लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती
26 जून: जयंती
6 मे: स्मृतीदिन
आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण करण्यात म. फुले, राजर्षी शाहू, भाऊराव पाटील, महर्षी कर्वे, वि.रा. शिंदे, डॉ. आंबेडकर यांचा सिंहाचा वाटा आहे.
वि. रा. शिंदे यांनी राजर्षी शाहूंबद्दल म्हटले होते,
“शाहूराजा नुसता मराठा नव्हता, ब्राह्मणेतरही नव्हता. तो नवयुगातला सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष होता .... तो महाराष्ट्राच्या विकासाचा एक मोठा स्वाभाविक तरंग होता हेच जास्त खरे.”"
कानपूर येथील अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय जातीय परिषदेत 1919 मध्ये शाहू महाराजांना 'राजर्षी' ही पदवी दिली होती.
राजर्षी शाहूंचे मूळ नाव यशवंत. जन्म इ.स. 1874 मध्ये कागलचे जहागीरदार व कोल्हापूर संस्थानचे रिजंट आबासाहेब घाटगे यांच्या पोटी झाला.
कोल्हापूर संस्थानचे राजे चौथे शिवाजी यांच्या मृत्यूनंतर कोल्हापूरच्या गादीवर कोणी वारस नव्हता. म्हणून राजर्षी शाहूंना कोल्हापूरच्या संस्थानिकाच्या विधवा पत्नी महाराणी आनंदीबाईला दत्तक दिले. 1884 मध्ये दत्तक विधी झाला.
त्यानंतर राजकोट व धारवाड येथे त्यांचे शिक्षण झाले. फ्रेजर या इंग्रजी शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे शिक्षण झाले.
शाहू हे शरीराने धिप्पाड होते. त्यांची उंची 5 फूट 11 इंच होती. 1881 मध्ये ते 17 वर्षांचे असताना बडोद्याचे गुणाजीराव खानविलकर यांची मुलगी लक्ष्मी हिच्याशी त्यांचा विवाह झाला तेव्हा लक्ष्मीचे वय केवळ 11 वर्षांचे होते.
2 एप्रिल 1894 रोजी त्यांचा राज्याभिषेक विधी झाला. तेव्हापासून मृत्यूपर्यंत (6 मे 1922) एकूण 28 वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे ते राजे होते. पूर्वी 19 एप्रिल ते 6 जून 1894 पर्यंत पन्हाळ्यावरच त्यांचा मुक्काम होता. या मुक्कामात त्यांनी 300 जुन्या प्रकरणांचा निकाल देऊन टाकला.
प्रारंभीच्या 2 वर्षांत अनेक लोककल्याणकारी निर्णय त्यांनी घेतले. त्यांनी प्रारंभीच्या 2 वर्षांत पुढील योजना अमलात आणल्या.
1) वेठबिगारी पद्धत बंद केली.
2) कोल्हापूर रेल्वे स्टेशनजवळ 'शाहुपुरी' ही नवी वसाहत वसविली.
3) गुळाची नवीन बाजारपेठ सुरू केली.
4) राजाराम कॉलेजमध्ये पदवीपर्यंत पूर्ण शिक्षण मिळण्याची व्यवस्था केली.
5) डोंगराळ व आदिवासी भागातील लोकांना राज्याच्या सेवेत घेतले. १ राज्यातील उद्योगांची विस्तृत पाहणी करण्यात आली.
6) मुभा दिली.
7) राज्याच्या मालकीच्या कुरणांत गोरगरिबांच्या जनावरास चरण्यास
8) जनावरांसाठी दवाखाने सुरू केले.
9) राज्याच्या बांधकाम खात्यातील भ्रष्टाचार बंद केला.
10) भास्करराव जाधव या ब्राह्मणेतर तरुणाची असिस्टंट सरसुभे या पदावर नियुक्ती केली. दाजीराव अमृतराव विचारे यांची शेणॉय यांच्या जागेवर बांधकाम विभागाच्या प्रमुखपदी नेमणूक केली.
न्याय, महसूल व पोलिस या खात्यांत ब्राह्मण नोकरवर्गाचे वर्चस्व होते; शाहू यांच्या प्रयत्नाने हळूहळू कमी झाले.
X X
वेदोक्त प्रकरण :-
वेदोक्त प्रकरण हे राजर्षी शाहूंच्या जीवनात तसेच आधुनिक महाराष्ट्राच्या सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळीत महत्त्वाचे आहे. या प्रकरणामुळे पुरोहितशाहीची समाजावरील पकड ढिली झाली.
न.र. फाटक म्हणतात, “या प्रकरणामुळे सत्यशोधक चळवळ जिवंत ठेवली. वेदोक्ताच्या वादात विविध मतप्रवाह होते. लेले शास्त्री, लोकमान्य टिळक, कृष्णानंद सरस्वती, भारताचार्य वैद्य, दिवेकरशास्त्री, घुलेशास्त्री यांच्या वेदोक्ताबाबत भूमिका भिन्न होत्या. तसेच सयाजीराव गायकवाड, राजर्षी शाहू त्यांचे पाठीराखे सत्यशोधक यांच्याही वेदोक्ताबाबतच्या दृष्टिकोनात फरक होता. वेदोक्त प्रकरणी टिळकांनी शाहूला विरोध केल्यामुळे या वादास राजकीय रंग प्राप्त झाला.
इंग्रज अधिकाऱ्यांनी याप्रकरणी हस्तक्षेप करून शाहूंना अनुकूल निर्णय दिले. या प्रकरणामुळे महाराष्ट्राचे समाजकारण व अर्थकारण पुढे अनेक वर्षे गढूळ झाले. वेदोक्ताचा वाद यापूर्वीही निर्माण झाला होता.
छत्रपती शिवाजी महाराज, सातारचे राजे प्रतापसिंह यांच्या राजवटी (1835) व बडोद्यात 1896 मध्ये वेदोक्ताचा वाद निर्माण झाला होता.
वेदोक्त प्रकरणाचे मूळ हिंदूंच्या वर्णव्यवस्थेवर आधारित असणाऱ्या समाजरचनेत शोधावे लागते. आर्य श्रेष्ठ व अनार्य कनिष्ठ आहेत. वेदपठणाचा अधिकार फक्त आर्यांनाच आहे अशी एक समजूत होती.
वेद हे हिंदूंचे सर्वश्रेष्ठ धर्मग्रंथ ते मानवनिर्मित नाहीत ते अपौरुषेय आहेत. या वेदातील मंत्राप्रमाणे जे धार्मिक संस्कार केले जातात त्यांना वेदोक्त म्हणतात. आर्यांच्या ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य या ३ वर्णीयांना वेदोक्ताचा अधिकार होता. अनार्य म्हणजे शूद्र हे मात्र पुराणोक्त पद्धतीने आपले धार्मिक विधी करू शकत असत.
ऑक्टोबर 1899 मध्ये राजा शाहू, त्यांचे बंधू बापूसाहेब घाडगे, मामासाहेब खानविलकर, रामशास्त्री भागवत व इतर मंडळी पंचगंगेवर स्नानासाठी गेली असता नारायण भटजी या शाहूंच्या पुरोहिताने पुराणोक्त मंत्र म्हटले. येथूनच वेदोक्त प्रकरण उद्भवले.
