Subscribe Us

header ads

Madhav Julian: Marathi Poet

Madhav Julian: Marathi Poet

माधव जूलियन ऊर्फ डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन : मराठी भाषेतील कवी, रविकिरण मंडळाचे संस्थापक

जन्मदिन: 21 जानेवारी

स्मृतिदिन: 29 नोव्हेंबर



बालपण आणि शिक्षण:

 कवी माधव जूलियन ऊर्फ माधव त्र्यंबक पटवर्ध यांचा जन्म त्यांचे थोरले मामा महादेव विश्वनाथ सहस्रबुद्धे यांच्या घरी 21 जानेवारी 1894 गुजरात राज्यातील बडोद्याला झाला. 

वडीलांचे नाव त्रिंबक विनायक पटवर्धन आणि आईचे नाव उमा त्रिंबक पटवर्धन हे होते. सुरुवातीची बालपणातील आठ-नऊ वर्षे ही गुजरातमधील बडोदा, भडोच आणि पुणे जिल्ह्यातील मुळशी पेट्यातील आवळस येथे गेली. 

1904 साली ते आवळसहून परत बडोद्याला आले. तेथेच त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले व पुढे महाविद्यालयीन काही वर्षे शिक्षण झाले. 

बडोद्यातील त्यांचे वास्तव्य त्यांच्या व्यक्तिगत व वाङ्मयीन जीवनाच्या घडणीत विशेष महत्त्वाचे आहे.

1916 साली ते फारसी विषय घेऊन बी. ए. झाले व 1918 साली फारसी-इंग्रजी घेऊन ते एम. ए. झाले, आणि पुण्याला डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्गसन महाविद्यालयात फारसी व इंग्रजी या विषयांचे प्राध्यापक झाले.

X X

जूलियन ॲडाले पासून माधव जूलियन:

कवी माधव जूलियन यांच्या सुधारकी विचारांमुळे ते मामांच्या घरातून बाहेर पडून स्वतंत्रपणे स्वतःच्या कर्तुत्वावर राहू लागले. याच काळात त्यांच्यासभोवती रा. वि. मराठे, विठ्ठलराव घाटे, शांता हेलेकर प्रभृतींचे काव्यप्रेमी मित्रमंडळ असत.

 राजकवी चंद्रशेखर यांच्याशीही त्यांचा निकटचा संबंध आला आणि त्यांच्या 'माधव' नावाला 'जूलियन' या नावाची जोड मिळून ते 'माधव जूलियन' झाले. मारी कोरलीच्या 'God's Good Man' या कादंबरीत 'जूलियन ॲडाले' हे एक पात्र आहे. तो स्वच्छंदी, बड्या दांभिकांचे दंभ उघड करणारा, रोमॅन्टिक कवी आहे. 

माधवरावांची मैत्रीण शांता हेर्लेकर यांनी माधवरावांना सांगितले की, "तुम्ही त्या जूलियन ॲडालेसारखे आहात." 

आपल्या 'माधव' नावाला जोडून ते 'माधव जूलियन' त्यातील 'जूलियन' हे नाव झाले. त्याच टोपणनावाने ते कविता लिहू लागले. 

X X

रविकिरण मंडळाची स्थापना:

 फर्गसन महाविद्यालयात त्यांचा सर्व तऱ्हेच्या नवतेचा उत्साहाने पुरस्कार करणाऱ्या श्री. बा. रानडे यांच्याशी स्नेह जमला. 

यातूनच आधुनिकतेचा जीवनात व साहित्यात हिरिरीने पुरस्कार करणाऱ्या रविकिरण मंडळाची स्थापना 9 सप्टेंबर 1923 रोजी झाली. 

 मित्रांच्या सहवासात माधवरावांचे या वातावरणात कवित्व बहरले. त्यांना प्रतिष्ठा मिळत गेली.

 त्यांनी रवि किरण मंडळ माध्यमातून मराठी कवितेला प्रोत्साहन दिले. त्यांच्या आई कवितेला रसिकांनी खूप मोठा प्रतिसाद दिला. 

छंदोरचना हा त्यांचा पीएच. डी. चा प्रबंध जर्मनी मधील विद्यापीठात त्यांनी सादर केला. असे ते केवळ एक आणि आजपर्यंत दुसऱ्या कोणीही असे करू शकले नाही असे मराठी कवी होते.

