Mauryan Administration: Empire Founder Chandragupta Maurya An Excellent Administrator (Part-1)
1. मौर्य प्रशासन :साम्राज्य संस्थापक चंद्रगुप्त मौर्य एक उत्कृष्ट प्रशासक (भाग-1)
चंद्रगुप्त मौर्य हा साम्राज्य संस्थापक होता तसेच एक उत्कृष्ट प्रशासकही होता. त्याने निर्माण केलेली शासनव्यवस्था ही अत्यंत उत्कृष्ट व कार्यक्षम होती.
चंद्रगुप्तानेच भारतीय प्रशासनव्यवस्थेचा पाया घातला.
मुस्लिमांच्या आगमनापर्यंत चंद्रगुप्ताने निर्माण केलेली शासनव्यवस्था ही थोड्याफार फरकाने कायम होती.
चाणक्य ऊर्फ कौटिल्याच्या विचारांचा प्रभाव त्याच्या शासनव्यवस्थेच्या निर्मितीवर पडल्याचा दिसतो.
के. एम. पण्णीकर यांच्या मते,
"If Indian administration of today is analysed to its based the doctrine and practices of Chanakya will be found to be still in foree."
मौर्यकालीन प्रशासनव्यवस्थेची माहिती मॅगेस्थेनिसच्या 'इंडिका' या ग्रंथात व कौटिल्याच्या 'अर्थशास्त्र' या ग्रंथात मिळते.
शासनयंत्रणेच्या निर्मितीत चंद्रगुप्ताला कौटिल्याचे मार्गदर्शन लाभले होते.
X X
1) राजाचे अधिकार व कर्तव्ये :
राजा हा सर्वश्रेष्ठ होता. त्याच्याच हातात मुलकी व लष्करी व्यवस्थेची सूत्रे होती.
कौटिल्याने राज्याची सात प्रमुख अंगे सांगितली होती. त्यापैकी राजा हे एक प्रमुख अंग होते.
राजा हाच अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, मंत्र्यांच्या नियुक्त्या करी. गुप्तहेरांच्या नेमणुका, परदेशांशी करार तह करणे, न्यायदान करणे इ. कामे राजाला करावी लागत.
राजसत्ता अनियंत्रित असली तरी चंद्रगुप्त व अशोक यांनी सत्ता ही जनकल्याणासाठीच वापरली.
सम्राट अशोकाने म्हटले होते की,
“मी कोठेही असो, जनतेच्या अडचणी माझ्यापर्यंत येऊन पोहोचल्या पाहिजेत. त्यांच्या अडचणी सोडवणे व त्यांच्या कल्याणासाठी कार्य करणे हे माझे कर्तव्य आहे."
सर्व प्रजाजन माझीच लेकरे आहेत या भावनेने अशोक वागत असे.
जनतेला जीवित व वित्तीयांची हमी देणे, व्यापार उद्योगास प्रोत्साहन देणे, नैसर्गिक आपत्तीपासून जनतेचे संरक्षण, कायद्याचे राज्य निर्माण करणे ही राजाची कामे होती.
2) मंत्रिपरिषद :
राजाला मदत करण्यासाठी मंत्रिपरिषद होती. मंत्र्याची नेमणूक स्वतः राजा करी. मंत्र्याची संख्या मर्यादित होती.
राजाला सल्ला देण्याचे काम मंत्रिपरिषदेचे होते. मंत्र्याच्या नियुक्तीचे निकष कौटिल्याने सांगितले होते. मंत्रिपरिषदेतील व्यक्तीच्या अंगी 25 गुण असावेत, असे कौटिल्य म्हणतो.
मंत्रिपरिषदेतील संख्या 5 च्या वर नसावी. राज्याचे धोरण ठरवणे, लष्करी मोहिमांची आखणी व नियोजन, सामाजिक व सांस्कृतिक कार्याच्या योजना तयार करणे इ. ची जबाबदारी मंत्रिपरिषदेची होती.
राजाने निश्चित केलेल्या धोरणाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मंत्रिपरिषदेवर होती. परिषद ही सल्लागार सभा म्हणूनही ओळखली जाई.
मंत्री हे हुशार, स्वच्छ चारित्र्याचे व त्यांच्या खात्यांच्या अभ्यासात तज्ज्ञ असत.
मंत्रीपरिषद हे राजरथाचे एक महत्त्वाचे चाक होय, असे 'अर्थशास्त्रा'त म्हटले आहे.
मंत्र्याचे वार्षिक पगार 48,000 कर्षापण होते. आवश्यकतेनुसार मंत्रिपरिषदेची बैठक बोलावली जाई. युद्धात मंत्रिपरिषदेतील सदस्य राजाबरोबर भाग घेत असत.
X X
3) अमात्य :
विविध खात्याच्या प्रमुखाला अमात्य म्हणत.
समाजातील विद्वान, प्रतिष्ठित, प्रामाणिक, स्वामीनिष्ठ व कार्यक्षम व्यक्तींना अमात्य म्हणून नेमणूक देत असत.
राजाचे कार्यकारी निर्णय अमलात आणण्यासाठी राजा अमात्यांची नेमणूक करी.
4) विविध खाती :
चंद्रगुप्ताच्या शासनाची विभागणी विविध खात्यात केली होती व त्यावर श्रेणीबद्ध अधिकारीवर्ग नेमला होता.