शाहू महाराज स्नान करताना मंत्र म्हणणारा नारायण भटजी पुराणोक्त मंत्र म्हणत आहे याकडे राजारामशास्त्रो भागवत यांचे लक्ष वेधले. शाहूंनी त्यासंदर्भात विचारणा करताच नारायण भटजी म्हणाला, “आपण शूद्र आहात व शूद्रांनीच पुराणोक्त मंत्र म्हणावयाचे असतात.” पण “आपण शूद्र नाहीत तर क्षत्रिय आहोत." असे शाहूंनी म्हटले. पण त्यांचा आश्रित नारायण भटजीने “ब्राह्मण वर्ग जोपर्यंत तुम्हास क्षत्रिय म्हणून मान्यता देत नाही तोपर्यंत तुम्ही शूद्रच आहात" अशी भूमिका घेतली. पण आपण क्षत्रिय असल्यामुळे आपल्या घरातील धार्मिक विधी व संस्कार पुराणोक्त मंत्राऐवजी वेदोक्त मंत्रांनी व्हावेत असा आग्रह शाहूंनी धरला.
छत्रपती घराण्याचे धार्मिक विधी करण्यासाठी अप्पासाहेब राजोपाध्ये यांना वार्षिक सुमारे 30,000 रु. इनाम मिळाला होता. अप्पासाहेब राजोपाध्ये हे छत्रपतींच्या पंचगंगेवरील कार्तिक स्नानाच्या वेळी हजर होते. नोव्हेंबर 1901 मध्ये राजघराण्यातील धार्मिक विधी वेदोक्त पद्धतीने करण्याबद्दल शाहूंनी त्यांना फर्मान सोडले. पण राजोपाध्ये यांनी त्यास नकार दिला. त्यांचा नारायण भटजीच्या मतास पाठिंबा होता. त्यामुळे शाहूंनी 1 मे 1902 रोजी त्यांना इनाम का जप्त करू नये? अशी विचारणा केली. शाहू छत्रपती असले तरी राजोपाध्ये हे शाहूंच्या घरातील विधी पुराणोक्त पद्धतीनेच करत होते. आता झाली चूक सुधारण्याची संधी शाहूंनी राजोपाध्ये यांना दिली होती; पण तेच शाहूंची टिंगल उडवू लागले. शाहू छत्रपतींचे क्षत्रियत्व त्यांना मान्य नव्हते. राजोपाध्ये यांना टिळकांचेही आशीर्वाद होते.
वेदोक्ताचा तंटा विकोपाला जात आहे हे पाहून दोन्हीही पक्ष आपापल्या बाजूने ऐतिहासिक पुरावे, दस्तऐवज, प्रतिष्ठित व्यक्तींचा पाठिंबा मिळवून आपला पक्ष बळकट करण्याचा प्रयत्न करू लागले. राजोपाध्ये यांना टिळक, चिपळूणकर, नं.चिं. केळकर, महादेव बोडस, बाळासाहेब नातू, दादासाहेब करंदीकर व महाराष्ट्रातील सनातनी ब्राह्मण समाज यांचा पठिंबा होता.
वेदोक्त प्रकरणी टिळकांनी 22 व 29 ऑक्टोबर 1901 ला 'केसरी'त लिहून खालील युक्तिवाद केले होते.
1) वेदोक्त मागणीचा विचार करताना पूर्वपरंपरा, इतिहास, पूर्वीचे झालेले निर्णय लक्षात घ्यावेत.
2) वेदोक्त मंत्रांनी संस्कार झाले म्हणजे मराठे व ब्राह्मण हे जातीने एक होतील ही समजूत चुकीची आहे. वेदोक्त मंत्र म्हटले तरी मराठे मराठेच राहतील.
3)मराठ्यांनी आपले क्षात्रतेज व्यक्त करण्याचा मार्ग वेदोक्त मंत्रांनी श्रावणीय करणे हा नव्हे.
4) वेदपठण व वेदोक्त संस्कार यात फरक आहे.
5) भोसले घराणे व घाटगे, खानविलकर, मोहिते वगैरे घराणी यामध्येही फरक असल्याने भोसले घराण्याचा हक्क मान्यच करावा असे होत नाही. राजर्षी शाहूंच्या वेदोक्ताच्या मागणीमुळे महाराष्ट्रात ब्राह्मण-मराठा वाद माजेल व कदाचित दंगेही होतील.
6)टिळक यांनी प्रस्तुत लेख आपल्या सहकाऱ्यांपैकी कोणी तरी लिहिला असे म्हटले होते. धनंजय कीर लिहितात, "टिळकांच्या वेदोक्तावरील संकुचित, अनुदार मते प्रतिपादन करणाऱ्या 'केसरी'तील अग्रलेखामुळे ब्राह्मणेतरांत मोठा असंतोष निर्माण झाला. त्यामुळे महाराष्ट्राचे राजकीय व सामाजिक वातावरण अनेक वर्षे दूषित राहिले. टिळकांनी वेदोक्त प्रकरणी चुकीचा पवित्रा घेऊन महाराष्ट्र ब्राह्मण-ब्राह्मणेतर अशा दोन गटांत विभागून टाकला.
2 जून 1902 रोजी राजर्षी शाहू सातव्या एडवर्डच्या राज्यारोहण समारंभासाठी इंग्लंडला गेले. त्यांच्या साडेतीन महिन्यांच्या इंग्लंडच्या वास्तव्यात कोल्हापुरातील त्यांच्या विरोधकांच्या हालचालींची कल्पना त्यांना देण्यात येत होती.
31 ऑगस्ट 1902 रोजी ते इंग्लंडहून परत आले. राजोपाध्ये यांचा अर्ज इंग्रज प्रतिनिधी कर्नल फेरीस, मुंबई सरकार (लॉर्ड नॉर्थकोट गव्हर्नर) व भारत सरकार (लॉर्ड कर्झन) या सर्वांनीच फेटाळला. त्यांना वार्षिक 20,000 रु. उत्पन्नास मुकावे लागले. वास्तविक वेदोक्ताचा वाद हा सर्वस्वी हिंदू धर्माच्या अंतर्गत वाद होता. त्याचा न्यायनिवाडा करण्यासाठी परकीय सत्तेचा हस्तक्षेप अनाठायी होता; पण त्याचे भान न ठेवता सनातन्यांनी ब्रिटिश सरकारकडे दाद मागून सर्वच अर्थाने हात दाखवून अवलक्षण केले असे म्हणावे लागेल. शाहूंनी राजोपाध्ये यांच्या जागी तात्याराव जोशी यांची नियुक्ती केली.
वेदोक्त प्रकरणी शेवटी शाहूंचा विजय झाला. त्यांचे क्षत्रियत्व महाराष्ट्रातील ब्रह्मवृंदांनी मान्य केले. वेदोक्त प्रकरणामुळे प्रामुख्याने मराठा समाज जागा झाला. वेदोक्त प्रकरण हा ब्राह्मण व क्षत्रिय यांच्यातील श्रेष्ठत्वासाठी चाललेला लढा होता.
ग.त्र्यं. माडखोलकर लिहितात, “टिळकांची वेदोक्ताच्या वादातील भूमिका नुसती साहजिक दृष्टीनेच प्रतिगामी नव्हे तर शास्त्रसिद्ध आणि तर्कशुद्धही नव्हती हे प्रत्ययास येते.” वेदोक्त प्रकरणातील शाहूंची भूमिका त्यांच्या व्यापक समाजकारणांशी विसंगत होती.आपण क्षत्रिय आहोत याचा त्यांना अभिमान होता.
