Nanda dynasty: Magadha was the first powerful and powerful empire of ancient India
नंद वंश : प्राचीन भारतीय पहिले प्रबळ व बलाढ्य साम्राज्य मगध
महापद्मानंद आणि धनानंद
( इ. स. पू. 423 ते 323)
नंद वंशाचा संस्थापक कोण याबद्दल इतिहासकारांत मतभेद आहेत.
काही इतिहासकारांनी 'उग्रसेन' हा नंद वंशाचा संस्थापक होय असे म्हटले आहे तर काहीनी 'महापद्मानंद' हा नंद वंशाचा संस्थापक आहे असे म्हटले आहे.
इतिहासकारांच्या मते उग्रसेन व महापद्यानंद ही दोन्ही नावे एकाच शासकाची असून उग्रसेन मगधच्या गादीवर आल्यानंतर महापद्यानंद या नावाने ओळखला जाऊ लागला.
नंद राजांचे वर्णव्यवस्थेतील स्थान कोणते याबद्दल इतिहासकारांत मतभेद आहेत.
जैन व बौद्ध साहित्यात नंद राजे कुलहीन होते असे म्हटले आहे. पुराणातही नंद वंशाचा संस्थापक कुलहीन होता असे म्हटले आहे.
परंतु मुद्राराक्षस व कौटिल्याच्या अर्थशास्त्रात नंद राजे क्षत्रिय आहेत असे म्हटले आहे.
X X
नंदांच्या इतिहासाची साधने :
1) पुराणग्रंथात नंदांची वंशावळ दिली आहे.
2) 'परिशिष्ट पर्व' या जैन ग्रंथात नंदाविषयी माहिती आढळते.
3) आवश्यक सूत्र, महावंशटिका, महाबोधी वंश, बौद्ध ग्रंथातून नंदांच्या इतिहासाचे धागेदोरे सापडतात. या ग्रंथात नंदांच्या 9 राजांची नावे आली आहेत.
4) 'कथासरित्सागर' या ग्रंथातही नंदांच्या इतिहासाची माहिती आली आहे.
5) कलिंगच्या खारवेलने कोरलेल्या हत्तीगुंफा शिलालेखातून व मैंसूर येथील काही शिलालेखातून नंदांच्या इतिहासाची अप्रत्यक्ष माहिती मिळते.
6) क्युरोटियस या ग्रीक इतिहासकाराच्या लिखाणातून नंद राजांचे संदर्भ आले आहेत.
X X
महापद्यानंद:
राजा कलाशोक याच्या पत्नीचे दरबारातील एका नाभिकाशी संबंध होते. या नाभिकापासून झालेला पुत्र म्हणजे महापद्मनंद होय.
आपल्या पुत्रास गादी मिळावी म्हणून राजा कलाशोकचा खून त्याच्या पत्नीनेच केला. अशा प्रकारे महापद्मनंद हा गादीवर आला.
पुराणग्रंथात महापद्मनंदाचा उल्लेख 'सर्वक्षत्रियांतक', "एक राट' अशा शब्दांत आला आहे.
महापद्मनंद हा कुलहीन असला तरी तो पराक्रमी व विस्तारवादी राजा होता. त्याने अनेक क्षत्रिय राजांचा पराभव केला. त्यामध्ये कुरु, पांचाल, कलिंग, अश्मक, मिथिला, शूरसेन आदी क्षत्रिय सम्राटांचा समावेश होतो.
क्षत्रियांचा पराभव करून क्षत्रियांची पारंपरिक राजकीय वर्चस्वाची परंपराच त्याने तोडली असे मत डॉ. आर. के. मुखर्जी यांनी मांडले आहे.
त्याने चतुरंग सेनेची उभारणी केली होती.
त्याच्या लष्करात दोन लक्ष पायदळ, 20,000 अश्वदल, 3003 गजदल व 2000 रथदल होते असे ग्रीक इतिहासकारांनी म्हटले आहे.
अर्थात, ही संख्या विश्वासार्ह वाटत नाही. तरीही प्रचंड लष्करी शक्ती त्याने उभी केली असावी म्हणूनच त्यास अनेक क्षत्रिय राजांचा पराभव करणे शक्य झाले.
महापद्मनंद हा एकूण 25 वर्षे सत्तेवर होता. पुराणग्रंथांमधून त्याच्या प्रचंड सामर्थ्याचे वर्णन आले आहे.
महापद्मनंदाचे राज्य दक्षिण भारतातही होते. दक्षिण भारतात गोदावरी नदीच्या काठावर त्याने आपली एक उपराजधानी वसवलेली होती.
डॉ. आर. के. मुखर्जीच्या मते, नवनंदडेरा या गावाची नंदाची एक उपराजधानी गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या नांदेड परिसरातच होती.
