पुढे भारत स्वतंत्र झाल्यावर 1949 मध्ये विद्यापीठास अधिकृत मान्यता मिळाली.1951 मध्ये महर्षी कर्वे यांनी स्थापन केलेल्या एस.एन.डी.टी. विद्यापीठास इतर विद्यापीठांच्या बरोबरीचा दर्जा मिळाला.

X X

कर्वे यांचा युरोप, अमेरिका, आशिया, आफ्रिकेचा प्रवास :

महिला विद्यापीठाच्या कार्याचा प्रचार करणे, त्यासाठी द्रव्य साहाय्य मिळवणे, पाश्चात्त्य देशांतील स्त्रियांची हायस्कुले व कॉलेज पाहून त्यापासून काही बोध घेता येईल काय हे पाहण्याच्या हेतूने त्यांनी जगप्रवास केला. 1929 मध्ये कर्वे आगबोटीने प्रथम लंडनला गेले. इंग्लंडमधील शहरे, पॅरिस शहर, स्कॉटलंडमधील शहरे पहिली. ते 13 महिने विदेशांत होते. युरोप, अमेरिका, जपान, चीन, जावा, मलाया, सेलेबीज आणि फिलिपाईन्स वगैरे देशांना भेटी देऊन 13 महिन्यांत पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली. विद्यापीठाच्या कार्याचा प्रसार करणे हा प्रवासाचा हेतू होता. युरोपियन व अमेरिकन विद्यार्थ्यांत जे हिंदी विद्यार्थी होते त्यांच्यापुढे त्यांनी भाषणे दिली. आफ्रिकेतही हिंदी स्त्रियांसाठी वेगळ्या सभा भरवून व्याख्याने दिली. विद्यापीठासाठी द्रव्याची मदत मिळवणे हा हेतूही काही अंशी साध्य झाला असे सांगतात. युरोपात व अमेरिकेत मुलींचे हायस्कूल्स व कॉलेजेस पुष्कळ प्रमाणात पाहिली. तेथील अभ्यासक्रम पाहिले. व्यायामशाळा पाहिल्या. 1936 मध्ये "महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळा" ची त्यांनी स्थापना केली तर 1944 ला "समता संघ" त्यांनी स्थापन केला होता. 

X X

ग्रंथ संपदा/ निर्मिती:

1. 1928 मध्ये धोंडो केशव कर्वे यांनी "आत्मवृत्त" हे मराठीतील आत्मचरित्र लिहिले.

2. 1936 मध्ये धोंडो केशव कर्वे यांनी इंग्रजीमधील "लुकिंग बॅक" हे आत्मचरित्र लिहिले.

3. 'मानवी समता' हे ८ पानी वृत्तपत्रही सुरू केले पण ते अल्पकाळ चालले.

X X

सन्मान व पुरस्कार:

1. 1951 मध्ये पुणे विद्यापीठाने डि.लीट. पदवी देऊन सन्मान केला.
2. 1942 मध्ये बनारस विद्यापीठाने डि.लीट. देऊन गौरव केला.
3. 1954 मध्ये एस एन डी टी महिला विद्यापीठ मुंबई यांनी डि.लीट. पदवी देऊन गौरव केला.
4. 1955 मध्ये भारत सरकारने "पद्मभूषण" पुरस्कार देऊन गौरव केला.
5. 1957 मध्ये मुंबई विद्यापीठाने LLD ही पदवी देऊन गौरव केला.
6. 1958 मध्ये भारत सरकारने भारताचा सर्वोच्च पुरस्कार "भारतरत्न" देऊन गौरव केला. भारतरत्न पुरस्कार मिळवणारे ते पहिले महाराष्ट्रीय आहेत.

X X

निधन: 

स्त्री जातीचे उद्धारक कर्ते सुधारक असे महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे निधन 9 नोव्हेंबर 1962 रोजी झाले. धोंडो केशव कर्वे हे "स्त्री शिक्षणाचे शिल्पकार" म्हणून ओळखले जातात. त्यांना 105 वर्षांचे दीर्घायुष्य लाभले. शेवटपर्यंत ते निरोगी होते. शुद्ध आचार-विचाराने त्यांच्या जीवनात मांगल्य, पावित्र्य आले होते. ते ऋषितुल्य जीवन जगले. 'महर्षी' ही पदवी त्यांना लोकांनी बहाल केली होती.