X X
धर्मनिरपेक्ष राज्य :
राजर्षी शाहूंनी हिंदुत्वाचा अभिमान जाहीरपणे कधीच प्रकट केला नाही. कोल्हापूर शहराच्या रविवारपेठ भागात मशीद बांधण्यास त्यांनी परवानगी दिली होती. तसेच शाहुपुरी भागातील मशीद बांधण्यास जागा व मंजुरी दिल्याची नोंद आहे. कुराण ग्रंथाच्या मराठी भाषांतरासाठी एक समिती नेमली होती व ग्रंथ प्रकाशनासाठी २५,००० रु. मंजूर केले होते. गानसम्राद अल्लदियाँखान हे त्यांच्या आश्रयाला होते. आपली कन्या राधा हिच्या विवाहानिमित्त त्यांनी जे विवाह लावले त्यात काही मुस्लिम विवाह त्यांनी लावले होते. मिरजेच्या ख्रिश्चन डॉक्टरांशीही त्यांची मैत्री होती. 'श्रीशाहू विव्हर्स असोसिएशन' ही जी रायबाग येथे विणकरांची खास संस्था होती त्यात 40 पैकी 20 कुटुंबे मुस्लिम होती. शाहूंनी बहुजन समाजातील वकिलांना ज्या वकिलीच्या सनदा दिल्या त्यातही अनेक मुस्लिमांचा समावेश होता. त्यांचा दरबारी फोटोग्राफर मुस्लिम होता. सम्राट अकबर याने हिंदू-मुस्लिम ऐक्य घडवून आणले म्हणून त्यास ते खरा महात्मा समजत होते. एकंदरीत हिंदू-मुस्लिम असा भेद आपल्या संस्थानातील प्रजेत त्यांनी कधीच केला नाही.
कोल्हापूर शहरास वसतिगृहाची जननी बनविले -
इ.स. 1897 मध्ये दुष्काळ पडला तेव्हा राजर्षी शाहूंनी सर्व जातीधर्माच्या विद्यार्थ्यांसाठी एक वसतिगृह काढले. हे वसतिगृह ब्राह्मणांपासून ते शूद्रापर्यंत सर्व जातींच्या विद्यार्थ्यांना खुले होते व तेथे फक्त 2 रु. दराने भोजन मिळे. प्रारंभी या वसतिगृहात ब्राह्मण, मराठा, इतर मागासवर्गीय, शूद्र तसेच मुस्लिम, ख्रिश्चन, जैन वगैरे सर्व जातीधर्मांचे विद्यार्थी होते. पण या वसतिगृहात अस्पृश्यता पाळली जाऊ लागली. वरिष्ठ व कनिष्ठ जाती असा भेद पाळला जाऊ लागला. परिणामी फक्त ब्राह्मण विद्यार्थीच तेथे शिल्लक राहिले. शूद्रातिशूद्रांना तेथे राहणेच कठीण झाले. या पाश्र्वभूमीवर शाहू महाराजांनी ते वसतिगृहच इ.स. 1911 मध्ये बंद केले. प्रत्येक जातीसाठी स्वतंत्र वसतिगृहे काढली तर त्या त्या जातीची मुले वसतिगृहात येतील व शिक्षण घेतील असा विचार त्यांना सुचला. केवळ गरिबीमुळे कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये, प्रत्येक जातीला शिक्षणाची संधी मिळाली पाहिजे, शिक्षण हेच समाजपरिवर्तनाचे साधन आहे असे त्यांना वाटत होते. म्हणून त्यांनी कोल्हापूर
शहरात एकूण 23 वसतिगृहे बांधली ती याप्रमाणे -
1) व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग (1901) - मराठा जातीच्या विद्यार्थ्यांसाठी हे होते.कर्मवीर भाऊराव पाटील याच विद्यार्थी वसतिगृहात शिकले.
2) दिंगबर जैन बोडिंग (इ.स. 1909)
वीरशैव लिंगायत बोडिंग (1907)
3)मुस्लिम बोडिंग या बोडिंगसाठी कोल्हापुरातील दसरा चौकातील 25000
4) चौरस फुटांची जागा व 7000 रु. वार्षिक उत्पन्न असणारी जमीन दिली होती.
5) मिस क्लार्क बोडिंग, (महार, मांग, ढोर चांभार या जातीतील मुलांसाठी होते.)
6) श्री नामदेव बोडिंग (1911)
7) पांचाळ ब्राह्मण वसतिगृह (1912)
8) इंडियन ख्रिश्चन वसतिगृह (1915)
9) वैश्य होस्टेल (1918)
10) आर्य समाज होस्टेल (1918)
11) ढोर चांभार होस्टेल (1919)
12) कायस्थ प्रभू वसतिगृह (1912)
13) इंदुमती वसतिगृह
14) सारस्वत बोडिंग (1912)
15) देवज्ञ बोर्डिंग (1916)
16) शिवाजी वैदिक बोर्डिंग (1920)
17) सोमवंशीय आर्य क्षत्रिय बोर्डिंग (1920)
18) सुतार बोर्डिंग (1921)
19) नाभिक विद्यार्थी बोर्डिंग (1921)
20) देवांग बोर्डिंग हाऊस (1921)
21) भोई समाज बोर्डिंग (1921)
22) राजपूतवाडी बोर्डिंग (1921)
23) रूकडी बोडिंग (1921)
प्रत्येक जातीसाठी स्वतंत्र वसतिगृहे काढल्याने प्रत्येक जातीला स्वतःच्या विकास करून घेण्याची संधी मिळाली. वरील बोडिंगाशिवाय पुणे, नाशिक, अहमदनगर, पंढरपूर व नागपूर येथील विद्यार्थीवसतिगृहांना शाहू महाराजांनी मुक्तहस्ते मदत केली. कोल्हापूर शहाराला Mother of Student's Hostel हे नाव मिळाले.
नाशिक येथील श्री. उदाजी मराठा विद्यार्थी वसतिगृहाच्या इमारतीच्या पायाभरणी समारंभाचे ते प्रमुख पाहुणे होते. त्या वसतिगृहास त्यांनी 19000 रु. देणगी दिली. पुणे येथील नूतन मराठी विद्यालयास 2000 रु. देणगी दिली, नागपूर येथील अस्पृश्य वसतिगृहास 5000 रु. दिले. सुमारे 75 वर्षे महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, अर्थकारण शिक्षण, कला इ. क्षेत्रांत नेतृत्व करणाऱ्या व्यक्ती
शाहूंनी स्थापन केलेल्या वस्तीगृहातच राहून शिकल्या. या वसतिगृह चळवळीपासूनच प्रेरणा घेऊन महाराष्ट्रातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी मागासलेल्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे काढली.
सक्तीचे व मोफत प्राथमिक शिक्षण (शैक्षणिक चळवळ) :
2 एप्रिल 1894 रोजी शाहू छत्रपतींनी राज्यकारभार हाती घेतला तेव्हा कोल्हापूर होत्या तर संस्थानची लोकसंख्या 9 लक्ष होती. संस्थानात एकूण प्राथमिक शाळा 224 विद्यार्थी 15,000 होते. संस्थानच्या एकूण उत्पन्नापैकी 3.75% एवढा शिक्षणावर खर्च होत असे. फक्त उच्चवर्गीय विद्यार्थीच शिकत असत. उच्च शिक्षण देणारे राजाराम महाविद्यालय होते; पण तेथेही 61 पैकी 55 विद्यार्थी ब्राह्मण होते. त्यांनी शैक्षणिक प्रगतीसाठी जे केले त्याचा संक्षिप्त आढावा -
1) पुण्याच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे ते अध्यक्ष होते. या संस्थेला त्यांनी आर्थिक मदत केली होती.
2) संस्थानातील उपशिक्षणाधिकारी हे पद नष्ट करून त्याऐवजी सर्वोच्च असे शिक्षणाधिकारी हे पद निर्माण केले. या पदावर के. व्ही. कीर्तिकर, ए.बी. लठ्ठे, महादेव डोंगरे, डी. आर. भोसले यांनी काम केले होते.
3) विविध जातीधर्मांच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची भूमिका त्यांनी घेतली होती. शेती, कला, अभियांत्रिकी व वैद्यकीय शिक्षणासाठी शिष्यवृती देण्याचे धोरण होते. अशा विद्यार्थ्यात ब्राह्मण, वीरशैव, मराठा, दलित वगैरे विविध जातींतील विद्यार्थी होते.