'नवनंदडेरा' या नावावरूनच 'नांदेड' हे नाव आले असावे 'स्वनंदडेरा' नावातच 'नंद' हा शब्द असल्याने या शहराची स्थापना करून त्यास उपराजधानीचा दर्जा 'नंद' राजांनी दिला असावा, असा इतिहासकारांचा अंदाज आहे.
शिलालेख व ताम्रपटांतून मात्र नांदेडचा अशा स्वरूपाचा उल्लेख अद्याप आढळून आला नाही.
'अश्वकसूत्रात' तसेच 'महाबोधी वंश' या बौद्ध ग्रंथात नंदांच्या ९ राजांचा उल्लेख आला आहे.
1) उग्रसेन, 2) पांडुक, 3) पांडुगती 4) भूतपाल, 5) राष्ट्रपाल, 6) गोवीशौणक, 7) दशसिद्ध, 8) कैवर्त, 9) धनानंद
यापैकी उग्रसेन (महापद्मनंद) व धनानंद या दोघांचा अपवाद वगळता इतर नंद राजांची माहिती मिळत नाही.
हे नऊ राजे एकमेकांचे भाऊ होते का? एकाच वेळी नंदांच्या साम्राज्यात विविध भागांत ते राज्य करीत होते का? हे नऊ राजे एकमेकांचे वंशज होते का? त्यांच्यातील नाते पिता-पुत्राचे होते का? आदी प्रश्नांची उत्तरे देता येत नाहीत. कारण त्याबाबतची निर्विवाद उत्तरे अद्याप उपलब्ध नाहीत.
X X
धनानंद:
धनानंद हा नंद वंशातील शेवटचा राजा होय. नंद राजा धनानंद हा महत्त्वाकांक्षी, परंतु जुलमी राजा होता. तो पैशाचा अत्यंत लोभी होता म्हणूनच 'धनानंद' हे नाव त्याला पडले.
त्याने प्रजेवर प्रचंड कर बसविला होता. अमाप संपती जमा करून गंगा नदीच्या खडकात गुहा खोदून सोन्याच्या नऊ राशी त्याने दडवून ठेवल्या अशी त्यांच्याबद्दल आख्यायिका होती.
फक्त धनानंदच नव्हे तर सर्वच नंद राजे संपत्तीचे लोभी असल्याने जनता नंद राजवटीवर असंतुष्ट होती.
ह्यु-एन-संगच्या प्रवासवर्णनातही धनानंदने दक्षिण भारतातील आपल्या उपराजधानीच्या जवळून वाहणाऱ्या गोदावरीच्या पात्रात धन साठवून ठेवल्याच्या आख्यायिकेची नोंद आहे.
पाटलीपुत्रातील 5 प्रमुख स्तुपांतूनही त्याने धनसंचय केला असावा अशीही आख्यायिका ह्यु-एन-स्संग नोंदवितो.
धनानंदाचा वध त्याचा एक दासीपुत्र चंद्रगुप्त मौर्य याने करून मगधची गादी बळकावली.
नंद वंशाचा अस्त झाला, पण नंदांचे महत्व नाकारता येत नाही.
बिंबीसारच्या कार्यकर्तृत्वातून उदयास आलेले मगधचे साम्राज्य हे पुन्हा एकदा उत्तर भारतात प्रसिद्धीस आले.
मगधच्या साम्राज्याला पूर्णत्व प्राप्त करून देण्याचे कार्य नंदांनीच केले, नंदांनी मगध साम्राज्याच्या रूपाने फार मोठा वारसा आपल्या मागे ठेवला होता.
समेचा केंद्रबिंद नंदांच्या काळात मगध परिसरात स्थिरावला व तेथेच तो 600-700 कायम राहिला.
प्राचीन भारतातील सर्व वैभवशाली साम्राज्ये मगधच्याच परिसरात उदयास आली.
मगधंचा परिसर हा अनेक अर्थानी महत्त्वाचा ठरतो, वैदिक धर्म व परंपरा नाकारणारे जैन व बौद्ध धर्म हे याच परिसरातले.
नंद-मौर्य यांच्या रूपाने शूद्रांने राज्य निर्माण करणारे, गणराज्याची भरभराट पाहणारे राजे याच परिसरातले होते,
प्राचीन भारतातील पहिले प्रबळ साम्राज्य नंदांनीच निर्माण केले.
दक्षिणेत नांदेडपर्यंत त्यांनी सत्ता होती. पाटलीपुत्र व राजगृह या दोन शहरांना नंदांनी वैभव प्राप्त करून दिले.
नंदांनी जे साम्राज्य निर्माण केले होते त्यांच्याच आधारावर मौर्याना आपल्या साम्राज्याची इमारत उभी करणे शक्य झाले.
Comment and share


2 Comments
Very nice information
ReplyDeleteEfficient information
Delete