 X X

जीवन प्रवास:

अशा चढतीच्या काळातच त्यांच्यावर मोठा आघात झाला. डेक्कन एज्युकेशन सोसायटीतील काही विरोधकांच्या कटकारस्थानांनी माधवरावांना प्रथम दोन वर्षे निर्वेतन रजेवर जावे लागले आणि नंतर सोसायटीचा राजीनामा 1925 मध्ये हि द्यावा लागला.

 या 1924 ते 1926 दोन वर्षांत माधवरावांनी अंमळनेरच्या प्रताप हायस्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी केली .

 तेथून 1926 ते 1928 या दोन वर्षांत त्यांनी पुण्याच्या भावे स्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी केली. त्यानंतर 1928 सालापासून 1939 अखेरपर्यंत त्यांनी कोल्हापूरला राजाराम कॉलेजात फारसी व इंग्रजी विषयांचे प्राध्यापक म्हणून काम केले. 

राजाराम कॉलेजात रुजू होण्यापूर्वी त्यांनी 29 मे 1928 रोजी गंगूताई गरुड यांच्याशी लग्न केले .विवाहानंतर त्या लीलाबाई पटवर्धन झाल्या. लौकिकार्थाने त्यांच्या जीवनास लग्नानंतर स्थैर्य आले.

संसारात स्थिर झालेले, कुटुंबवत्सल माधवराव 'मधुलहरी आणि इतर कविता' या संग्रहातील अनेक कवितांतून दिसतात.

X X

साहित्यनिर्मितीतील वेगळी ओळख:

मराठी साहित्य-संस्कृतीच्या क्षेत्रात माधवरावांनी मोलाचे वाङ्मयीन कार्य केले असले, तरी त्यांची पहिली, मुख्य ओळख कवी माधव जूलियन म्हणूनच आहे.

 काव्यक्षेत्रात माधवरावांचे कार्य चतुर्विध आहे. त्यांनी प्रत्यक्ष स्फुट, दीर्घ काव्यरचना केली. 

उमरखय्यामच्या रुबायांचे तीन वेळा, तीन प्रकारांनी भाषांतर केले. काव्यविचार केला, काव्यसमीक्षा केली आणि पचरचनाशास्त्रावर 'छंदोरचना' हा बृहत् ग्रंथ निर्माण केला. 

फारसीतील गजल हा पद्मप्रकार त्यांनी मराठीत आणला. अनेक फारसी वृत्ते मराठीत आणली पुढील कवींना अभिव्यक्तीसाठी अनेक पद्यरचनाबंध उपलब्ध करून दिले. 

माधवरावांनी फारसी गज्जलांची वृत्ते वापरली पण फारसी गजलांतील अनेक शेरांची साखळी असे त्यांचे स्वरूप न ठेवता त्या स्वतंत्र स्वयंपूर्ण मराठी भावकविता केल्या.

"स्वप्नरंजन" हा त्यांच्या भावकवितांचा महत्त्वाचा संग्रह त्याच्या प्रस्तावनेत माधव जूलियनांनी लिहिले आहे की, 'आत्मरचनेसाठी आरंभ केला, तरी काव्याची समाप्ती ही रसिकरंजनासाठीच असते.' या कवितांतून माधव जूलियनांच्या भावजीवनाची सलग प्रतीती येते. 

यातल्या बहुतेक कविता ह्या आत्मभावजीवनाचा आविष्कार करणाऱ्या आहेत. त्यांची ध्येयवादी तत्त्वनिष्ट भाववृत्ती आणि व्यावहारिक जीवनात होणारी तिची ओढाताण यांचा आविष्कार यांतील अनेक कवितांतून होतो. या संग्रहात काही नाट्यगीतेही आहेत. 

 'विरहतरंग' हे हळवे, तरल प्रेमकाव्य आहे. प्रभाकर हा काव्यात्मक वृत्तीचा महाविद्यालयीन तरुण, आणि इंदू ही विधवा महाविद्यालयीन तरुणी यांच्या काहीशा गूढतरल प्रेमसंबंधांची कहाणी यात आहे.

 'नकुलालङ्कार' मध्ये (44 खंड) नकुल हि खटपटी लटपटी व्यक्ती अखेरीस एका विद्यापीठाची कुलगुरू कशी होते. याची अलंकारिक भाषेत सांगितलली चित्रकहाणी आहे. 