4) शिक्षण हे वरिष्ठ वर्गाकडून खालच्या वर्गाकडे झिरपत जाईल हा सिद्धांत म. फुले यांच्याप्रमाणेच राजर्षी शाहूंना मान्य नव्हता. आपल्या राज्यातील प्रत्येक खेड्यात एकतरी शाळा असावी व त्या शाळेच्या कारभारावर गावाचे पूर्ण नियंत्रण असावे व त्यासाठी एक पंच कमिटी असावी हा निर्णय त्यांनी अमलात आणला.
5) शिक्षकांच्या प्रशिक्षणाची सोय केली. 6) 25 जुलै 1917 रोजी प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करण्याचा निर्णय घेतला; पण हा कायदा होऊन मुलांची शेतीच्या कामात मदत होते म्हणून शाळेत मुले न पाठविण्याकडे पालकांचा कल होता. तेव्हा अशा पालकांना दंड म्हणून एका महिन्यास 1 रु. दंड आकारला. देवालय बांधताना शेजारीच शाळेच्याही खोल्या बांधाव्यात हा नियम होता.
7) सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची अंमलबजावणी केली. 'गाव तेथे शाळा' हा उपक्रम राबविला. (4 मार्च 1918) तेव्हा 27 शाळांमधून 1896 विद्यार्थी शिक्षण घेत होते. 1922 मध्ये ही संस्था 420 शाळा व 22,000 विद्यार्थी एवढी झाली होती.
8) संस्थानाबाहेरील स्त्रीशिक्षणास त्यांनी सढळ हाताने आर्थिक मदत केली. हिंगणे येथील महिला आश्रमास 500 रु. देणगी दिली होती.
9) कृष्णाबाई केवळकर या मुलीस मुंबईच्या ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षणासाठी मदत केली. एवढेच नव्हे तर 200 रु. पगारावर त्यांची कोल्हापूरच्या सरकारी इस्पितळात नेमणूक दिली.
10) शाहूंना उच्चशिक्षणापेक्षा बहुजनांच्या सक्तीच्या व मोफत शिक्षणात अधिक रस असल्याने त्यांनी कोल्हापूरचे राजाराम महाविद्यालय बंद करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्यावर टीका झाली. जून 1919 पासून राजाराम हायस्कूल व राजाराम कॉलेज या दोन्ही संस्था आर्य समाज प्रतिनिधी सभेकडे चालविण्यासाठी दिल्या होत्या.
11) पुणे येथील शिवाजी एज्युकेशन सोसायटी व अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख यांची शिक्षण संस्था यासंही राजर्षी शाहूंची प्रेरणा व सहकार्य होते. अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या खामगाव येथे 27 डिसेंबर 1917 रोजी भरलेल्या अधिवेशनात अध्यक्ष या नात्याने केलेल्या भाषणात म्हटले, सक्तीच्या व मोफत शिक्षणाची हिंदुस्थानला अत्यंत आवश्यकता आहे. हे मत आग्रहपूर्वक विस्ताराने मांडले.
12) राजर्षि शाहूंनी प्रसंग व गरजेनुसार पुढील शाळा काढल्या होत्या.
1) पुरोहितशाळा, 2) युवराज शाळा, 3) पाटील शाळा, 4) उद्योग शाळा, 5) संस्कृत शाळा, 6) सत्यशोधक शाळआ, 7) सैनिकी शाळा, 8) बालवीर शाळा, 9) डोंबारी मुलांची शाळा, 10) कला शाळा. राजर्षी शाहू व अस्पृश्योद्धार
राजर्षी शाहू गादीवर आले तेव्हा (1894) कोल्हापूर संस्थानमध्ये महार, मांग, ढोर चांभार या अस्पृश्य समाजाची संख्या 1 लाखाएवढी होती. अस्पृश्यांच्या शिक्षणाची गरज त्यांना वाटे. त्यांनी अस्पृश्योद्धारासाठी पुढील पावले उचलली.
1) अस्पृश्यांसाठी असलेल्या स्वतंत्र शाळेच्या संख्येत त्यांनी वाढ केली. ते सत्तेवर आले तेव्हा 5 शाळा होत्या. 1917 मध्ये त्यांची संख्या 27 झाली.
2) खासगी खर्चातून 3 व दरबारी खर्चातून 4 अशी एकूण 7 वसतिगृहे त्यांनी चालविली.
3) खासगी खर्चातून सोनतळी स्टेशन, बंगला व रूकडी ही 3 वसतिगृहे चालविली होती. पंढरपूर, नागपूर, नाशिक येथे असलेल्या अस्पृश्यांच्या वसतिगृहास त्यांनी भरीव आर्थिक सहकार्य केले होते.
4) अस्पृश्य विद्यार्थ्यांना फी माफीची सवलत त्यांनी दिली. राजाराम हायस्कूल व राजाराम कॉलेजमध्ये अस्पृश्य विद्यार्थ्यांना मुक्त प्रवेश देण्याची भूमिका त्यांनी घेतली. या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी खास शिष्यवृत्ती देण्यात आली. राजर्षी शाहूंनी आपले लाडके चिरंजीव प्रिन्स शिवाजीच्या स्मरणार्थ 10,000 रु. ची ठेव हुजूर खजिन्यात ठेवून त्या व्याजातून प्रत्येक विद्यार्थ्यास 5 रु. शिष्यवृत्ती देण्याची योजना आखली.
5) अस्पृश्य जातीतील 4 विद्यार्थ्यांना वकिली व 3 अस्पृश्य विद्यार्थ्यांना डॉक्टरकीचे शिक्षण देण्याची व्यवस्था केली. वकील, डॉक्टर हे व्यवसाय उच्च वर्गीयांपुरतेच मर्यादित राहू नयेत अशी त्यांची इच्छा होती.
6) राजदरबारातील मंडळींचे खासगी नोकर म्हणून त्यांनी अस्पृश्यांना नोकऱ्या दिल्या. त्यांचे अंगरक्षक महार होते..
7) जातिवाचक आडनावे बदलण्याचा उपक्रम त्यांनी हाती घेतला. कोल्हापूर संस्थानातील अस्पृश्यांनी मराठे-ब्राह्मण यांची आडनावे लावली. अस्पृश्य 'सूर्यवंशी' संबोधण्यात यावे असा हुकूम त्यांनी काढला होता.
8) महार वतन पद्धत त्यांनी कायद्याने बंद केली (1918). परंपरागत गावगाड्यामध्ये महार समाजाला वतनाच्या नावाखाली हलक्या दर्जाची कामे करावी लागत. त्या कामाचा मोबदला त्यांना जमिनीच्या रूपात मिळे. ही वतन पद्धती म्हणजे एका अर्थाने गुलामगिरीच होती. पुढे आंबेडकरांनी ही पद्धत मुंबई राज्यात बंद व्हावी यासाठी लढा दिला.
9) गुन्हेगार जातीची (फासेपारधी, गारुडी) पोलिस ठाण्यावरची हजेरी त्यांनी बंद केली. माणगाव येथील परिषदेत बोलताना आपण हजेरी ची पद्धत बंद का केली. याची विस्तृत चर्चा केली आहे. गुन्हेगार जात अशी कोणतीही नसतेच असे ते म्हणत. या जातीतील लोकांना त्यांनी राजवाड्यात नोकऱ्या दिल्या. गुन्हेगारी जातींना रोजगार दिला. सरकारी बांधकामात गुंतून घेतले. परिणामी गुन्हेगार जातींनी गुन्हेगारी सोडून दिली. गुन्हेगार जमाती शाहूंना देव मानत होत्या.
