डॉ. भाऊ दाजी लाड : विचारवंत, डॉक्टर, प्राच्यविद्यापंडित, संशोधक व समाजसुधारक,आर्थिक विकासाचे पुरस्कर्ते जयंती
जन्मदिन: 7 सप्टेंबर
स्मृतीदिन: 31 मे
बालपण आणि शिक्षण
डॉ. भाऊ दाजी यांचा जन्म 7 सप्टेंबर 1822 रोजी शेणवी (सारस्वत ब्राह्मण) जातीत झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठल तर त्यांचे स्वतःचे नाव रामचंद्र होते. त्यांचे मूळ गाव मांजरे हे गोव्यातील पेडणे तालुक्यात होते.
इ.स. 1833 मध्ये त्यांचे कुटुंब मुंबईस आले.डॉ. भाऊ दाजी लहानपणी बुद्धिमान होते. त्यांनी बुद्धिबळाच्या खेळात असामान्य प्रभुत्व मिळवले होते. डॉ. भाऊ दाजींना आपल्या गुरुजनांबद्दल फारच आदर होता. भाऊ दाजींनी मराठी शिक्षण पूर्ण करत नंतर इंग्रजी शाळेत प्रवेश घेतला.
इ.स. 1836 मध्ये त्यांनी इंग्रजी शाळेत प्रवेश मिळवून व स्कॉलर विद्यार्थी म्हणून लौकिकही मिळवला.इ.स. 1840 मध्ये ते शालांत परीक्षा पास झाले.
इ.स. 1840 ते 43 ही वर्षे त्यांनी एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये काढली तेव्हा त्यांना दरमहा 40 रु. शिष्यवृत्ती मिळे.
इ.स. 1843 ते 1845 मध्ये त्यांची एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूटने विज्ञानाचे शिक्षक म्हणून नेमणूक झाली. त्यांनी संस्कृतचाही अभ्यास केला. 2 वर्षे ते शिक्षक होते. मुंबईच्या जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता.
मुंबई सरकारने बालकन्या हत्याप्रथेसंबंधी एक निबंधस्पर्धा ठेवली होती. या निबंधलेखनासाठी 600 व 400 रु. ही दोन बक्षिसे ठेवली होती. डॉ. भाऊ दाजी यांनी लिहिलेल्या निबंधास पहिले बक्षीस मिळाले.
बालकन्यावधाची प्रथा ही हिंदू धर्मशास्त्राच्याविरुद्ध असून ती धर्म, भूतदया व माणुसकी वगैरेंना सोडून आहे हे युक्तिवाद त्यांनी त्या निबंधात मांडले.
डॉ. भाऊ दाजी यांनी 'स्त्री बालहत्या' हा ग्रंथ लिहिला होता व त्याचा खपही झाला होता.
X X
मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश व वैद्यकीय व्यवसाय
मुंबई शहरात 1845 मध्ये ग्रँट मेडिकल कॉलेज सुरू झाले. इ.स. 1835-38. या काळात सर रॉबर्ट ग्रँट हे मुंबई प्रांताचे गव्हर्नर होते. त्यांचेच नाव या कॉलेजला देण्यात आले होते.
एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूटमधील शिक्षकाची नोकरी सोडून भाऊ दाजी या कॉलेजमध्ये शिक्षणासाठी दाखल झाले होते. विद्यार्थी असतानाच त्यांना ग्रंथपालाची नोकरीही त्याच कॉलेजमध्ये मिळाली. नोकरी करत करत ते अभ्यास करत.
इ.स. 1851 मध्ये या कॉलेजची पहिली बॅच पदवी घेऊन बाहेर पडली तेव्हा जे 8 डॉक्टर झाले त्यात भाऊ दाजी हे एक होते.
8 नोव्हेंबर 1851 रोजी 'Grant College Medical Society' या संस्थेची स्थापना झाली. डॉ. भाऊ दाजी त्या संस्थेचे उपाध्यक्ष होते. इ.स. 1855 मध्ये ते या संस्थेचे अध्यक्ष झाले. इ.स. 1857 मध्ये त्यांनी अध्यक्षपद सोडले.