मोरोपंती थाटाचे हे दीर्घकथाकाव्य असल्याने त्यातील भेदक उपरोध हा दुर्लक्षित राहिला आहे. 

साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रांतील अनाचारांचे परखड दर्शन यात घडविलेले आहे.

X X

भाषाशुद्धीची चळवळ:

मराठी साहित्य व भाषा यांच्या सर्वांगीण उन्नतीकडे माधवरावांचे लक्ष होते. 

मराठी भाषेवरील हिंदी व इंग्रजी भाषांच्या आक्रमणाविरुद्ध त्यांनी भाषाशुद्धीची चळवळ केली. 

भाषाशुद्धीच्या चळवळीमागील माधवरावांची भूमिका सांस्कृतिक होती.

 भाषाशुद्धीवरील त्यांचे लेख, भाषणे यांचा संग्रह त्यांनी 'भाषाशुद्धिविवेक' (1938) या नावाने काढला होता. 'भाषाशुद्धी' या शब्दप्रयोगामुळे काही चुकीचा समज होण्याचा संभव असतो. म्हणून त्यांनी एका लेखात 'Purism' या शब्दाऐवजी 'Swadeshism' हा शब्द वापरला आहे. 

भाषाशुद्धीची चळवळ ही 'स्वत्वसंरक्षणाची आणि स्वत्वसंवर्धनाची' आहे.

 भाषाशुद्धीबरोबरच लेखनशुद्धीवरही त्यांनी काही लेख लिहून 'मराठी 'लिपी' मध्ये काही सुधारणा सुचवल्या.

X X

'प्रणयपंढरीचा वारकरी' कवी माधव जूलियन:

मराठी रसिकांना जाणकारांना माधवराव पटवर्धनांची मुख्य ओळख 'कवी' म्हणून आहे. त्यातही 'प्रणयपंढरीचा वारकरी' म्हणून आहे. 

वासनाविरहित, निरपेक्ष, उत्कट प्रेमाची ओळख त्यांनी मराठी मनाला करून दिली. त्यांनी फारसी वृत्तांमध्ये पद्यरचना करून मराठी कवींना त्या वृत्तांची माहिती करून दिली, आणि काव्यरचनेसाठी अनेक नवे पद्यबंध उपलब्ध करून दिले.

 त्यांनी मराठी छंदोविचारांचा भरभक्कम पाया घालून दिला. ना. ग. जोशी यांनी याच दिशेने मराठी छंदोविचार पुढे नेला.

 माधवरावांना 'पंडित कवी' असे संबोधण्याची एक प्रथा आहे. पण, त्यांच्या एकंदर लेखनात कवित्व आणि पांडित्य एकमेकांवर मात करीत नाहीत. या दोन्ही प्रवृत्ती परस्परपूरक व पोषक होतात.

 मराठी भाषेचा व इतिहासाचा प्रखर अभिमान त्यांनी जागवला. (मराठी) भाषेचा विचार व वापर गंभीरपणाने, जागरूकपणाने करावयाला हवा याची तीव्र जाणीव त्यांनी मराठी माणसांमध्ये निर्माण केली.

X X

मराठी साहित्यातील पहिले डी. लिट.:

काव्याचे बहिरंग पद्यरचना व त्याचे समग्र आलोकन करून त्यांनी 'छंदोरचना' (1927, आमूलाग्र नवसंशोधित द्वितीयावृत्ती. 1937) हा बृहत्ग्रंथ पुर्ण करुन सिद्ध केला. 

या ग्रंथासाठी त्यांनी मुंबई विद्यापीठाची डी. लिट. ही सर्वोच्च पदवी फेब्रुवारी 1939 मध्ये संपादन केली. माधवराव हे मराठी साहित्यातील पहिले डी. लिट. आहेत.

X X

ग्रंथसंपदा/साहित्य निर्मिती:

1. स्फुट काव्याचे संग्रहः 

1. 'गज्जलांजलि' (1933, 108 गज्जल)

2. 'स्वप्नरंजन' (1934, 113 स्फुट भावकविता)

3. 'मधुलहरी व इतर कविता' (प्रकाशन माधवरावांच्या निधनोत्तर-11940, 26 स्फुट भावकविता)

2. 'तुटलेले दुवे' हा सुनीतसंग्रह अथवा सुनीतमाला (1938, 101 सुनीते).