10) गंगाराम कांबळे या महार व्यक्तीला कोल्हापुरात हॉटेल चालविण्यासाठी त्यांनी आर्थिक मदत केली. ते स्वतः त्या हॉटेलमध्ये जात. चहा फराळ घेत. खुद्द राजाच असे वागू लागल्याने अस्पृश्यतेची दाहकता कमी झाली हे नक्कीच.
11) कोल्हापूरच्या नगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्षपद त्यांनी दत्तोबा पोवार या दलितास दिले होते.
12) शिक्षण, आरोग्य वा इतर कोणत्याही सरकारी खात्यात अस्पृश्यता पाळू नये असा नियम त्यांनी केला होता.
13) कोल्हापूरचे भवानी मंदिर त्यांनी अस्पृश्यांना खुले केले.
14) स्पृश्य-अस्पृश्य यांची सहभोजने त्यांनी घडवून आणली होती. जातिभेद मोडा, जातिभेद पाळणे हे पाप आहे, देशाच्या प्रगतीला अडथळा आहे असे ते म्हणत.
15) मराठे व धनगर हे एकाच क्षत्रिय कुळातील आहेत अशी शाहूंची स्पष्ट भूमिका होती.इंदोरचे होळकर वा राजर्षी शाहू यांच्यात विवाहासंबंधात पत्रव्यवहार चालू होते. इंदोरचे युवराज़ यशवंतराव होळकर व शाहूंची चुलत बहीण चंद्रभागा या दोघांचा विवाह 28 जानेवारी 1924 मध्ये झाला. हा विवाह समारंभ अत्यंत थाटामाटात झाला होता. धनगर-मराठे यांच्यात दरवर्षी कोल्हापूर संस्थानात किमान 100 विवाह व्हावेत अशी त्यांची इच्छा व अपेक्षा होती. हिंदू व जैन यांच्यातील विवाहास त्यांनी कायदेशीर मान्यता दिली होती.
16) कोल्हापूर संस्थानात त्यांनी अस्पृश्य तलाठी नेमण्याचा निर्णय घेतला होता.
17) राजर्षी शाहूंनी अस्पृश्यता निवारण परिषदांतून भाषणे केली होती. 30 मे 1920 रोजी नागपूर येथील अ.भा. बहिष्कृत समाज परिषदेत अध्यक्षपदावरून त्यांनी भाषण केले होते. कोल्हापूर संस्थानात अस्पृश्योद्धाराची जी कामे होती घेतली त्याचा वृतांत दिला. राजर्षी शाहूंनी आंबेडकरांच्या नेतृत्वाचा वारंवार गौरव केला होता. या परिषदेसाठी राजर्षी शाहूंचे नागपुरात भव्य स्वागत करण्यात आले होते. कोल्हापूर जिल्ह्यात माणगाव या छोट्याशा खेड्यात 20 मार्च 1920 रोजी अस्पृश्यांची जी परिषद भरली त्याची प्रेरणा शाहूच होते.
18) इ.स. 1902 मध्ये कोल्हापूर संस्थानातील सरकारी नोकऱ्यांत 50% जागा राखून ठेवण्याचा निर्णय राजर्षी शाहू महाराजांनी घेतला. हा निर्णय त्याकाळचा संदर्भ व परिस्थिती विचारात घेता अत्यंत क्रांतिकारक होता असे म्हणावे लागेल. जी गोष्ट मंडल अयोगाने 1986 मध्ये केली त्याची अंमलबजावणी कोल्हापूर संस्थानात 85 वर्षांपूर्वी केली होती हे विशेष.
19) खानदानी मराठे जातिभेद टिकवतात असा त्यांचा आक्षेप होता. पंचकुळी, सप्तकुळी, 96 कुळी हे मराठ्यातील वर्गीकरणच त्यांना मान्य नव्हते. जातिभेद मोडण्याच्या कामी उच्च म्हणणाऱ्या जातीकडूनच सुरुवात झाली पाहिजे. जपानमध्ये उच्च वर्गाच्या सामुराई लोकांनी ज्याप्रमाणे जाती मोडण्याच्या कामी पुढाकार घेतला त्याचप्रमाणे भारतातील क्षत्रिय व ब्राह्मण यांनी घ्यावा असे राजर्षी शाहूंना वाटत होते.
20) बारा बलुतेदारांना कोणताही व्यवसाय करण्याची परवानगी दिली होती. बारा बलुतेदारांनी परंपरागत व्यवसाय करू नयेत, कामाचा मोबदला पैशाच्या रूपात घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले होते.
कुलकर्णी वतन नष्ट केले :-
पाटील व कुलकर्णी वतने ही शतकापासून रूढ होती. पाटील हा मराठा असे तर कुलकर्णी ब्राह्मण. पाटील अशिक्षित तर कुलकर्णी साक्षर. ब्राह्मणेतर पत्रकार व लेखक मुकुंदराव पाटील यांनी 'कुलकर्णी लीलामृत' हा ग्रंथ लिहून कुलकर्णीच्या कारवाया, कपटनीती व त्यांच्याकडून होणारा अन्याय यावर प्रकाश टाकला होता.
म. फुले यांनी कुलकर्णीला 'ग्रामराक्षस' म्हटले होते. कुलकर्णी हे सावकारी करत, खोट्या नोंदी ठेवत, गावात गुप्त कारस्थाने करीत म्हणून कुलकर्णी हे वतनच रद्द करून पगारी तलाठी नेमले. हा निर्णय डॉ. कुर्तकोटी, टिळक, प्रो. विजापूरकर यांना न आवडल्याने त्यांनी शाहू महाराजांवर टीका केली.
शाहूंच्या निषेधाच्या सभाही झाल्या; पण त्यांनी आपला निर्णय बदलला नाही. छत्रपतींनी आमच्यावर अन्याय केला म्हणून कुलकर्णीनी आपला संघ तयार केला. त्या संघास टिळक, न.चि. केळकर, डॉ. कुर्तकोटी, 'भाला' कार भोपटकर, दत्तोपंत बेळकी आदींनी पाठिंबा दिला होता. कुलकर्णी संघाने अधिवेशने घेऊन कुलकर्ण्याची बाजू मांडली; पण त्याचा उपयोग झाला नाही.
ब्राह्मणेतर चळवळीतील वृत्तपत्रांना व ब्राह्मणेतर लोकांना अर्थसाहाय्य :
केसरी, मराठा, लोकसंग्रह, विश्ववृत्त, समर्थ या वर्तमानपत्रांचे संपादक ब्राह्मण होते आणि ते सत्यशोधक ब्राह्मणेतर चळवळीवर टीका करीत असत. ब्राह्मण-ब्राह्मणेतर हा भेद नको तर सुशिक्षित-अशिक्षित असे वर्गीकरण करता येईल असे टिळक म्हणत. ब्राह्मणेतर पत्रावर ब्राह्मण पत्रांचे संपादक जी टीका करत त्यास प्रत्युत्तर देण्यासाठी ब्राह्मणेतर पत्र संपादक पुढे आले पाहिजेत असे राजर्षी शाहूंना वाटे. ब्राह्मणेतर पत्रांनी ब्राह्मणेतर चळवळीचे मित्र, मार्गदर्शक व तत्त्वचिंतक व्हावे असे शाहूंना वाटे.
'डेक्कन रयत' हे इंग्रजी पत्र होते. ब्राह्मणेतरांची ग्राम्हाणी इंग्रजांना समजली पाहिजेत अशी शाहूंची भूमिका होती म्हणूनच त्यांनी हे पत्र सुरू करण्यासाठी 4000 रु. ची देणगी दिली होती. 'विजयी मराठा' पत्रास 4000 तर 'दीनमित्रा'स 10,000 रु. मदत म्हणून दिले होते. या सर्वच पत्रांना अडचणीच्या प्रसंगी त्यांनी मदत केली होती.