इ.स. 1855 पासून त्यांनी स्वतंत्र खासगी वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. अत्यंत कुशल शस्त्रक्रिया व अचूक औषधयोजना यामुळे त्यांची कीर्ती वाढत गेली.
डॉ. भाऊ हे मुख्यतः गरिबांचे सर्जन होते. ते डोळ्यांवरील मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया करत. कुष्ठ रोगावर त्यांनी औषध शोधून काढले होते. विविध वनस्पतींचे वैद्यकीय गुणधर्म ते प्रयोग करून तपासत असत.
इ.स.1852-57 या काळात पश्चिम भारतीयांच्या आहाराचे वैद्यकीय मूल्यमापन, मूतखड्याची शस्त्रक्रिया, अफूची विषबाधा, कलिंग इत्यादी विषयांवर भाऊंनी अभ्यासपूर्ण निबंध वाचले.
x x
बॉम्बे असोसिएशनमधील कार्य
'बॉम्बे असोसिएशन' ही संस्था 26 ऑगस्ट 1852 रोजी स्थापन झाली. भारतीयांच्या गरजांची चौकशी करून या देशाची सुधारणा करणे व भारतीय लोकांची कल्याणवृद्धी करण्यास विविध उपाय सरकारला सुचविणे हाही संस्था स्थापन करण्यामागचा हेतू होता. या संस्थेचे चिटणीस म्हणून डॉ. भाऊ दाजी यांनी काम केले. या संस्थेच्या वतीने ब्रिटिश पार्लमेंटला अर्ज करण्यात आला होता. त्यात विविध प्रकारच्या मागण्या केल्या होत्या. या अर्जात कंपनी सरकारच्या पक्षपाती, उधळ्या व अन्यायी कारभाराचे दोष दाखविले आहेत.
मागण्यांचे मराठी भाषांतर अ.का. प्रियोळकरलिखित 'डॉ. भाऊ दाजी : व्यक्ती, काल व कर्तृत्व' या ग्रंथात उपलब्ध आहे.
प्रस्तुत अर्जावर मुंबई शहर, ठाणे व पुणे येथील 3000 नागरिकांच्या सह्या घेतल्या होत्या. तसेच या अर्जाच्या शेकडो प्रती छापून त्या इंग्लंडमधील प्रमुख वृत्तपत्रांकडे पाठविल्या होत्या.
डॉ. लाड यांनीच आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा करून स्वतः दोन अर्ज लेखक या नात्याने तयार करून पाठविले होते. इंग्रजांनी हिंदुस्थानचे काही बाबतीत कल्याण केले आहे याची त्यांना जाणीव होती. ब्रिटिश राज्ययंत्रणेतील दोषही त्यांना माहीत होते.
इंग्रजांचे राज्य हिंदुस्थानात ‘यावच्चंद्रदिवाकरो' राहावे या मताचे ते कधीच नव्हते.
डॉ. भाऊ दाजी यांच्या राजकीय चळवळीमुळे इंग्रज अधिकारी त्यांच्यावर नाराज होते.
ब्रिटिश पार्लमेंटला त्यांनी केलेला अर्ज म्हणजे भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासातले पहिले पान होय, असे काही इतिहासकार म्हणतात.
भाऊ दाजी लाड यांचे चरित्रकार अ. का. प्रियोळकर म्हणतात, 'जनतेत स्वातंत्र्याची पल्लवीत करून तिचा राजकीय हक्कांसाठी जागृत करणारी आंदोलने करणाऱ्या मुंबईतील अनेक पुढाऱ्यांपैकी भाऊ एक महत्त्वाचे नेते होते.'
भाऊ कागदाच्या निर्मितीसाठी The Bombay Paper Manufacturing Company सुरू केली. तसेच त्यांनी सुताची गिरणीही सुरू केली होती.