3." गज्जलांजलि" मध्ये सामान्यतः फारसी वृत्तांमधील राज्जलांचा संग्रह आहे. 'प्रस्तुत पद्यसंग्रह हा एक हौसेचा प्रयोग आहे.' यातील बहुसंख्य गजाला या प्रेमविषयक आहेत.

4. 'स्वप्नरंजन' हा त्यांच्या भावकवितांचा दुसरा, महत्त्वाचा संग्रह. 

5. 'तुटलेले दुवें' हा माधवरावांनी वेळोवेळी लिहिलेल्या 101 सुनीतांचा संग्रह .(एक अखंड सुनीतमालिका)

6. 'उमरखय्यामकृत रुबाया' मध्ये मूळ पर्शियन रुबायांचे यथामूल भाषांतर केले.

7. "द्राक्षकन्या" हे भाषांतर

8. 'मधुलहरी' हे फिज्जेरल्डच्या रुबायांच्या भाषांतराच्या चौथ्या आवृत्तीचे भाषांतर.

9. तीन दीर्घ कथाकाव्ये.

1. 'विरहतरंग' (1926) 

2. 'सुधारक' (1928), 

3. 'नकुलालङ्कार' (44 खंड) (1939) 

4. "प्रभाकर" काव्यात्मक प्रकार(33 तरंग, 232 श्लोक).

5. 'सुधारक' एक सामाजिक दीर्घकाव्य

10. काव्यविचार व काव्यसमीक्षा:

1. 'काव्यविहार' (1947)

2. 'काव्यचिकित्सा' (1964)

11. 'छंदोरचना' (1927, आमूलाग्र नवसंशोधित द्वितीयावृत्ती. 1937) हा बृहत्ग्रंथ.

12. 'फारसी-मराठी कोश' सिद्ध केला (1925)

13. 'भाषाशुद्धिविवेक' (1938)

X X

14. प्रसिद्ध कविता:

1. कशासाठी पोटासाठी

2. जीव तुला लोभला माझ्यावरी

3. प्रेम कोणीही करीना

4. प्रेमस्वरूप आई

5. मराठी असे आमुची मायबोली

X X

पुरस्कार व सन्मान:

1. 1933 मध्ये नाशिक येथे झालेल्या कविसंमेलनाचे अध्यक्ष.

2. 1934 मध्ये बडोदे येथे झालेल्या साहित्यसंमेलनात ते कविशाखेचे अध्यक्ष होते.

3. 1936 साली जळगावला भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष. 

4. फेब्रुवारी 1939 मध्ये त्यांना 'छंदोरचना' या बृहत् ग्रंथासाठी मुंबई विद्यापीठाची सर्वोच्च अशी डी. लिट. पदवी.

5. पुण्यातल्या टिळकरोडवरील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहाला ’माधवराव पटवर्धन सभागृह’ असे नाव देण्यात आले आहे.

X X

निधन:

कवी माधव जूलियन यांना चढतेवाढते यश मिळत असतानाच पुण्यात बांधलेल्या आपल्या 'निवान्त' या बंगल्यात, अवघ्या शेहेचाळिसाव्या वर्षी 29 नोव्हेंबर 1939 या दिवशी त्यांचे निधन झाले.

X X

कविता:


             प्रेमस्वरूप आई

प्रेमस्वरूप आई! वात्सल्यसिंधु आई! बोलावुं तूज आता मी कोणत्या उपायीं?

नाहीं जगांत झाली आबाळ या जिवाची, तूझी उणीव चित्तीं आई, तरीहि जाची. चित्तीं तुझी स्मरेना कांहींच रूपरेखा, आई हवी म्हणूनी सोडी न जीव हेका.

ही भूक पोरक्याची होई न शांत आई, पाहूनियां दुज्यांचें वात्सल्य लोचनांहीं. वाटे इथूनि जावें, तूझ्यापुढें निजावें, नेत्रीं तुझ्या हसावें, चित्तीं तुझ्या ठसावें!

वक्षीं तुझ्या परि हें केव्हां स्थिरेल डोकें, देईल शांतवाया हृत्स्पंद मंद झोके? घे जन्म तूं फिरूनी, येईन मीहि पोटीं, खोटी ठरो न देवा, ही एक आस मोठी!








X X

View, Comments and share...... 

Post a Comment

2 Comments