तसेच केशवराव ठाकरे, दिनकरराव जवळकर, श्रीहरी तुंगार, हरिभाऊ चव्हाण, के.बी. प्रकाशनासाठी शाहूंनी सहकार्य केले होते. या ग्रंथांमुळे बहुजनांचे प्रबोधन झाले होते व बहुजनांतून लेखकही पुढे येऊ शकले.
X X
सत्यशोधक चळवळ व शाहू :-
राजर्षी शाहू सत्यशोधक नव्हते असे मत स.मा. गर्गे, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, य. दि. फडके, नलिनी पंडित व्यक्त करतात. म. फुले व त्यांच्या सत्यशोधक चळवळीचा विचार महाराष्ट्रात नेण्याचे काम राजर्षी शाहूंनी केले. वास्तविक सत्यशोधक चळवळीत 96 कुळी मराठे फारच कमी होते. राजर्षी शाहू, जेधे, जवळकर, भास्कराव जाधव यांचाच अपवाद त्यास होता. राजर्षी शाहूंचे सत्यशोधक चळवळीत मोठे योगदान होते हे खालील मुद्यांवरून दिसते.
1) 11 जानेवारी 1911 या दिवशी कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन झाली. 1913 मध्ये 150 सभासद होते. विठ्ठल डोणे, महादेव डोंगरे, हरिभाऊ चव्हाण, भास्करराव जाधव इ. मंडळी या शाखेची पदाधिकारी होती.
2)सत्यशोधक समाजाच्या शाखेसाठी शाहूंनी मोफत जागा दिली होती. देणगी दिली, इमारत बांधकाम सुरू झाले होते.
3) ए. बी. लठ्ठे, महादेव डोंगरे, भास्करराव जाधव, बाबूराव यादव यांना सत्यशोधक विचारांच्या प्रचारास परवानगी दिली होती.
4) कोल्हापुरात पुरोहित शाळा काढली. ब्राह्मणेतरांतून पुरोहित तयार व्हावेत असे त्यांना वाटे. सत्यशोधक जलशांतील कलाकारांनाही शाहूंनी आश्रय दिला; पणसत्यशोधक जलसे ज्याप्रकारे चालतात ते प्रकार त्यांना मान्य नव्हते. पण राजर्षी शाहू हे सत्यशोधक चळवळीशी पूर्णपणे समरस कधीच झाले नाहीत. त्या चळवळीची संपूर्ण जबाबदारी त्यांनी कधीच घेतली नाही. कारण किंग एडवर्डच्या कोल्हापुरातील पुतळ्यास काही सत्यशोधकांनी डांबर फासल्याची घटना घडली होती. 'जागृती' पत्राने शाहूंवरील मृत्युलेखात शाहूंच्या मृत्यूमुळे सत्यशोधक समाजाच्या चळवळीचा हात गळून पडला असे म्हटले होते. अच्युत कोल्हटकरही शाहू सत्यशोधक होते हे मान्य करतात.
राजर्षी शाहू व आर्य समाज :-
राजर्षी शाहू हे विचाराने सत्यशोधक समाजाचे होते की आर्य समाजाचे होते असा एक वाद आहे. त्यांनी आर्य समाजाच्या कार्याचे कौतुक केले होते व 'मी आर्य समाजी आहे' असे घोषित केले होते.
राजाराम हायस्कूल व राजाराम कॉलेज या संस्था चालविण्यासाठी त्यांनी आर्य समाजाकडे दिल्या होत्या. आर्य समाजाची कोल्हापुरात त्यांनी एक शाखाही काढली होती.
'सत्यार्थ प्रकाश' या ग्रंथाच्या अभ्यासाची शाळेतून त्यांनी सक्तीही केली होती. आर्य समाजाचा कोल्हापुरातील एक गट इंग्रजांशी आपण एकनिष्ठ आहोत म्हणून ब्रिटिशांना मदत करीत होता. म्हणूनच ते आपण आर्यसमाजी आहोत असे म्हणत असावेत. अर्थात, हा त्यांचा राजकीय धूर्तपणा होता असे मत काही संशोधक व्यक्त करतात.
राजर्षी शाहू व स्वातंत्र्यचळवळ -
ब्रिटिश सत्तेबाबतचा दृष्टिकोन :
राजर्षी शाहू हे एक संस्थानिक होते. ते ब्रिटिशांचे मांडलिक होते त्यामुळे ते ब्रिटिशांना अनुकूल असणे साहजिकच होते. पण ते स्वातंत्र्याचे द्वेष्टे नव्हते. भारत ब्रिटिशांच्या कायम गुलामगिरीत राहावा असे त्यांनी कधीच म्हटले नाही.
शिवाजी क्लब या कोल्हापुरातील क्रांतिकारकांच्या संघटनेला त्यांनी दरवर्षी 500 रु. मदत केली होती. क्रांतिकारकांनी काढलेल्या 'वनिता वस्त्र भांडार'मधून ते दरवर्षी संस्थानची सरकारी कापड खरेदी करत.
शाहू महाराज क्रांतिकार्यास मदत करत होते असे टिळकांचे नातू श्रीधरपंत टिळक म्हणतात. 'शिवाजी क्लब' या संस्थेची मूळ अस्सल कागदपत्रे उपलब्ध आहेत. त्यावरून शाहूंचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान स्पष्ट होते. ते स्वातंत्र्य चळवळीत उघडपणे भाग घेऊ शकत नव्हते. कारण तसे त्यांनी केले असते तर त्यांचे संस्थान खालसा होण्याचीही भीती होती. त्यांनी ब्रिटिशनिष्ठा अनेक भाषणांतून व्यक्त केली होती. त्यांनी पहिल्या महायुद्धाच्या वेळी 20 लक्ष रु. ब्रिटिशांना कर्ज म्हणून दिले होते व स्वतः 20,000 रु. देणगी दिली होती.
युद्धकामासाठी कोल्हापूर संस्थानातून दरमहा 200 सैनिक पुरविले होते. “आम्हास स्वराज्य पाहिजे; पण स्वराज्यास आम्ही पात्र नाहीत. स्वराज्यास पात्र होण्यासाठी प्रथम जातिभेद झुगारून दिले पाहिजेत असे ते म्हणत. ब्रिटिशांनी भारतात शांतता व सुव्यवस्था निर्माण केली, न्याययंत्रणा निर्माण केली, कायद्याचे राज्य निर्माण केले.
कायद्यामुळे प्रत्येक व्यक्ती समान असा नियम केला म्हणून ते ब्रिटिशांचे गुणगानही करत. चिरोलच्या 'Indian Unrest' या ग्रंथाचे मराठी भाषांतर करून त्याच्या प्रती विकत घेऊन त्यांनी संस्थानात मोफत वाटल्या होत्या. 1911 मध्ये पंचम जॉर्जच्या राज्याभिषेकाबद्दल दरबार भरवून त्यांनी आनंद व्यक्त केला होता..
कोल्हापूर संस्थानातील शेती, सहकार व दुष्काळाबाबत राजर्षी शाहूंचे योगदान:
1) राजर्षी शाहूंनी कोल्हापूर संस्थानात पाटबंधारे योजना हाती घेतल्या होत्या. राधानगरी, काळम्मावाडी धरणांची कामे हाती घेतली. विहिरी व पाझर तलावांची कामे होती घेतली.
2) कृषिविषयक शिक्षणाची सोय केली. सुधारित पद्धतीने शेती करण्याचा ते सल्ला देत असत.