X X
बोर्ड ऑफ एज्युकेशनचे सभासद म्हणून कार्य
इ.स. 1853 मध्ये Board of Education चे सदस्य म्हणून त्यांची निवड झाली. दोन वर्षे त्यांनी या पदावर काम केले. Board of Education च्या कामकाजात ते उत्साहाने भाग घेत. तसेच एल्फिन्स्टन फंडाचे विश्वस्त म्हणूनही त्यांनी काम पाहिले.
x x
नाट्यरसिक व ग्रंथप्रेमी
मुंबईतील नाट्यकलेला ऊर्जितावस्था डॉ. भाऊ दाजी यांच्यामुळेच प्राप्त झाली. त्यांच्यासारखे प्रतिष्ठित नेते नाटकास हजर राहू लागले, उत्तेजन देऊ लागले. विष्णुदास भावे जेव्हा मुंबईस आले तेव्हा भाऊ दाजींचा त्यांना मोठा आश्रय होता.
एल्फिन्स्टन कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी संस्कृत शाकुंतलचा प्रयोग सादर केला तेव्हा त्यासही त्यांनी प्रोत्साहन दिले. एकून नाट्यकलेला त्यांच्यामुळेच प्रतिष्ठा मिळाली.
डॉ. भाऊ दाजी हे स्वतः विद्याव्यासंगी व संशोधक असल्याने ग्रंथावरही त्यांचे प्रेम होते.
इ.स. 1845 मध्ये मुंबईत जी Native General Library स्थापना झाली तिचे ते बरीच वर्षे अध्यक्ष होते. डेव्हिड ससून लायब्ररीशीही त्यांचा संबंध होता. मुंबईमध्ये कोणतीही वाचनालयविषयक संस्था स्थापन करावयाची असेल तर भाऊ दाजी पुढाकार घेत. ते जुन्या ग्रंथांचे संग्राहक व संशोधक होते. मुंबईतील 19 व्या शतकातील मोठी व चांगली ग्रंथालये स्थापण्याच्या प्रयत्नात भाऊ दाजी अग्रणी होते.
x x
स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते
सर्व सुधारणांच्या मुळाशी स्त्री शिक्षण आहे. स्त्रियांमध्ये शिक्षणाचा प्रसार झाल्याशिवाय समाजसुधारणा होणार नाही अशी त्यांची समजूत होती.
Students Literary & Scientific Association या संस्थेच्या मुंबईतील लोहारचाळ येथील कन्या हायस्कूलला त्यांनी 16,500 रु. ची देणगी दिली होती. या शाळेला 'भाऊ दाजी गर्लस् स्कूल' असे नाव मिळाले.
Students Literary & Scientific Association या संस्थेने मुंबई शहरात 3 मराठी व 4 गुजराती शाळा सुरू केल्या होत्या. या शाळांपैकी काही शाळा चालल्या, काही चालल्या नाहीत; पण निराश न होता हे कार्य त्यांनी चालूच ठेवले. डॉ. भाऊ दाजी हे त्या संस्थेचे 10 वर्षे अध्यक्ष होते.
x x
विधवा विवाहाचे पुरस्कर्ते
डॉ. भाऊ दाजी हे विधवांच्या पुनर्विवाहाचे पुरस्कर्ते होते. पुनर्विवाहोत्तेजक मंडळींचे ते सभासद होते.
इ.स. 1869 मध्ये वेणूबाई या विधवेचा पांडुरंग विनायक करमरकर यांच्याशी होणाऱ्या पुनर्विवाहास ते स्वत: हजर होते.
दारू, अफू, गांजा वगैरे मादक पदार्थाच्या सेवनाविरुद्ध होते. इ.स. 1853 मध्ये त्यांनी ब्रिटिश पार्लमेंटला पत्र पाठवून त्या पदार्थांचे उत्पादन व सेवन यावर बंदी घालण्याची विनंती केली.
x x
मुंबई विद्यापीठ हवे या मागणीचे पुरस्कर्ते
डॉ. भाऊ दाजी हे बॉम्बे असोसिएशनचे सभासद असताना त्यांनी 28 नोव्हेंबर 1852 रोजी सरकारकडे मुंबई आणि पुण्यातील 3000 लोकांच्या सह्या घेऊन अर्ज करून मुंबईस विद्यापीठ असावे अशी भागणी केली होती.