X X

महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा अन्य मान्यवरांनी केलेला गौरव:

डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली 18 एप्रिल 1948 रोजी महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा 90 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. तेव्हा 1 लाख रुपयाची थैली त्यांना देण्यात आली. यांच्या जन्मशताब्दी उत्सवाच्या प्रसंगी राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी म्हटले होते, 

‘विपरीत परिस्थितीतही श्रद्धा व चिकाटी यांच्या बळावर मनुष्य केवढे प्रचंड कार्य करू शकतो याचे धोंडो कर्वे मूर्तिमंत उदाहरण होते.' 

पंडित नेहरू मुंबई येथे एका जाहीर सभेत म्हणाले होते,

'धोंडो कर्वे एखाद्या प्राचीन ऋषिमुनीप्रमाणे वाटतात. मी येथे महर्षीचे अभिनंदन करण्यासाठी आलो नाही. तर महर्षीचे आशीर्वाद मागण्यासाठी मी येथे आलो आहे. त्यांची सेवावृत्ती, निष्ठा, साहस, चिकाटी है गुण आम्हाला हवे आहेत. '

आचार्य अत्रे लिहितात,

 'महर्षी कर्वे हे एक लोकोत्तर सेवामूर्ती आहेत. मानवतेचा उद्धार करण्यासाठी प्रत्येक शतकात अशा अद्वितीय सेवामूर्ती जन्मास येत असतात. त्या बोलत नाहीत, त्या लिहीत नाहीत तर त्या नुसती सेवा करतात. सेवा हीच त्यांची प्रतिभा, सेवा हेच त्यांचे काव्य, सेवा हेच त्यांचे साहित्य..... . महर्षी कर्वे ही महाराष्ट्राच्या मोठेपणाची एक चालती बोलती निशाणी आहे.' ‘कर्वे महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासातील महत्त्वाचे पान आहे.'

न्या. प्र. बा. गजेंद्रगडकर यांनी म्हटले होते, 

'कर्वे यांचे चरित्र वाचणे हे अत्यंत आकर्षक आणि प्रेरणा देणारे आहे.' 

X X

डॉ. राधाकृष्णनच्या मते,

 'समाजसेवा व स्त्री शिक्षणासाठी ज्याने आपले जीवन वेचले ते श्री. कर्वे म्हणजे एक श्रेष्ठ शिक्षणतज्ञ व समाजसेवकच होत.'

  म. गांधीच्या मते,

   'स्त्री उद्धाराचे मोठे कार्य कर्वे यांनी हाती घेतले. कवें म्हणजे एक श्रेष्ठ शिक्षणतज्ञ व समाजसेवक होत.' 

गृहमंत्री पंडित गोविंद वल्लभ पंत म्हणाले, 

'तेलंग, रानडे, गोखले आणि टिळक या थोर महाराष्ट्रीयांच्या परंपरेतील धोंडो कर्वे यांनी आपल्या थोर कार्याने लोकांपुढे आदर्श निर्माण केला.'

न. चिं. केळकर यांच्या मते,

 'देणग्यांद्वारे मिळवलेला पैसा शैक्षणिक कार्यासाठी त्यांनी खर्च केला. विशेष म्हणजे समाजसेवेसाठी स्वतः चे तन, मन, धन, अर्पण करणारी ध्येयनिष्ठ व चारित्र्यसंपन्न अशी एक पिढी त्यांनी निर्माण केली. ' 

XX


https://gyaaniinfo.blogspot.com/2023/10/bharat-ratna-indias-highest-honor-award.html

👆

Bharat Ratna: India's highest honor award

भारतरत्न : भारतातील सर्वोच्च सन्मान पुरस्कार





View, Comments and share

   X X

Post a Comment

1 Comments