3) शेतीत नवनवे प्रयोग व्हावेत असे त्यांना वाटे. चहा, कॉफीच्या लागवडीवर त्यांनी भर दिला होता. ऊस लागवडीसही प्रोत्साहन दिले. रबर, ताग, बटाटे, कंबोडिया कापूस, आंबा, फणस, पालेभाज्या व फळे आदींचे नवनवे प्रयोग आपल्या संस्थानात केले होते. संस्थानातील शेतकऱ्यांना व 1 लक्ष 24,000 रु. कर्जे दिली. सावकारशाहीवर नियंत्रण आणले, शेतकऱ्यांना सुधारित अवजारे दिली.
4) राजाराम हायस्कूल शेजारी 'Model Farm' च्या प्रयोग त्यांनी राबविला. आधुनिक शेतीपद्धती, खते, तंत्रज्ञान यावर व्याख्याने आयोजित केली.
5)शेतकऱ्यांनी शेतीस पूरक म्हणून दुग्धपालन, कुक्कुटपालन करण्याचा त्यांनी सल्ला दिला होता. कृषिविषयक प्रदर्शने आयोजित केली होती.
6)इ.स. 1912 मध्ये कोल्हापूर संस्थानपुरता सहकार कायदा पास केला. आजही महाराष्ट्रात सर्वात जास्त सहकारी संस्था कोल्हापुरात आहेत. 1897 मध्ये दुष्काळ पडला तेव्हा धान्याचे भाव खूपच वाढले होते; पण योजना आखून कृत्रिम धान्यटंचाई व भाववाढ यावर त्यांनी प्रभावी उपाययोजना केली. दुष्काळप्रसंगी म्हैसूरहून धान्य आणल्याची नोंद आहे.
7)दुष्काळप्रसंगी नवीन विहिरी तयार करणे, जुन्यांची दुरुस्ती, नद्यांवर बंधारे घालून श्रमिकांना कामे उपलब्ध करून दिली. रस्त्याचीही कामे हाती घेतली होती.
8)1899 च्या दुष्काळात संपूर्ण देशात 10 लक्ष माणसे मृत्यू पावली; पण कोल्हापूर संस्थानात मात्र एकही भूकबळी पडला नाही. याचे सर्व श्रेय राजर्षी शाहूंना आहे. 1897 मध्ये कोल्हापुरात प्लेगची साथ आली तेव्हा त्यांनी अनेक उपाययोजना केल्या.
X X
क्षात्रजगद्गुरू पीठाची निर्मिती :-
जगन्नाथपुरी, द्वारका, शृंगेरी व बद्रीनारायण अशी चार पीठांची स्थापना आद्य शंकराचार्यांनी केली होती. महाराष्ट्राचा प्रदेश हा द्वारकेच्या शारदा मठाच्या कक्षेत येतो.
राजर्षी शाहूंनी डॉ. कुर्तकोटी यांची करवीर पीठाचे शंकराचार्य म्हणून नेमणूक केली होती (1917).
डॉ. कुर्तकोटींनी पुरोगामीपणाचा बुरखा पांघरला तरी डॉ. कुर्तकोटी हे सनातनी आहेत हे राजर्षी शाहूंच्या लक्षात आले. कुलकर्णी यांची वतने रद्द करण्याचा निर्णय डॉ. कुर्तकोटींना आवडला नाही व ते कोल्हापूर सोडून निघून गेले.
शाहू महाराजांनी क्षात्रजगद्गुरू पीठाची केलेली निर्मिती वि. रा. शिंदे, प्रबोधनकार ठाकरे, भास्करराव जाधव, मुकुंदराव पाटील यांना आवडली नव्हती.
शाहू छत्रपतींनी ब्राह्मणेतर पुरोहित तयार करण्यासाठी 1920 मध्ये कोल्हापुरात 'श्री शिवाजी वैदिक स्कूल' निर्माण केले. या स्कूलमध्ये 62 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. त्यापैकी निम्मे विद्यार्थी पुणे, नाशिक, खानदेश, सातारा भागातून आले होते.
शाहू छत्रपतींनी सदाशिव लक्ष्मण पाटील यांची पाटगावच्या धर्मपीठावर क्षात्रजगद्गुरू म्हणून 1920 मध्ये नेमणूक केली. क्षात्रजगद्गुरूसाठी एक आचारसंहिता त्यांनी तयार केली होती.
11 नोव्हेंबर 1920 रोजी सदाशिव लक्ष्मण पाटील यांचा वैदिक मंत्रघोषात पट्टाभिषेक करण्यात आला. स्वतः शाहूंनी, ए.बी. लठ्ठे व इतर दरबारी अधिकाऱ्यांनी क्षात्रजगद्गुरूला दरबारात वाकून मुजरा केला; पण भास्करराव जाधवांनी मात्र मुजरा करण्यास स्पष्ट नकार दिला हे विशेष.
सनातनी धर्मगुरू व त्यांचे समर्थक यांना वठणीवर आणण्यासाठी पाटगावच्या धर्मपीठावर एका मराठा (ब्राह्मणेतर) तरुणाची नियुक्ती करण्याचे धैर्य त्यांनी दाखविले; परंतु हा निर्णय सत्यशोधक चळवळीच्या तत्त्वांच्या विरोधी होता. त्यामुळे सत्यशोधक मंडळी नाराज झाली होती. क्षात्रजगद्गुरू पीठाची निर्मिती व त्यावर एका मराठा तरुणाची नियुक्ती या निर्णयाचे समर्थन श्रीपतराव शिंदे, खंडेराव बागल या ब्राह्मणेतर पत्र संपादकांनी केले होते.
देव व माणूस यांच्यातील मध्यस्थ फुल्यांनी नाकारला होता; पण क्षात्रजगद्गुरू पीठ निर्माण करून त्या विचारास त्यांनी सोडचिठ्ठी दिली होती.
6 मे 1922 रोजी राजर्षी शाहू महाराजांचे निधन झाले. महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेरच्या मराठी भाषिक प्रदेशांत अनेक ठिकाणी शोकसभा घेण्यात आल्या.
राजर्षी शाहूंनी फुल्यांची बहुजन समाजाच्या उद्धाराची कार्यपरंपरा पुढे नेली म्हणून म. फुले व राजर्षी शाहू छत्रपती हा विग्रह नसून समासच होता हे मान्य करावे लागेल. फुले यांच्या विचारांचा व कृतीचा वारसा राजर्षी शाहूंनी पुढे चालविला.
कौटुंबिक दुःखे :-
राजर्षी शाहूंच्या वैयक्तिक जीवनात अनेक दुःखे आली होती. त्यांचा एक पुत्र प्रिन्स शिवाजी हा डुकराची शिकार करताना घोड्यावरून पडून मृत्यू पावला होता.
त्यांची विधवा सून इंदुमतीला शिक्षण दिले व तिची काळजी घेतली होती. त्यांची पत्नी लक्ष्मीबाई सतत आजारी असत.
मधुमेहाच्या आजाराने त्यांचे शरीर पोखरले होते. त्यांच्या विवाहित मुलीसही सासरी सुख नव्हते. त्या कोल्हापुरात राहत होत्या. जावई देवासचे तुकोजी होळकर यांचा गैरसमाज झाला होता. त्यांच्या नजीकच्या मित्रांचेही निधन झाले होते. त्यांचा दुसरा पुत्र राजाराम याच्यात फारशी धमक नव्हती.
एक कन्या लहानपणीच वारली होती, पण या सर्व दुःखांचा त्यांनी सामना केला होता. औषध म्हणून धोडेसे मद्य घेण्याचे डॉक्टरांनी सुचविले तेव्हा "मद्य घेण्यापेक्षा मी मृत्यू पत्करेन" असे त्यांनी म्हटले होते. आजच्या तरुण पिढीने या वाक्याचे पुनः पुन्हा स्मरण करावे असे सुचवावेसे वाटते.