या अर्जातील इतर मागण्या
१) पात्र व विश्वासार्ह नेटिवांना सरकारी नोकऱ्या द्याव्यात.
२) शिक्षणावरचा खर्च वाढवावा.
३) स्थानिक स्वराज्य संस्था निर्माण कराव्यात.
मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेपासून (इ.स. 1858) ते मृत्यूपर्यंत संस्थापक सदस्य होते. विद्यापीठाचे जे भारतीयांचे व्यवस्थापक मंडळ नेमले होते त्या 5 पैकी ते एक होते.
मुंबई विद्यापीठाच्या सिंडिकेटचे (Managing Director) ते पहिलेच हिंदी सभासद होत.
मुंबई विद्यापीठाच्या बी.ए. परीक्षेत संस्कृत विषय घेऊन पहिल्या वर्गामध्ये जो पहिला येतो त्या विद्यार्थ्याला 170 रुपयांची पुस्तके 'द भाऊ दाजी प्राईज' म्हणून दरवर्षी देण्यात येतात.
X X
पुराणेतिहास संशोधक
डॉ. भाऊ दाजींची कीर्ती पुराणेतिहास संशोधक म्हणून हिंदुस्थानात व परदेशांतही होती.
इ.स. 1842 मध्ये एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षक असताना काठेवाडातील बालहत्येविषयी निबंध लिहिण्यासाठी त्यांनी जे संस्कृत ग्रंथ अभ्यासले त्यातून त्यांची संशोधक वृत्ती जागी झाली.
Royal Asiatic Society चे इ.स. 1859-64 या काळात ते सदस्य होते. तर इ.स. 1873-74म ते या संस्थेचे उपाध्यक्ष होते. Royal Asiatic Society च्या मुंबई शाखेच्या जर्नलमध्ये त्यांनी 19 लेख लिहिले. ते प्रामुख्याने भारतातील शिलालेख, प्राचीन भारतीय संस्कृत साहित्य यासंबंधी आहेत.
पुराणेतिहासासंबंधीच्या संशोधनाचे त्यांचे कार्य हे पुढे त्यांचे शिष्य पं. भगवानलाल इंदानी यांनी चालविले. मॅक्समुल्लर, डॉ. रा.गो. भांडारकर यांनाही त्यांचे पुराणेतिहास संशोधन महत्त्वाचे वाटे.
रा. गो. भांडारकर म्हणतात, 'ज्यांना गेल्या 2000 वर्षापूर्वीच्या पुरातत्त्वांचे संशोधन करावयाचे असेल त्यांना भाऊ दाजींचे लेखन व संदर्भ तपासल्याशिवाय पर्याय नाही.'
अनेक ठिकाणी स्वत: जाऊन शिलालेख तपासणे, ताम्रपट पाहणे, विविध प्रकारचे ठसे घेणे, ते अभ्यासणे, प्राचीन इतिहासाचे वाचन हे त्यांचे विविधांगी व्यासंग होते.
भाऊंचे मुंबईतील चिरंतन स्मारक म्हणजे इ.स. 1872 मध्ये स्थापन झालेले भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालय. इ.स. 1872 मध्ये हे संग्रहालय उभे करण्यास 4.30 लाख खर्च आला होता. तेथे मोठा ग्रंथसंग्रह पण आहे. भाऊ दाजींनी जमवलेली चित्रे, नाणी, ताम्रपट, शस्त्रे, हस्तलिखिते त्यांनी या म्युझियमला भेट दिले.
x x
व्हिक्टोरिया गार्डन, राणीचा बाग व म्युझियमच्या उभारणीतील सहभाग
व्हिक्टोरिया गार्डन व सेंट्रल म्युझियमच्या स्थापनेत डॉ. भाऊ दाजी यांचा सहभाग होता. मुंबईतील माझगाव येथील माऊंट इस्टेटमधील जागा (सध्याच्या भायखळा) दिली गेली.
इ.स. 1862 मध्ये "व्हिक्टोरिया ॲण्ड आल्बर्ट म्युझियम"ची कोनशिला बसविण्यात आली होती.