अ) हेर खाते :
हेर खाते हे उत्तम होते. कारभार देखरेख, देशांतर्गत हालचाली, अधिकारीवर्ग व राज्यातील परकीय नागरिक यांच्या हालचालीवर देखरेख ठेवण्यासाठी हेर खाते होते.
राजनिष्ठ, प्रामाणिक व कार्यक्षम अशा गुप्तहेरांचे दोन प्रकार होते. काही हेर स्थानिक असत तर काही संचारी असत. हेरांना प्रशिक्षण दिले जाई. स्त्री हेरांच्याही नेमणुका केल्या जात.
राजद्रोह, भ्रष्टाचार, शत्रूच्या हालचाली, करबुडवेगिरी इ. ची माहिती सांगायचे काम हेर करत. शत्रूंच्या शक्तीच्या अंदाज घेऊन 'शत्रूच्या कमकुवत बाबींचीही ते राजाला माहिती देत.
उत्कृष्ट हेर यंत्रणेमुळे नोकरशाहीवर नियंत्रण असे व राष्ट्रद्रोह्यांच्या घातकी चाळ्यांनाही पायबंद बसे.
ब) परराष्ट्र खाते :
साम्राज्यविस्तारासंबंधी हे खाते राजाला मार्गदर्शन करी. शेजारच्या राष्ट्रांशी मैत्रीचे संबंध ठेवले जात.
साम, दाम, दंड, या चार तत्त्वांचा वापर करून शत्रूचा शेवट केला जाई. साम्राज्यविस्ताराच्या आड येणाऱ्या राजाचा कायमचा काटा काढला जाई.
अशोकाने कलिंग युद्धानंतर युद्धनीतीचा त्याग करून शांततेचे धोरण स्वीकारल्यामुळे क्षात्रवृत्तीचा अस्त होऊन त्याचा परिणाम म्हणजे मौर्य लष्कराची कार्यक्षमता व मनोधैर्य कमी झाले होते.
क) न्याय खाते:
राजा हाच सर्वोच्च न्यायाधीश होता. त्याच्या हाताखाली वेगवेगळे न्यायाधिकारी व न्यायालये होती. आजच्याप्रमाणे दिवाणी न्यायालय (धर्मस्थीय) च फौजदारी (कंटकशोधन) न्यायलये होती.
किरकोळ गुन्ह्यांचा निकाल लावण्याचे काम ग्रामसंस्था करी.
मॅगेस्थेनिसच्या मते,
"मौर्यकालीन समाजात भारतात गुन्ह्याचे प्रमाण कमी होते. त्यांच्या मते भारतीय लोक प्रामाणिक होते. परदेशी लोकांच्या दाव्यासाठी स्वतंत्र न्यायालये होती.
फौजदारी गुन्ह्यासाठी शिक्षा कठोर होत्या. दंड, फटके, कैद, जप्ती, अवयवभंग, प्राणदंड इ. स्वरूपाच्या शिक्षा दिल्या जात. जे दंड देऊ शकत नसत त्यांना तो भरण्याकरता स्वतःची वेठविगार म्हणून विक्री करता येत असे.
कौटिल्याने 'अर्थशास्त्र' या ग्रंथात गुन्हेगारांचा शोध व त्याचा निःपात यावर तीन प्रकरणे लिहिली आहेत.
फौजदारी गुन्ह्यासाठी असलेल्या शिक्षा भयंकर असल्याने फौजदारी गुन्ह्यांचे प्रमाण कमी असे. कोणालाही न्याय नाकरला जाऊ नये व कोणावरही अन्याय होऊ नये याची दक्षता घेतली जाई.
मॅगेस्थेनिस 'इंडिका' या ग्रंथात लिहितो, "मौर्यकाळात अपराध कमी होते. चोरीचे प्रमाणही कमी होते. मौर्याची राजव्यवस्था एवढी चोख होती की, लोक घरांना कड्याकुलपे न लावता बाहेर हिंड् शकत. प्रजेचा एकमेकांवर विश्वास होता. फाशीची शिक्षा तीन दिवस तहकूब ठेवली जाई व व्यक्तीला राजाकडे माफीचा अर्ज करता येत असे."
X X
ड) अर्थ खाते :
राज्याच्या उत्पन्नाचा व खर्चाचा हिशेब ठेवण्याचे काम खात्याकडे होते. जमीन महसूल उत्पन्नाच्या 1/8 एवढा होता.
जमीन महसूल हे उत्पन्नाचे सर्वात महत्त्वाचे साधन होते. त्याशिवाय खरेदी-विक्रीचे व्यवहार, आयात निर्यात मालावरील जकात, पुलपट्टी, जंगले व खाणीपासूनचे उत्पन्न व्यवसाय कर, पाणीपट्टी, वेश्याव्यवसायावरील कर ही उत्पन्नाची साधने होती. राज्यकारभार, लष्कर व लोककल्याणकारी कामे यावर उत्पन्न खर्च होई.
इ) कृषी व पाटबंधारे विभाग :
शेतीस कालव्याचे पाणी पुरवून जास्त पिके काढण्यासाठी या खात्याची निर्मिती करण्यात आली होती.
गिरनार येथील सुदर्शन तलाव चंद्रगुप्ताने तयार केला होता.
Comment and share
4 Comments
Nice sirji
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteVery nice
ReplyDelete