X X
कलाकारांचे आश्रयदाते :-
राजर्षी शाहूंना अनेक छंद होते. ते स्वतः कुस्ती खेळत, प्राण्यांशी झुंज देत, पैलवानांना ते खुराक देत. गावोगावी तालमी, आखाडे, स्थापण्यास ते त्यांनी प्रोत्साहन दिले. त्यांनी अनेक नामवंत पैलवान तयार केले होते. त्यांनी पत्रकार, लेखक, कवी, शाहीर, जलसाकार आदींना आश्रय दिला होता. गायन कोकिळा केसरबाई केरकर, संगीतसम्झट अल्लादियाखाँ, बालगंधर्व, नाटककार मामा वरेरकर, गोविंदराव टेंबे, बाबूराव पेंटर, कवी सुमंत, राजकवी श.बं. भोसले वगैरेंना त्यांनी आश्रय दिला होता.
आपल्या 22 वर्षांच्या कारकीर्दीत कोल्हापूर शहराला त्यांनी 'कलापूर' बनविले. त्यांच्याच मुळे कोल्हापूर हे मल्लविद्येचे केंद्र म्हणून ओळखले जाऊ लागले.
1894 ते 1922 ह त्यांची 28 वर्षांची कारकीर्द कोल्हापूर संस्थानच्याच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या इतिहासाल कलाटणी देणारी ठरली.
राजर्षी शाहू व स्त्री संरक्षणाचे कायदे :
राजर्षी शाहूंनी स्त्रियांच्या नैसर्गिक हक्कांचे संरक्षण करणारे कायदे पास केले व स्त्रियांची समाजाकडून व कुटुंबाकडून होणारी पिळवणूक थांबविण्याचा मोठा प्रयत्न कला.
1917 मध्ये राजर्षी शाहूंनी आपल्या संस्थानात विधवांच्या पुनर्विवाहास कायदेशीर मान्यता देणारा कायदा संमत केला.
1919 मध्ये कोल्हापूर इलाख्यातील विवाहासंबंधी कायदा पास केला. त्यातील एका कलमानुसार विवाहकाली पुरुषाचे वय 18 तर स्त्रियांचे वय 14 असावे अशी तरतूद होती. स्त्रीशी क्रूरपणाचे वर्तन करण्यास प्रतिबंध करणारा कायदा त्यांनी पास केला. एकूण 11 कलमांच्या या कायद्यान्वये स्त्रीला क्रूरपणाची वागणूक देणाऱ्या अपराध्यास 6 महिने कारावास व 200 रुपयापर्यंत दंड देण्याची तरतूद कायद्यात होती. घटस्फोट व वारसा कायदा त्यांनी पास केला. त्यानुसार सर्व वर्णांच्या अनौरस संततीला जनक बापाच्या मिळकतीत वारसा हक्क दिला गेला. या कायद्याचे दुसरे कलम पतित स्त्रियांच्या उद्धारासंबंधी आहे.
देवदासी प्रथा प्रतिबंध कायदा पास केला होता. वरील प्रकारचे क्रांतिकारक कायदे ब्रिटिश भारतातही अद्याप अस्तित्वात आले नव्हते. त्या काळात शाहू महाराजांनी हे क्रांतिकारक कायदे पास केले.
शाहूंनी स्त्रियांच्या उद्धाराचा केवळ विचार मनात आणला असे नव्हे तर प्रत्यक्ष कृतीही केली. राजाराम कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलींना हे मोफत शिक्षण देण्याचाही निर्णय त्यांनी घेतला होता. आपली विधवा सून इंदुमतीदेवीला त्यांनी शिक्षण देण्याची व्यवस्था केली होती.
राजर्षी शाहू व मुस्लिम समाज :
राजर्षी शाहू हे हिंदू मुस्लिम ऐक्याचे पुरस्कर्ते होते. हिंदू-मुस्लिम यांच्यात सलोखा वाढावा म्हणूनते सतत प्रयत्नशील होते. सर्व धर्म सारखेच महत्त्वाचे आहेत. म्हणून निरनिराळे धर्म पाळून ईश्वराजवळ पोहोचणाऱ्या लोकांनी तरी परस्परांचा द्वेष का करावा? हा प्रश्न ते विचारतात.
एकसंध राष्ट्रउभारणीच्या कार्यात धर्म आड येऊ नये असे ते आग्रहपूर्वक सांगत. मुसलमानांच्या अनेक देवस्थानांना त्यांनी उदार मनाने व उदार हाताने मदत केल्याचे अनेक दाखले त्यांच्या कारकीर्दीत दिसून येतात.
मुस्लिम समाजातील कवी चित्रकार, गायक, पैलवान अशा गुणीजनांच्या गुणांचा गौरव करून त्यांना उदार राजाश्रय दिला होता. अल्लादियाखाँ हे त्यांचे दरबारी गायक होते. शाहीर लहरी हैदर जे पोवाडे, लावण्या म्हणत त्यांना त्यांनी आश्रय दिला होता.
आबालाल रहमान यांची सरकारी शाळेत चित्रकला शिक्षक म्हणून नेमणूक केली होती. मल्लविद्येच्या क्षेत्रातही त्यांनी मुस्लिम समाजातील कित्येक पैलवानांना आश्रय दिला होता. मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी मुस्लिम बोर्डिंग त्यांनी सुरू केले होते. कुराण या मुस्लिमांच्या पवित्र धर्मग्रंथांचे मराठी भाषांतर करण्याची - योजनाही त्यांनी राबविली होती. पण त्यांच्या अकाली मृत्यूमुळे ते काम पूर्ण झाले नाही.
कोल्हापूर स्वांतत्र्यपूर्व काळात व नंतरही हिंदू-मुस्लिम यांच्यात झगडे झाले नाहीत, याचे श्रेय राजर्षी शाहूंनी हिंदू-मुस्लिम समाजात जो सलोखा व एकोपा निर्माण केला त्यास जाते.
ए.बी. लठ्ठे, धनंजय वीर, कृ.गो. सूर्यवंशी, रमेश जाधव, विलास संगवई यांनी राजर्षी शाहूंच्या चरित्रासंबंधी ग्रंथरूपाने खूप काही लिहिले आहे. डॉ. य. दि. फडके यांच्या मते, "गेल्या शतकात म. फुले यांनी स्वाभिमानाचे व समतेचे बी पेरून जे झाड लावले त्याला खतपाणी घालून काळजीपूर्वक वाढविले ते राजर्षी शाहू छत्रपतींनी.
" डॉ. आंबेडकरांनी, “राजर्षी शाहू हे सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ आहेत" असे म्हटले होते.
गणेश आकाजी गवई (पत्रकार, अस्पृश्यांचे झुंजार नेते व 'बहिष्कृत भारत'चे संपादक) यांनी बहिष्कृत भारतमध्ये 'आमचा अब्राहम लिंकन' या शब्दांत उल्लेख केला होता.
तर 'प्रबोधन'कार यांनी 'सचलाईट विझला' या शीर्षकाचा उल्लेख 16 मे 1922 च्या प्रबोधनामध्ये लिहिला होता.
विजयी मराठाकार श्रीपतराव शिंदे यांनी 15 व 29 मे 1922 रोजी दोन अग्रलेख 'दीन दुनियेचा वाली गेला' या शीर्षकाचे लिहिले होते.
https://gyaaniinfo.blogspot.com/2024/04/may-6-day-of-special-dinvishesh.html
👆
May 6 - Day of Special (Dinvishesh)
मे 6 : दिनविशेष
Comment and share
4 Comments
Very nice information
ReplyDeleteNice sirji
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteNice 👍
ReplyDelete