म्युझियमच्या बांधकामासाठी लागणारा अर्धा पैसा लोकांकडून मिळवून देण्याचे प्रयत्न डॉ. भाऊ दाजी यांनी केले.
आधुनिक नाटकांना उत्तेजन सांगलीकरांची नाटके मुंबईकरांना पाहता यावीत म्हणून त्यांनी प्रयत्न केले. विष्णुदास भावे यांना त्यांनी मुंबईत बोलावून त्यांच्या नाटकाचे प्रयोग ठेवले.
आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत डॉ. भाऊ दाजींचे स्थान महत्त्वाचे होते. गिरण्यांची कल्पना व गरज त्यांनी प्रतिपादन केली होती. भारत जीर्ण अवस्थेतून मुक्त व्हावा व आधुनिक नवा भारत तयार व्हावा अशी त्यांची तळमळ होती.
मुंबई शहरात 19 व्या शतकाच्या अखेर आधुनिकत्व ज्या ज्या संस्थांमुळे प्राप्त झाले त्या संस्थांपैकी बहुतेक संस्था स्थापण्यात मुंबईच्या प्रतिष्ठित नागरिक नेतेमंडळीत भाऊ दाजी हे एक होते.
न्या. रानडे सार्वजनिक चळवळीकडे प्रवृत्त झाले त्याला प्रामुख्याने डॉ. भाऊ दाजी, दादाभाई नौरोजी वगैरे गृहस्थांची प्रत्यक्ष उदाहरणे कारणीभूत होती असे टिळकांनी 22 जानेवारी 1901 च्या 'केसरी'त लिहिले आहे.
x x
निधन
भाऊ दाजींना दीर्घायुष्य लाभले नाही. ते फक्त 50 वर्षे जगले. 31 मे 1874 रोजी डॉ. भाऊ दाजी यांचे निधन झाले. मृत्यूपूर्वी त्यांना अर्धांगवायू झाला होता. डॉ. भाऊ दाजी हे उदारमतवादी विचारांचे होते. समाजसुधारक, निष्णात डॉक्टर, गरिबांसाठी झटणारे समाजहितचिंतक, व्यासंगी संशोधक हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू आहेत.
डॉ. भगवानलाल इंद्रानी यांनी इ.स. 1870 मध्ये डॉ. भाऊ दाजींच्या सर्व उपलब्ध निबंधांचा संग्रह पुस्तकरूपाने " The Literary Remains of Dr. Bhau Daji" या नावाने प्रकाशित केला आहे.
मुंबईतील त्यांच्या प्रचंड समाजकार्याची साक्ष देत भायखळ्याच्या जिजामाता उद्यानात भाऊ दाजी वस्तुसंग्रहालय आजही आहे.
अ. का. प्रियोळकर 'डॉ. भाऊ दाजी लाड' या ग्रंथाचा शेवट करताना लिहितात, 'बुद्धिवैभव, विद्वत्ता, भूतदया, औदार्य, त्याग, धैर्य, समता, देशप्रेम, निष्कलंक आचरण वगैरे गुणांत हिंदी लोक इंग्रजांपेक्षा कमी नाहीत ही गोष्ट त्यांनी स्वतः उदाहरणाने ब्रिटिशांना पटवून दिली.'
भाऊ दाजी यांना इतिहास संशोधक व पुरातत्त्ववेत्ता (Archaeologist) म्हणून इतिहासात आगळे स्थान आहे.
मॅक्समूलरच्या मते, 'त्यांनी जे थोडे लिहिले ते हजारो पानांपेक्षा मूल्यवान आहे.'
आर. जी. भांडारकर यांच्या मते, 'ज्या व्यक्तीला गेल्या 200 वर्षांपूर्वीच्या पुराणकालीन वस्तूंचा इतिहास लिहावयाचा आहे त्याला भाऊ दाजींच्या लेखनाचा परामर्श घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही.'
View, comments and Share ...
x x
2 Comments
Nice
ReplyDelete👍
ReplyDelete